पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/261

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि अशा घातपाती कृत्यांना एक प्रतिष्ठा आली. ओसामा बिन लादेनसारख्या वृद्ध उंदराला शोधण्याकरिता अमेरिकेच्या, अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज सैन्याने जंग जंग पछाडले पण लादेन काही त्यांच्या हाती लागला नाही. अमेरिकनांना नाक खिजवून दाखवण्यासाठी तो नियमितपणे दूरदर्शनवर व इतर मार्गे आपण अजून चैतन्यशील असल्याचा पुरावा देत असतो.

 असमर्थांचे रडगाणे

 काश्मीर प्रश्नाबद्दल भारताची बाजू न्याय्य व योग्य आहे अशी बहुतेक भारतीय हिंदू सवर्णांची तरी खात्री आहे. भारताचे सात लाख लष्कर जम्मू काश्मीरमध्ये छावणी घालून बसले आहे तरीही प्रत्यही घातपाती हल्ले होतच आहेत. औरंगजेबाच्या सैन्याची संताजीधनाजींनी केली नाही अशी दुर्दशा काश्मीरातील घातपाती भारतीय लष्कराची करत आहेत. पाकिस्तानच्या आधाराने आणि मदतीनेच ही घातपाती कृत्ये चालू शकतात असे धीरगंभीर प्रकृति पंतप्रधान आणि कडवे उपपंतप्रधान दोघेही दिवसातून दहावेळा सांगत असतात. या रडगाण्याला काही अर्थ नाही, किंबहुना, हा युक्तिवाद हास्यास्पद आहे हे उघड आहे. हिंदुस्थान प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानपेक्षा किमान पाच पटीने जड आहे. इस्राएल हे मध्यपूर्वेतील चिमुकले राष्ट्र. सर्व बाजूने इस्रायलचा विध्वंस करण्याची मनीषा बाळगणारी दोन डझनावर अरब राष्ट्रे आणि इस्रायलच्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी पट अधिक अरब मुसलमान शत्रु म्हणून ठाकले आहेत. तरीही इस्रायलला कधीही 'हे अरब घातपाती अरब राष्ट्रांच्या मदतीने आमच्याविरुद्ध परोक्ष युद्ध चालवीत आहेत' असे आसू गाळीत म्हणावे लागत नाही; किंवा 'लादेन, सद्दाम यांच्यामागे लागण्यापेक्षा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुशसाहेब यांनी मुशर्रफ विरुद्धच आघाडी उघडून आमच्या काश्मीरातील साप मारून द्यावा' अशी 'षंढ स्वप्ने' ते रंगवीत बसत नाहीत.

 'मुंबई बंद', 'महाराष्ट्र बंद' असल्या कार्यक्रमांच्या वेळी गुंडगिरी करून मर्दुमकीच्या आवेशात मिशांवर हात फिरवीत आणि अधिकाधिक भडक भगवा टिळा लावून शिवसैनिक भले फिरोत; बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिकांचा मोठा हात होता अशी पडद्याआड फुशारकी हिंदुहृदयसम्राट खुशाल मारोत, तोगडियासारखे निरर्गल आपल्या हिंदू अनुयायांना 'मुसलमानाशी मैत्री अवश्य करा; त्यांच्या घरी सुंदर बायका असतील तर अवश्य करा' असा खास हिंदूवीर सल्ला देवोत, मुसलमान घातपाती हिंदुस्थानभर कोठेही - अगदी लोकसभेवर व लष्कराच्या प्रमुख छावणीवरही बेधडक हल्ले करतात, हरदिन निदान पाचदहा घातपाती त्यांच्या कामाकरिता बाहेर निघतात, आपण जिवंत परत येणार नाही

भारतासाठी । २६१