पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/238

हे पान प्रमाणित केलेले आहे.

नेहमीच छुपा दुस्वास वाटतो. संशोधक, यशस्वी कारखानदार, व्यापारी यांच्याविषयी काहीतरी खोडी शोधून त्यांना दूषणे देण्याची आपली परंपरा फार जुनी आहे.

 'तंत्रज्ञान चांगले हो, पण गरीबांचे काय? निसर्गाचे काय' असे प्रश्न ते विचारतात आणि यच्चयावत् प्रतिभाशून्यांचे आवडते जीवनमूल्य 'विषमता निर्मूलन' याचा आधार घेऊन ते आघाडीवर जाणाऱ्यांचे पाय ओढू पाहतात.

 तंत्रज्ञानाचे विरोधक सर्वत्र आढळतात. ते जेट विमानांतून प्रवास करतात; इंटरनेट, इ-मेलवर एकमेकांशी संपर्क साधतात; हातातील मोबाईल फोन एखाद्या निशाणाप्रमाणे फडकावतात; अत्याधुनिक सुसज्ज रुग्णालयात औषधोपचार घेतात आणि तेथील उपचाराने जीव वाचवत असताना आधुनिक उपचारव्यवस्था आणि तंत्रज्ञान यांच्यावर निःसंकोचपणे दुगाण्या झाडीत असतात. तंत्रज्ञानाचे विरोधक तंत्रज्ञानाच्या रसाळ फळांचा निग्रहाने त्याग करून विरक्त बुद्धीने जगणारे साधुसंन्यासी नाहीत; ज्या हाताने भरविले त्यालाच चावणारी ही जमात आहे.

 'माल्थस'पासून ते 'रोम क्लब'च्या अर्थशास्त्रज्ञांपर्यंत अनेकांनी 'पृथ्वीला आता माणसांचा भार असह्य होतो आहे' अशी हाकाटी दिली आणि मोठ्या उत्पाताचे इशारे दिले. प्रत्यक्षात लोकसंख्या प्रचंड वाढली तरी इतिहासातील कोणत्याही कालखंडापेक्षा आज, अगदी सामान्य-जनसुद्धा अधिक चांगले खातात, पितात आणि जगतात. केवळ पस्तीस वर्षांपूर्वी हिंदुस्थान अन्नधान्याच्या भिकेवर जगत होता. पाचदहा वर्षांत तो अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला याला कारण कोणी सरकार नाही, तर हरित क्रांतीचे तंत्रज्ञान आहे. पूर्वी माणसे भर विशीतिशीत आजाराने, साथीच्या रोगाने मरून जायची; आज आयुष्यमान दुप्पट झाले याचा वरदाता वैद्यक तंत्रज्ञान आहे, कोणतीही सरकारी योजना नाही.

 हिंदुस्थानातील बहुसंख्य स्त्रियांचे पुरे आयुष्य पाणी भरण्यात आणि सरपण जमा करण्यात जाते. स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांत या मायबहिणींच्या आयुष्यात काही थोडा दिलासा आला असेल तर तो तंत्रज्ञानाने बहाल केलेल्या शिवणयंत्राने, पिठाच्या गिरणीने आणि इंजिन किंवा मोटर यावर चालणाऱ्या पाण्याच्या पंपाने.

 मग, अशा 'सर्वहितेषु' तंत्रज्ञानाचा इतका व्यापक रागराग का होतो?

 पोपट गोड बोलतो, त्याच्या नशिबी पिंजरा येतो; स्त्रिया प्रजनन करतात, त्यांना दुय्यम स्थानी ठेवले जाते; शेतकरी एका दाण्याचे शंभर दाणे करतात, त्यांना वेठीस धरले जाते. या सर्वांप्रमाणेच तंत्रज्ञान गुणाकारी असते, कदाचित् याच कारणाने त्याचा द्वेष सारे अनुत्पादक वर्ग करीत असतात.

 सूर्योदयाला विरोध करणारी ही जात काही नवीन नाही. आदिमानवाने चाकाचा

भारतासाठी । २३८