पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/122

हे पान प्रमाणित केलेले आहे.

विनोदी फोडणी!
 चारपाचशे माणसे मरणे म्हणजे आजकाल किरकोळ गोष्ट झाली आहे. दोन दिवस वर्तमानपत्री ठळक मथळ्याच्या बातम्या झळकल्या आणि नंतर अपघातातल्या दुर्दैवी जीवांच्या आप्तजनांचा अपवाद सोडल्यास सारा देश फिरोजाबादचे कांड विसरून गेला. गेल्या वर्षात भारतीय रेल्वेवर पाचेकशे अपघात झाले, त्यातला हा एक. गाड्या अजून धावत आहेत. वेळापत्रक नावाची गोष्ट राहिलेली नाही. गाड्या आता मिनिटांनी उशीरा धावत नाहीत, पाचसहा तास ही साधारण दिरंगाई. आजची गाडी उद्या येणे हेही काही नवलाईचे समजत नाहीत. अशा व्यवस्थेतही प्रवाशाला जेथे जेथे म्हणून शक्य आहे तेथे तेथे लुंगवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या फौजाच्या फौजा उभ्या आहेत.
 इंग्रजांच्या काळात चाळीस हजार किलोमिटर लोहमार्ग बांधले गेले, त्याच्या निम्म्यानेसुद्धा नवे मार्ग स्वातंत्र्यानंतर बांधले गेले नाहीत. सगळी रेल्वे व्यवस्था सडली आहे, लोहमार्ग जुने झाले आहेत. निकामी झाले आहेत. डबे आणि इंजिन त्यांची आयष्यमर्यादा संपली तरी धावत आहेत. काहीवेळा गाड्यांशिवाय इंजिने धावतात, कधी इंजिनाशिवाय गाड्या; इंजिनच बंद पडले म्हणजे इंजिन आणि गाड्या दोन्ही खोळंबून पडतात.
 आयन रँडच्या एका कादंबरीत, समग्र व्यवस्था कोसळू लागली म्हणजे काय काय होते याचे तपशीलवार वर्णन आहे. आगगाड्या उशिराने धावू लागतात आणि त्यांचे भयानक अपघात चढत्या श्रेणीने होऊ लागतात असे तिचे वर्णन आहे. आपल्याकडे नेमके हेच घडत असावे.
 जुने तंत्रज्ञान, जुने रूळ, जुन्या गाड्या, सरकारीकरणामुळे बेशिस्त, भ्रष्टाचार, कर्मचारी वर्ग जबाबदारीची जाणीव नसलेला, जनतेला लुटण्यास बद्धपरिकर झालेला.
 फिरोजाबादची वारंवार पुनरावृत्ती टाळायची असेल तर भारतीय रेल्वे सरकारच्या जबड्यातून सोडवणे यापरता दुसरा मार्ग नाही. लोहमार्ग, त्यांची निगराणी हे बघणारी एक स्वतंत्र खाजगी व्यवस्था पाहिजे. त्या लोहमार्गावर आगगाड्या धाववण्याचा अधिकारी योग्य ते भाडे दिल्यास कोणालाही मिळू शकेल. एकेका मार्गावर अधिकाधिक सुखसोयी देऊन ग्राहकाचे मन जिंकू पाहणाऱ्या खाजगी उद्योगांची चढाओढ लागली पाहिजे.
 इंग्रजांनी भारताला टपाल व्यवस्था दिली, रेल्वे व्यवस्था दिली. त्या दोघांचेही आम्ही वाटोळे करून दाखवले; दोघांच्याही खाजगीकरणास आता काहीही पर्याय राहिलेला नाही.

(६ ऑक्टोबर १९९५)

♦♦

भारतासाठी । १२२