या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५५ विविध विचार
प्रकारचे लोक मुळींच नसावेत, असे आमचें म्हणणें नाहीं. तसे झाल्यास समाज मुळींच सुरळीत चालावयाचा नाहीं. पण त्यांचे कमीपण त्याला जितकें विघातक आहे तितकें त्यांचें अधिकपणही विघातक आहे. आमच्या इकडील अलीकडल्या सुशिक्षित लोकांनीं सरकारी नोकरीवर सगळा जीव ठेविल्यामुळे आपली किंमत किती कमी करून घेतली आहे बरें ? हाडांचीं कार्डे करून, व शेंकडों रुपये खर्च करून, बी. ए. पर्यंत अभ्यास करावा, आणि पुढे फळ काय ? तर रोव्हिन्यू खात्यांत, किंवा शाळाखात्यांत, ३०/३५ रुपये दरमहाची नोकरी ! चांगला सुतार सुद्धां तुमच्या शाळेचा उंबरठा न चढतां २५।३० रुपये सहज मिळवितो, हें या ग्राजुएटांस समजूं नये काय ? तसेंच कोठें १०।१२ रुपयांची जागा रिकामी झाली कीं, तीबद्दल पन्नास मॅट्रिक्युलेशन पास झालेल्या उमेदवारांचे अर्ज ! धिक् तुमची विद्या आणि तुमचें कर्तृत्व ! कष्टानें संपादिलेल्या विद्येचा असा सवंग विक्रय करावयाचा काय ? विद्यार्जनानें विकसित झालेलीं मनें स्वतंत्र धंदे स्थापण्याकडे लावाल, तर तुम्हांस अन्नाची किंवा मानाची काय वाण पडणार आहे ? पण खांदा देऊन काम करण्याची व दुसऱ्याचे गुलाम न होतां स्वतःच्या करामतीवर चरितार्थ संपादण्याची धमक आतां कोठें राहिली आहे ?

XXX
१६. आमची अन्नान्न दशा


 काय ही आमची दशा ! पृथ्वींतील साऱ्या लोकसंख्येचा सहावा भाग या देशांत राहतो; येथील जमीन सुपीक; येथें सर्व प्रकारच्या हवा; व्यापा- -यांची जहाजें चालण्याजोग्या येथे मोठमोठ्या नद्या येथील रानांत व डोंगरांत सांपडणार नाहीं अशा एका एका झाडाचें नांव घेण्याची मुष्कील; बहुतेक धातूंचा हवा तेवढा पुरवठा; तीन हजार वर्षांची आमची पुरातन सुधारणा; युरोपांतील राष्ट्रें अज्ञानतिमिरांत घोरत पडलीं असतां, नानाप्रकारच्या विद्यांत व कलांत आमच्या आम्हीं संपादिलेल्या प्रावीण्यामुळे सर्व पृथ्वीवर अद्यापि गाजत असणारा आमचा लौकिक-अशा प्रकारचे आम्ही हिंदू लोक असून, आज आम्हांस दुपारची नड कशी भागवावी, अशी प्रतिदिवश पंचाईत पडावी काय ? पंचवीस मनुष्यजंतूंपैकीं प्रत्येकास एक दिवस नाहीं,