या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )



लीन जरठ व परिणत ऋषिवर्यांनी आपल्या मातृभाषेचे चांगलें लालनपालन केलें; तिला हरएक प्रकारें वाढीस लाविलें; व तिजला पूर्णत्वास आणून, ह्या भूतलावरील अखिल भाषांवर तिचे श्रेष्ठत्व स्थापिलें. इतकेच नव्हे तर, हें अमूल्य भाषाशास्त्र पद्धतशीर रीतीनें कसें शिकावें, त्याचा शोध कसा लावावा, आणि त्याचें अन्वेषण कोणत्या तऱ्हेनें करावें, याबद्दलचा धडा सुद्धा पाणिनीसारख्या अद्वितीय बुद्धिमत्तेच्या सर्वमान्य ऋषीनें, आज सुमारे चार हजार वर्षांपलीकडील कालांत, प्रथमतःच घालून दिला; व त्यायोगानें अनन्त उपकाराचें कधींही न फिटणारें ओझें एकंदर मनुष्यमात्रावर त्याने कायमचें करून ठेविलें. ही गोष्ट आम्ही सदैव ध्यानात ठेवण्यासारखी आहे; आणि म्हणूनच ती आह्मांला विसरतां कामा नये.

 आतां, पाणिनीच्या पूर्वीं आणि त्याच्या नन्तरही, तत्तत्कालानुरूप असे, अनेक पंडितांचे भाषाशास्त्रविषयक बरेच परिश्रम झाले होते, यांत बिलकुल शंका नाही.


 १ पंडित सत्यव्रत सामश्रमीच्या मतें, पाणिनीचा काल इ. स. पूर्वी २४०० वर्षें असल्याचें होतें. (निरुक्त. उपोद्घात पु. ६ वें. भा. ७ वा. पा. जी-झी. )

 डा. भांडारकराच्या अभिप्रायाप्रमाणें, पाणिनीचा काल इ. स. पूर्वी ७०० वर्षे असावा, असें वाटतें. (भांडारकरकृत दक्षिणचा प्राचीन इतिहास. पा. ८)

 पाश्चात्य पंडित वेबर, मॉक्समुलर, इत्यादींच्या मतें, हा काल इ. स. पू. ३५० वर्षे असावा. (संस्कृत वाङ्मयाचा त्यांनी केलेला इतिहास पहा. )