आपण वर पाहिले आहे. सर्वसमावेशकतेचा आव आणणाऱ्या आणि निर्धार्मिकतेच्या मुखवट्याखाली अल्पसंख्याकवादाला खतपाणी घालणाऱ्या शासनाला कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे शक्य होणार नाही हे मुंबईला ५९ तास वेठीस धरलेल्या फक्त १० आतंकवाद्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. दक्षिण मुंबईतील काही मोजक्या ठिकाणात थरारक नाट्य घडले. ते संपवण्यात राष्ट्रीय सुरक्षा दल, पोलिस आणि अग्निशामकदल यांना यशही आले. त्यामुळे, आता हा प्रश्न निकाली निघाला असे कोणी समजेल तर त्याची झोप थोड्याच दिवसात खाडकन उघडेल.
आतंकवाद्यांचे कृत्य मोठे बहादुरीचे काम आहे असे मनोमन मानणारा समाज मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रभर आणि देशभरही सर्वत्र फैलावला आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांच्या वेळी भारताची बाजू पडती झाली की हर्षोल्लासाच्या घोषणा देणारी प्रवृत्ती मुंबईत वस्त्यावस्त्यांत आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की, ५९ तास थरारनाट्याचे चित्रण करणाऱ्या टी.व्ही. चॅनल्स् ना या वस्त्यांत जाऊन कुशलतेने खऱ्याखुऱ्या प्रतिक्रिया मिळविण्याची बुद्धी झाली नाही. सबंध ताज महाल हॉटेलची इमारत जमीनदोस्त होईल इतक्या शक्तीचे बाँब, दारूगोळा आणि तीन दिवस थकवा व झोप यांचा त्रास होऊ नये अशा प्रकारची खाद्यसामुग्री ही काही हल्लेखोरांनी कराचीहून आणली नव्हती.
शरीरावर कोठे फोड दिसला की त्याची जुजबी मलमपट्टी करणे अशा प्रकारचे सुरक्षा धोरण स्वातंत्र्यानंतर सर्व सरकारांनी राबवले आहे. या बुळ्या धोरणाचा अंत झाल्याची द्वाहीही गेल्या तीन दिवसांनी फिरवली आहे. 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' असल्या धोरणाने आतंकवादाचा सामना करता येत नाही.
कालच्या (२९ नोव्हेंबर) वर्तमानपत्रांतून हा बदल झाल्याचे दाखवणाऱ्या काही घडामोडी दिसल्या. भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तानचा दौरा रद्द करण्यात आला आहे. एका जबाबदार नेत्याने 'पाकिस्तानने आतंकवाद्यांचे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करण्याचे आश्वासन न पाळल्यामुळे भारताला ती कामगिरी करावी लागेल' असे स्पष्ट म्हटले आहे. गेली पाच वर्षे भारत-पाकिस्तानमधील सुरू केलेल्या दळणवळण आणि संचारव्यवस्था बंद करण्याचे प्रस्तावही विचाराधीन आहेत. रेल्वे, विमानसेवा आणि संचार सवलती यांनी आतंकवाद्यांचेच काम सुलभ झाल्याचे दिसून आले.
साऱ्या मुंबईवर खरेखुरे राज्य चालते ते दाऊद इब्राहिमचे. बॉलिवूड एवढेच नव्हे तर शेअरबाजार त्याच्या इशाऱ्यावर चालतात हे सर्वांना माहीत आहे. तो