या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
६८      गांव-गाडा.

किंवा गुमास्त्यामार्फत करीत. त्यांच 'जमेदार कारकून ' तालुक्यांच्या किंवा पेट्यांच्या कचेरीत सरकारच्या कॉरंकुनांना मदत करीत. ह्यांखेरीज ते जमिनीचे राजिनामे, कबुलायती, कौल, फारकती, तबदील वगैरेंची नोंद करीत, आणि स्थावरच्या कज्जांत जरूर तेव्हां आपल्या दप्तरची कागदपत्रे हजर करीत. पुढे सरकारने परगणे वतनदारांची चाकरी वजा करून त्यांना नक्त नेमणुका ठरवून दिल्या. इसवी सन १८३९ चा आक्ट २० अन्वयें शेव, फंसकी, वाणगीसारखे यच्चयावत् पांढरी हक्क ऊर्फ मोहतर्फा उकळण्याची झाडून सर्व वतनदारांना सरकारनें मनाई केली आहे. सर्वे सेटलमेंटप्रमाणे परगणे वतनदार व पाटील-कुळकर्णी ह्यांना घुगरी, सळई, बलुत्यांसारखे काळीचे हक्क उकळण्याची बंदी केली आहे; आणि पाटील-कुळकर्यांची चाकरी वंशपरंपरेनें कायम करून त्यांना त्यांच्या सर्व परभारे उत्पन्नाबद्दल वसुली रकमेवर रोकड मुशाहिरा ठरवून दिला आहे. महार जागले ह्यांना मात्र मामूलप्रमाणे बलुतें हक्क उकळण्यांची मोकळीक सरकारने ठेविली आहे. ह्याप्रमाणे सार्वजनिक किंवा सरकारी नौकरींत गांवकामगारांशिवाय वतनपद्धतीला इंग्रज मुत्सद्यांकडून अजिबात फांटा मिळाला; आणि चाकरीबद्दल वतनाऐवजी रोख वेतन देण्याची पद्धत चालू झाली.

  आपल्या मुंबई इलाख्यापुरते पाहूं गेलें तर सिंध प्रांत सोडून मुलकीसंबंधाने सरकारने त्याचे उत्तर, मध्य व दक्षिण असे तीन भाग केले आहेत; आणि प्रत्येकावर रेव्हेन्यु कमिशनर नांवाचा महसुली अंमलदारं नेमून अमंदाबाद, पुणे, बेळगांव, ही शहरें अनुक्रमे त्यांची मुख्य ठाणी केली आहेत. प्रत्येक भागांत संहा सात जिल्हे आहेत. जिल्ह्याचे क्षेत्र सुमारे १६०० ते ६५०० चौरस मैल असून त्यांत ६ ते १२ तालुके व ६०० ते १७०० गांवे असतात; आणि लोकसंख्या समारे १० लाख असते. तालुक्याचे क्षेत्र सुमारे ६५ ते ४५० चौरस मैल असून त्यांत. ५० ते २५० गांवे असतात. तालुका मोठा असला तर त्याचा महाल किंवा पेटा नांवाचा पोटविभाग असतो. पूर्वीच्या राज्यांत सगळा कार-