पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/180

हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटेमध्ये त्यांना कुणी पुंगी वाजवणार गारुडी दिसला, कुणी जादूगार दिसला! कुणी पुंगी वाजवून म्हणाला अरे या या, पहा तर मी हा प्रभु रामचंद्राचा खेळ कसा मांडला आहे आणि माझे सारे शेतकरी भाचेपुतणे मी सांगितलेला अभ्यासाचा विचाराचा मार्ग सोडून रामाच्या मंदिराकडे वळले. कुणी म्हणाला बाकी काही करण्याची गरज नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या म्हणजे तुमचे सगळे प्रश्न सुटून जातील; विचार करायला नको, अभ्यास करायला नको, तुमचे काय प्रश्न आहेत ते मी सोडवून देतो म्हटले की गेले त्यांच्या मागे. अशा तऱ्हेने आपल्या अभ्यासाच्या मार्गामध्ये हे अडथळे येतात.
 आता मी विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. मी जर म्हटलं की, माझी अशी इच्छा आहे की, कोणी विद्यार्थी नापास होऊच नये, माझी मागणी अशी आहे की परीक्षेत कॉपी करायला सर्वांना मुक्तद्वार असले पाहिजे. त्यात अडचण येताच कामा नये आणि जो कोणी विद्यार्थी परीक्षा, कशा तऱ्हेने का होईना, पास झाला असेल त्याला चांगली दोनतीन हजाराची नोकरी मिळाली नाही तर बेकारीचा भत्ता म्हणून काहीतरी मिळालं पाहिजे तर मी तुमच्यात मोठा लोकप्रिय होऊन जाईन आणि तुम्ही 'शरद जोशी झिंदाबाद' म्हणून मोठ्याने घोषणा द्यायला लागाल. अशा तऱ्हेच्या गाजराच्या पुंग्या वाजवणारे आणि तरुणांकडून 'घोषणा' घेणारे गारूडी पुष्कळ आहेत. तुम्हाला घर पाहिजे? मी देतो; तुम्हाला कपडे पाहिजे. मी देतो; तुम्हाला नोकरी पाहिजे मी देतो; तुम्हाला काय पाहिजे ते मी देतो, तुम्ही फक्त एकदा मला मत द्या असं म्हणणाऱ्या गारुड्यांकडे आपण वळलो आणि आज ५० वर्षांनंतर आपण पाहातो आहोत की, अनेक गारुडी आले, अनेक जादुगार आले आणि आम्ही जमिनीमध्ये प्रत्येक वेळी आणखी खचतो आहोत.

 गेल्या पन्नास वर्षांत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षणाच्या बाबतीत काय घडलं? इंग्रज जेव्हा गेले तेव्हा देशामध्ये शाळा फार थोड्या होत्या. होत्या त्या शहरात होत्या. खेडेगावामध्ये एखादा गुरुजी असायचा तो शिकावायचा, विशेषतः काही ठराविक जातीतल्या मुलांनाच शिकवायचा. थोड्या शाळा होत्या त्या शाळेमधील शिक्षकांना त्या काळी पगार असायचा दरमहा आठदहा रुपये. प्राथमिक शिक्षक म्हणजे अत्यंत गरीबीमध्ये राहणारा. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारा असा पवित्र माणूस समजला जाई. प्राथमिक शिक्षकांच्या विरुद्ध अगदी १९७१ सालापर्यंत, कोणी बोलत नसे. आता सगळीकडे जीवन शिक्षण मंदिरं गावोगाव निघाली; गावातील गुरुजी गेले. खाजगी शाळा जवळजवळ

भारतासाठी । १८०