शेतकरी संघटनेचे काम मी पंधरा वर्षांपूर्वी चालू केलं. मी काही शेतकऱ्याचा मुलगा नाही. माझ्या गेल्या पाच पिढ्यांत कुणी शेती केली नाही. परदेशातून आल्यानंतर शेतजमीन घेऊन मी शेतकरी बनलो आणि शेतकरी संघटनेच्या कामाला लागली. याचं कारण शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या सभांमधून मी सांगितलं आहे. त्यावेळी मी म्हणायचो, "स्वातंत्र्य मिळालं, इंग्रज या देशातने गेला की दारिद्र दूर होईल, दुःख दूर होईल, देश संपन्न होईल. आज जसं आपण अमेरिका, स्विर्त्झंड या देशांची संपन्नता ऐकतो, तसा हिंदुस्थान बनेल असं स्वप्न आम्हाला गांधीजींनी दाखवलं होतं. तेहेतीस वर्षानंतर आम्ही प्रत्यक्षात असं पाहतो आहो की, गरीबी दूर झाली नाही, गरीबी वाढली, भ्रष्टाचार वाढला. जेवळजवळ सगळं वाईटच झालं. उदाहरणार्थ, आता आपल्याला खायला लागणारं पुरेसं अन्न शेतकरी स्वतः पिकवतो, अमेरिकेतून जहाजातून ते यावं लागत नाही. तसंच, आजपर्यंत देशाच्या सरहद्दी जवळजवळ शाबूत आहेत, जवानांना धन्यवाद द्यायला पाहिजेत; पण अशा काही अपवादात्मक प्रकाशशलाका सोडल्या तर बाकी सारा अंधारच आहे, तो का? असा प्रश्न मला पडला आहे."
आणि स्वातंत्र्य मिळालं पण त्यानंतर देश भरकटला आहे त्याची चिंता वाटली म्हणून मी शेतकरी संघटना काढली, आंदोलनं केली, तुरुंगात गेलो. आयुष्य वाऱ्यावर उधळून दिले. जे काही झालं तो सगळा इतिहास सर्वांना माहीत आहे.
यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याची पन्नास वर्षे पुरी झाली, खरं म्हणजे, १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर तिरंगी झेंडा लागला त्याला पन्नास वर्षे पुरी झाली. स्वातंत्र्य मिळालं का नाही मिळालं हा मुद्दा वेगळा; पण पन्नास वर्ष पुरी झाल्याच्या निमित्तानं चांगला मोठा उत्सव चालू आहे. जिकडं पहावं तिकडं ५० आकडा