पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/239

हे पान प्रमाणित केलेले आहे.

शोध लावला त्या वेळीही 'या चाकाने प्रचंड गती येईल, मनुष्यजातीचा विनाश ओढवेल' असा आरडाओरडा करणारे आजच्या पर्यावरणवाद्यांचे पूर्वज त्याही वेळी नक्की असतील. वाफेचे इंजिन झुक झुक करीत रुळांवर धावू लागले तेव्हातर पर्यावरणाच्या नावाखाली तंत्रज्ञानाच्या विरोधकांनी हैदोस घातला. जैविक तंत्रज्ञान उदयाला येत असताना त्याला विरोध करणारे हे प्रमुखतः गतिविरोधी परंपरेतील आहेत. इतिहासाने यांना प्रत्येक पायरीला खोटे ठरविले आणि माणसाच्या प्रगतीची दिशा नवनवोन्मेषशाली विज्ञानात आहे हे दाखवून दिले; पण, हे पठ्ठे काही नवे शिकायलाच तयार नाहीत.

 सर्व मानवजातीच्या कल्याणाकरिता कामी आलेली एकमेव गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान. जानकीच्या विशुद्धतेविषयी संशय घेऊन तिला अग्निदिव्य करायला लावणाऱ्यांची जमात आजही तंत्रज्ञांच्या भूमिकन्येस तिच्यावर भलतेसलते आळ घेऊन अग्निदिव्यास सामोरे जाण्यास भाग पाडीत आहेत. याला आघाडीवरील वैज्ञानिक काही प्रमाणावरतरी जबाबदार आहेतच. त्यांना ती जबाबदारी नाकारता येणार नाही.

 संशोधनाच्या प्रचंड शर्यतीत एकजण जिंकतो, बाकी सारे अनामिक होऊन जातात, अयशस्वी प्रेमवीराप्रमाणे त्यांतील अनेकजण प्रियवस्तूंचा घात करायला तयार होतात. जैविक तंत्रज्ञानाला युरोपीय देशांत कडवा विरोध होतो. जर या तंत्रज्ञानातील महत्त्वाचे श्रेय अमेरिकेतील शास्त्रज्ञांऐवजी युरोपीयन शास्त्रज्ञांना मिळाले असते तर हा विरोध उपजलाच नसता, कदाचित्.

 एका काळी तंत्रज्ञानाच्या आघाडीवर असलेले नवीन तंत्रज्ञान आले म्हणजे जीवाच्या आकांताने त्याला विरोध करतात. हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाच्या काळात ज्यांनी रासायनिक खते व औषधे या उद्योगधंद्यात अफाट पैसा कमावला, ते जैविक तंत्रज्ञानाने आपल्या पोटावर पाय येतो अशी भीती वाटताच सारा पैसा जैविक तंत्रज्ञानाच्या विरोधकांच्या पाठिंब्यासाठी खर्चू लागले.

 मागे पडलेले आणि कालबाह्य झालेले शास्त्रज्ञ शास्त्रच उद्ध्वस्त करायला निघालेल्यांशी हातमिळवणी करायला निघतात हे दुर्दैव खरे; पण त्याही पलिकडे, यशस्वी शास्त्रज्ञांनीही विज्ञानयुगास आवश्यक अशी कामगिरी बजावण्यास कुचराई केली आहे. अगदी गेल्या शतकापर्यंतच्या मोठ्या शास्त्रज्ञांचे लिखाण वाचले तर त्यांनी, कामगिरीच्या संदर्भात का होईना, एक विश्वदर्शन उभे करण्यासाठी चिंतन केलेले दिसते. समाजव्यवस्थेविषयी काही निष्कर्ष काढलेले दिसतात. काही अपवाद सोडल्यास नवनवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या दार्शनिक

भारतासाठी । २३९