सांगितलं असतं तर खरं वाटलं नसतं; पण शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीमुळे ते साधलं आहे. सायमनने आणखी एक निष्कर्ष काढला आहे की, १८०० सालानंतर जी काही प्रगती झाली आहे ती फक्त ज्या देशांत स्वातंत्र्य आहे तिथंच झाली. जिथं कोणी एक हुकुमशहा किंवा पक्ष पुढं आला आणि म्हणू लागला की, "अरे, सामान्य लोकांना काय समजतं? आपल्याच स्वार्थाकरिता आणि फायद्याकरिताच ते धडपडतात. त्यांच्या हाती समाजाचा कारभार सोपवून कसे चालेल? साऱ्या समाजाच्या, राष्ट्राच्या दृष्टीने 'सम्यक्' नियोजन कसं होईल? त्यात समाजाचं अकल्याण आहे. तेव्हा, सर्व सत्ता आमच्या हाती द्या. आम्ही ठरवू गहू किती पिकवायचा, आम्ही ठरवू रेल्वेची किती इंजिनं बनवायची बघता बघता सारा देश सुखी करून टाकू." असे हुकुशाही, फॅसिस्ट किंवा समाजवादी पद्धत स्वीकारलेले देश सोडून बाकी सगळ्या देशात प्रगती झाली. ब्राह्मणी समजवादी हिंदुस्थानात प्रगती होण्याची काहीच शक्यता नव्हती.
-आणि तिसरी लढाई
चाळीस वर्षांत देश कोसळला आणि काँग्रेस पक्षाच्याच डॉ. मनमोहन सिंगांना कबुलीजवाब द्यावा लागला की, "खुलेपणाकडे जाण्याची आवश्यकता आहे." अलीकडे सोनिया गांधी आल्यानंतर त्यांची मते बदलली असती, तरी त्यांनी हे लोकसभेत जाहिरपणे म्हटले आहे. ज्या पक्षाने या देशात समाजवाद आणला त्याच पक्षाला आता खुलेपणाची आवश्यकता कबूल करावी लागली आणि इथे 'स्वदेशीची तिसरी लढाई' सुरू झाली.
इंग्रज आल्यानंतर विलायतेशी संपर्क वाढू द्या, त्यामुळे आपल्या देशातील अज्ञानाचाउ अंधःकार दूर होईल, जातिभेद दूर होतील असं म्हणणाऱ्या 'स्वतंत्रतावाद्यांचा' पहिला पराभव झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजवादाच्या नावाखाली आम देश फसला आणि त्यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला आणि या तिसऱ्या लढाईच्या सुरुवातीला ब्राह्मणवाद व समाजवाद यांच्या जोडीला तिसरा वाद-राष्ट्र-धर्मवाद उभा केला जात आहे.
स्वतंत्रतेला विरोध करणाऱ्यांनी आता स्वदेशीचा झेंडा उचलला आहे. समाजवादाच्या नावाखाली मक्तेदारी मिळालेला कारखानदार समान संधी (Level Playing Field) मिळण्याची भाषा करीत आहे. जुने पराभूत समाजवादी, गांधीवादी आणि संघवादी स्वदेशीचा कुकारा देऊन लोकांसमोर भडक भाषणे करायचा धडाका लावत आहेत. डंकेल प्रस्ताव प्रसिद्ध झाला त्यावेळी मी एक लेख लिहिला. मला वाटलं काम झालं, आता आणखी विचार करण्यासारखा