पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/104

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पटवण्यासाठी 'अग्निदिव्य' करून दाखवण्याची संधी मिळणार आहे. प्रार्थना एवढीच की, आता यानंतर पवारसाहेबांनी मागे हटू नये. मोठ्या तडाखेबाज घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात काहीच करायचं नाही ही त्यांची खास शैली आहे. औरंगाबादच्या प्रकरणानंतर बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणार, असं त्यांनी जाहीर केलं. एवढंच नव्हे तर आठ दिवसांच्या आत अटक होणार अशी घोषणा केली. आजतागायत अशी अटक झालेली नाही. खैरनारांच्या घोषणांनी विकल्पच राहिला नाही म्हणून साहेबांनी खटल्याची भाषा वापरली; प्रत्यक्षात हळूहळू एकएक पाऊल मागे टाकत साहेब पदर सोडवून घेतील. अशी कुजबुज आहे. ती खरी ठरली तर साहेबांच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मोठी दुर्दैवी घटना ठरेल. साहेबांचा निर्णय योग्य आहे. त्यांनी शक्य तितक्या तत्परतेनं खटला लावला पाहिजे. एवढंच नव्हे तर दिलदारपणे मध्यंतरीच्या काळात खैरनारांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत करण्याचा मर्दाला न शोभणारा डाव सोडून द्यावा.
 खैरनार साहेबांनाही एक विनम्र सचना करावीशी वाटते. ते प्रत्यक्षात काय बोलले याबद्दल चर्चा यापुढे होऊ नये. "मी असं म्हटलंच नव्हतं," "पत्रकारांचा गैरसमज झाला," "त्यांनी दिलेली बातमी चुकीची आहे." असली मखलाशी यापुढे नको. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते त्यांनी स्पष्टपणे लेखी लिहून प्रसिद्ध करावं आणि लिखाणाचे परिणाम भोगण्याची आपली तयारी आहे, असं जाहीर करावं. खैरनार यांनी महाराष्ट्राचा 'एमिल झोला' बनावं.

 फ्रेंच आरमारातील एक उच्चाधिकारी ॲडमिरल ड्रेफस याच्यावर शत्रूशी संगनमत केल्याचा आरोप ठेवण्यात आला; त्याच्यावर खटला चालला, त्याला शिक्षाही झाली; पण या सगळ्या प्रकरणात काही गोलमाल आहे, वरिष्ठ राजकीय नेत्यांनी आपली चामडी वाचवण्याकरता ड्रेफसचा बकरा बनवला आहे, अशी पक्की धारणा आम जनतेची झाली. ड्रेफसवरील मुकदमा पुन्हा एकदा चालावा, अशी सार्वत्रिक मागणी होऊ लागली; पण कोणी दाद देईना. एमिल झोला हा त्या काळात दिगंत कीर्ती पावलेला फ्रेंच लेखक. त्याने या विषयावर एक लेख लिहिला आणि त्या लेखाचे शीर्षक होते 'मी आरोप करतो की,' (Jaccuse.) लेखातील प्रत्येक परिच्छेदाची सुरुवात याच वाक्यानं होईल, "मी आरोप करतो की," प्रत्येक परिच्छेदात त्यांनी राजकीय पुढाऱ्यांवर इतके खणखणीत आरोप ठेवले की त्याच्याविरुद्ध बदनामीचा खटला भरण्याऐवजी गत्यंतर राहिलं नाही. आपण कोणाच्याही अब्रूची नुकसानी केलेली नाही. आपण जे लिहिलं त्याला

भारतासाठी । १०४