रामरावणाच्या युद्धातसुद्धा नेमकी बाजू कशाला घ्या? 'रामाय स्वस्ति, रावणाय स्वस्ति ।' अशी भूमिका घेणे प्रगल्भतेचेही लक्षण समजले जाते आणि व्यावहारिकदृष्ट्या ते सुरक्षितपणाचेही ठरते. शेवटी युद्धात राम जिकतो का रावण जिंकतो याची खात्री असल्याखेरीज कोणतीही बाजू घेणे धोक्याचे. आपण एक बाजू घेतली आणि दुसऱ्या बाजूची सरशी झाली तर काय सांगावे? जेत्या पक्षाने मनात राग धरला तर कदाचित् जीवावर बेतायचे, देहदंड व्हायचा किंवा निदान, दरबारी मेहेरबानीच्या उच्छिष्टातील आपल्या वाट्याला येणारे काही शिते कमी व्हायची. त्यापेक्षा, सरशी कोठे होते ते पहावे आणि मगच काय ते आपले मत ठरवावे अशी भारतीय पांडित्यांची प्रदीर्घ परंपरा आहे!
राष्ट्रपती के. आर. नारायणन् दलित समाजात जन्मले, स्वतःच्या कर्तबगारीने भारताच्या परराष्ट्रसेवेत उज्ज्वल कारकीर्द गाजवून त्यांनी उदंड कीर्ती मिळवली आणि, अखेरीस एक जन्माने दलित व्यक्ती राष्ट्रातील सर्वोच्चपदी विराजमान झाली. 'गांधीजींचे स्वप्न साकार झाले,' असे सर्वांनी म्हटले. अशा पार्श्वभूमीचे राष्ट्रपती सर्वसाधारण समाजाची मान्यता मिळाल्यानंतर पंडिती संकेत आणि संस्कृती यांच्या जबड्यात गिळले जातात. दलितांच्या सक्षमीकरणामुळे 'ब्राह्मणी' परंपरेऐवजी उत्पादकवर्गाची काही नवीन संस्कृती आणि संकेत तयार होतील अशा आशा बाळगणाऱ्यांना हा मोठा धक्का आहे. सासूच्या खस्ता खाल्लेली सून कालक्रमाने सासू बनल्यानंतर पारंपरिक सासूच्या साच्यात चपखल बसून जाते, त्यातलाच हा प्रकार.
समन्वय, संतुलन, समभाव, सहभाग हे पौर्वात्य आणि विशेषतः, भारतीय परंपरेतील परवलीचे शब्द आहेत. कोणत्याही विषयावर निश्चित ठाम भूमिका घेऊन ती परखडपणे मांडण्याची वैचारिक स्पष्टता आणि बौद्धिक प्रामाणिकपणा नसला की तो अभाव लपविण्याकरिता या परवलीच्या शब्दांचा उपयोग शतकानुशतके झाला आहे.
चेंडूंची करामत
'आत्मा देहरूप धारण करतो' का 'आत्मा असणे हा देहाचा धर्म आहे' हा भारतीय दार्शनिक परंपरेतील मोठा वादाचा विषय आहे. त्यात 'पिलवः, पिलवः, पिलवः' अशी विश्वाची अणुमय व्याख्या करणारा चार्वाक एकटाच. त्याला ठेचून मारण्यात आले. तेव्हापासून 'तदेकम् वद निश्चित्यम्, येन श्रेयोऽहं आप्नुयाम्' अशी काकुळतीची विनंती केल्यानंतरसुद्धा ज्ञान, भक्ती आणि कर्म हे