पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/17

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अटकेस झेंडा कोठे रोवला?

अटकेंतल्या त्या एकुलत्या एका शंकरासही कांही काल अज्ञातवास घडला!
  वीस पंचवीस वर्षांपूर्वी एक गुरुजी तेथे आले व हे दृश्य पाहून त्यांना विषाद उत्पन्न झाला. त्यांनी आपल्या एका पट्टशिष्याला आज्ञा दिली की, या शिवमंदिराचा जीर्णोद्धार करून हिंदु यात्रेकरूंची सोय लावून दे. सिंधुनदाच्या स्नानासाठी आणि मृतांच्या अस्थिसमर्पणासाठी कितीतरी यात्रेकरू तेथे येत असतात. परंतु कोठे तरी स्नान करावें व क्रियाकर्मांतर आटोपावे असा त्यांचा क्रम असे. आता त्या शिवमंदिरांत सुमारे वीस पंचवीस मंडळी मोठ्या व्यवस्थेने राहूं शकतील इतकी बांधलेली जागा आहे आणि पर्वकाळीं किंवा यात्रेच्या वेळी दोन तीन हजार यात्रेकरूंची सोय केली जाते. इतकेच नव्हे तर, एक सुंदर पण छोटासा घाट बांधून ठेवून अभ्यागतांच्या पुडीची सोयही केली आहे. हा सर्व उद्धाराचा कार्यक्रम गेल्या अठरावीस वर्षातलाच आहे. तेव्हा त्या हिंदु गुरूच्या चेल्यांना ज्यांनी हे सर्व कार्य घडवून आणलें त्यांनापूर्वीची काय माहिती असणार ? 'राघोबा पंत' अटकेंत आले होते इतके मी ऐकले आहे. पण ते कोठे होते, किती दिवस राहिले यासंबंधी कोणासच माहिती नाही असे त्यांनी सांगितलें.

 अटकेंत एकटेंच एक शिवालय, पण तेंही किल्लयाच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ, सिंधूच्या पवित्र तीरावर वसलेलें; तेव्हा राघो भरारीने त्याच ठिकाणी आपला 'जरीपटका ' रोवला असावा असा तर्क करण्यास जागा आहे. निदान या काळीं आपणांस स्मारक करण्यास अन्य स्थान योग्य नाही. तें शिवालयाच्या आवारांतच व्हावें हें युक्त दिसतें. आजूबाजूची भूमि आज मुसलमानांच्या स्वामित्वाची असून अद्यापिहीं शिवालयाच्या जागेसंबंधी कोर्टात झगडे चालू आहेत.

११