हे पान प्रमाणित केलेले आहे.

 थोडा वेळ कोणी बोलले नाही.

 संपतराय गंभीरपणे म्हणाले, "इंदु, आणखीही तुला काही सांगणार आहे. सत्य जगात केव्हा ना केव्हा प्रकट होतंच. मग सारं तुला सांगून टाकतो. सांगू?"

 "सांगा. काय सांगायचं?" ती भीतभीत विचारती झाली.

 "इंदु तुझा पतीही निर्दोष नाही. हो संपतराय निष्पाप नाही. मी तुझ्याबरोबर लग्न करणं लांबणीवर टाकीत होतो. ही गोष्ट तुला आठवत असेल. मी एका मुलीच्या प्रेमपाशात अडकलो होतो. तिच्याजवळ मी गुप्तपणे लग्न लावलं होतं. एका गावी एक घर भाड्यानं घेवून तेथे तिला ठेवली होती. ती मुलगी गरीब घराण्यातली होती. आम्ही मोठ्या घराण्यातील. बाबांनी त्या मुलीजवळ लग्न लावायला कधीही संमती दिली नसती. मलाही उघडपणे त्या मुलीला माझी पत्नी म्हणून इथं आणण्याचं धाष्टर्य झालं नाही. समाजाच्या टीकेला मी भ्यालो. खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे भेद, त्यांना मी बळी पडलो. मनाने मोठा तो मोठा, तो कोठे का जन्मेना? कोठे रानातही गुलाब फुलला, तरी त्याचा सुगंध दशदिशांना धावणारच. परंतु मी भ्याड होतो. त्या माझ्या पत्नीला माझ्यापासून एक सुंदर मुलगी झाली होती. मी मधूनमधून तिच्याकडे जात असे. त्या सुंदर लहान अर्भकाला जवळ घेत असे. माझी पत्नी मला नेहमी विचारी, 'कधी नेणार घरी?' मी म्हणे, 'नेईन लवकर.' परंतु ती निराश झाली. लहान मूल कडेवर घेऊन माझ्याकडे येण्यासाठी ती निघाली असावी. पायी यायला निघाली. तुला आठवते का ती गोष्ट? पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. मनूबाबांच्या झोपडीजवळ एक अनाथ स्त्री मेलेली आढळली. इंदू, तीच माझी पहिली पत्नी आणि मनूबाबाकडे वाढणारी सोनी तीच माझी मुलगी. ती माझी पत्नी गावाच्या सीमेवर विष पिऊन मरून पडली. पतीच्या नावाला कमीपणा का येईल? तर मग मी या जगात कशाला राहू? अशा विचारानं का तिनं मरण पत्करलं? आणि ती मुलगी! त्या विणकराला मी म्हटलं, की मी त्या अनाथ मुलीला वाढवीन. परंतु तो देईना. ही माझी मुलगी आहे व ही मरून पडलेली अनाथ स्त्री माझी पत्नी आहे असं सर्व लोकांसमोर कबूल करण्याचं

                       सत्य लपत नाही * ५१