अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापनासमोरील आव्हान

रिअर करू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसमोर दोन पर्याय असतात.

 १) कोणत्या तरी संस्थेत काम करणंं, म्हणजेच सोप्या भाषेत नोकरी करणं, किंवा ( २) स्वतःचा व्यवसाय सुरू करणंं.
 यापैकी दुसरा पर्याय अधिक आकर्षक असला, तरी त्यात सर्वात मोठी समस्या सुरक्षितता व स्थिरतेची असते. स्वतंत्र व्यवसायात आपली उपजत क्षमता, प्रयत्न व उपयुक्तता खुल्या बाजारात रोज सिध्द करावी लागते. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात थोडीशी जरी ढिलाई झाली तरी क्षमा केली जात नाही. माणूस 'हिरो'चा ‘झिरो' होण्यास वेळ लागत नाही. सिने अभिनेते, क्रिकेटपटू, कलाकार, डॉक्टर, इत्यादी व्यावसायिक हे व्यक्तिगत प्रतिभेच्या जोरावर हा धोका पत्करतात. मात्र पहिला पर्याय अधिक सुरक्षित मानला जातो.
 संस्थेत महत्त्वाचंं स्थान मिळविण्यासाठी वेळ लागतो. सहकाऱ्यांच्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. मात्र, एकदा स्थान मिळाल्यानंतर हळूहळू किंवा वेगाने प्रगती होते. आपले

हात स्वच्छ असतील, तर स्थिरताही लाभते. त्यामुळेच ९५ टक्के माणसं या पर्यायाला

प्रथम प्राधान्य देतात.
 सुरक्षितता व स्थिरता यांच्या जोडीला संस्थेकडून माणसाला पुढील तीन फायदे मिळतात.
 १. पगार, भत्ते, सोयीसवलती व पद (डेसिग्ननेशन)
 २. काही तरी करून दाखविण्याची व स्वतःचा विकास करून घेण्याची संधी.
 ३.आपले सहाध्यायी, वरिष्ठ, कनिष्ठ, ग्राहक, पुरवठादार, कामगार पुढारी, कर्मचारी यांच्याशी येणाऱ्या संपर्कातून होणारी मैत्री व त्यांच्यासाठी काम केल्याने मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा.
 हे फायदे मिळविण्यासाठी आपण संस्थेला -
 १) आपला वेळ
 २) आपली बुध्दी व क्षमता
 ३) आपली कार्यशक्ती व उत्साह
 हे तीन स्रोत पुरवत असतो.
 या देवाणघेवाणीतून संस्था व माणूस यांच्यात एक वैशिष्ट्यपूर्ण संबंध निर्माण होतो. या संबंधाचे अनेक पदर असतात. संस्थेशी सहकार्य, काही वेळा काही बाबतीत विरोध,संस्थेत आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांशी आपली वर्तणूक,त्यांची आपल्याबरोबरची वागणूक, संस्थेशी संबंधित असलेल्या पण संस्थेबाहेरच्या माणसांशी संपर्क, त्यातून निर्माण होणारे ताणतणाव (आणि काही वेळ बेबनावदेखील), गटबाजी, इत्यादी वळणंं घेत हे संबंध दृढ होतात. जीवनातील सुरक्षेकरिता आपल्याला संस्थेची गरज असते, तर संस्था प्रगतिपथावर राहण्यासाठी तिला माणसांची गरज असते.
 संस्थेबरोबरचे कर्मचाऱ्याचे संबंध त्याचा स्वभाव, तो पारखण्याची संस्थेची (म्हणजेच संस्थेच्या व्यवस्थापनाची) कुवत व संस्थेची कार्यपध्दती यावर अवलंबून असतात. हे संबंध जितके मधुर तितकी संस्था तिच्या उद्दिष्टपूर्तीत यशस्वी होते व कर्मचाऱ्यालाही समाधान मिळते.
 या संबंधामधूनच ‘मनुष्यबळ’ व्यवस्थापन ही संकल्पना रूढ झाली. कर्मचारी व संस्था यातील संबंध अधिकाधिक सहकार्याचे बनविणे आणि दोघांनीही समजून घेऊन परस्परांच्या हिताचा व्यवहार करणे हे या संकल्पनेमागचे प्रमुख तत्व आहे.
 मनुष्यबळ हा कोणत्याही संस्थेचा प्रमुख आधारस्तंभ असतो आणि त्याचं व्यवस्थापन तितकंच अवघड असतं. कारण माणूस यंत्राप्रमाणे त्याच्या चालकाच्या सदैव कह्यात
राहू शकत नाही. त्याला आपलं स्वतंत्र अस्तित्व, भावभावना, कार्यशक्ती, उपजत प्रज्ञा व मर्यादा असतात आणि हेच त्याच्या 'जिवंतपणा'चे लक्षण असतं.
 आचार्य विनोबा भावे यांच्या मताप्रमाणे जगात चार प्रकारची माणसे असतात.
 १) सुस्त, (२) व्यस्त, (३) त्रस्त, (४) मस्त.
 सुस्त म्हणजे आळशी, कामाची टाळाटाळ करणारा, व्यस्त म्हणजे नेहमी कामात असण्याचा आविर्भाव करणारा, पण प्रत्यक्षात फारसे काही न करणारा, त्रस्त म्हणजे कधीही समाधानी नसणारा आणि सर्व काम आपल्यावरच पडते अशी नेहमी तक्रार करणारा व मस्त म्हणजे उत्साहाने रसरसलेला, नेहमी नव्या कल्पना लढविणारा व खऱ्या अर्थाने कार्यरत मनुष्य.
 यापैकी पहिल्या तीन प्रकारच्या माणसांमध्ये कार्यक्षमता नसते किंवा कमी असते असं नाही तर ती वापरण्याची त्यांची इच्छा नसते. त्यांचा स्वभाव आड येतो. अशा व्यक्तींकडून अपेक्षित कार्य करून घेणं हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचं कौशल्य आहे.
 'सैन्य हे पोटावर चालते' असे नेपोलियनने म्हटलं आहे. म्हणजेच कर्मचाऱ्याला दिला जाणारा पगार व आर्थिक फायदा हा त्याला काम करण्यास उद्युक्त करतो. कारण मुळात नोकरी करण्याचा उद्देशच अर्थार्जन हा असतो. त्यामुळे मनुष्यबळ व्यवस्थापनातही या बाबीला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. संस्थेत कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापनाबरोबर सर्वात मोठ्या प्रमाणावर वादंग होत असेल तर ते ‘पगारा'बाबत होतात. संस्थेची प्रगती, प्रतिष्ठा व ती वाढविण्यासाठी करावी लागणारी राबणूक याबाबत कर्मचारी व व्यवस्थापन यात दुमत नसते, पण पगाराचा प्रश्न आला की बच्याचदा गाडं अडतं. ‘आम्हाला समाधानकारक पगार द्या, मग आम्ही संस्था कुठल्या कुठे नेतो ते पाहा’ हे कर्मचाऱ्यांचे ब्रीदवाक्य असतं. व्यवस्थापनालाही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालत नाही. मात्र प्रत्यक्ष जीवनात पगाराइतकं किंवा त्याहूनही अधिक महत्त्व संस्थेकडून मिळणाच्या दुसऱ्या व तिसऱ्या फायद्यात आहे,हे कर्मचार्याला अनुभवातून कळून येतं.
 पैसा जीवनासाठी आवश्यक असला तरी कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचं समाधान केवळ तेवढ्यावरच होऊ शकत नाही. संस्थेत मिळणारी विकासाची संधी तितकीच महत्त्वाची आहे. पैसा पोटाची काळजी घेतो, तर संस्थेतील आपली देखणी कामगिरी मानसिक समाधान मिळवून देते. संस्थेत कर्मचाऱ्याला मान व मोठेपणा प्राप्त करून देते. कर्मचाऱ्याच्या कामगिरीचा फायदा संस्थेच्या खात्यावर जमा होतो हे जरी खरं असलं तरी तो आपण करून दिला आहे, ही जाणीव कर्मचाऱ्याला अधिक उत्साहित व कार्यशील बनवते. ते त्याचं जणू ‘टॉनिक’ ठरतं.
 माणूस समाजप्रिय प्राणी आहे. त्याला नेहमी अवतीभोवती आपल्यासारख्या इतरांचं कोंडाळंं लागते. आपली सुख-दुःखं इतरांनी वाटून घ्यावीत, ही त्याची इच्छा असते.ही संधी त्याला संस्था मिळवून देते.
 आपल्या सान्निध्यात येणारा प्रत्येक जण आपल्याला काही दुःख तर काही आनंद देतो. संस्था ही सुध्दा आपल्या जीवनात आलेली व्यक्तीच आहे. सुरक्षितता, पगार, विकासाच्या संधी व सामाजिक जीवन या संस्थेपासून मिळणाऱ्या चार गोष्टींची गोळाबेरीज आपल्याला त्रासापेक्षा अधिक आनंद मिळवून देत असेल तर केवळ पगाराकडेच लक्ष न देता आपण संस्थेशी एकरूप होऊन राहतो.
 याची प्रत्येक कर्मचाऱ्याला परिणामकारकपणे जाणीव करून देणं हे मनुष्यबळ व्यवस्थापनासमोरील आव्हान आहे. आपण संस्थेला जितकं देतो, त्यापेक्षा अधिक लाभ आपण संस्थेकडून उपटला तर आपण हुशार अशी कित्येक कर्मचाऱ्यांची समजूत असते. पण, दीर्घकालीन हिताचा विचार करता ही ‘हुशारी’ घातक ठरते, हे सत्यही कर्मचाऱ्याच्या वेळीच लक्षात आणून देणं हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचे कार्य आहे. हे व्यवस्थापन ज्या संस्थांमध्ये चांगल्या प्रकारचं आहे, अशा संस्था कमालीच्या यशस्वी होतात असा माझा अनुभव आहे.