या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

सात्त्विक वीरत्व,व्यापक तत्त्वज्ञान, विशाल दृष्टिकोन आणि सामान्य मनुष्याच्या लहानसहान सुखदुःखाविषयी वाटणारा विलक्षण जिव्हाळा इत्यादि दृष्टींनीं आगरकर आणि गांधीजी यांच्यांत फार साम्य आहे एकीकडे कायदेभंग करणारे महात्माजी दुसरीकडे शेळीच्या दुधांत कोणकोणते गुणधर्म आहेत याची चिकित्सा करीत बसलेले जसे आढळतात, त्याप्रमाणे एका लेखात सामाजिक क्रांतीचा संदेश हिरीरीनें देणारे आगरकर दुसऱ्या लेखांत पुणेरी जोड्यांच्या गुणावगुणांची मीमांसा करून जो 'कोणी वर सांगितलेल्या अडचणी व सोई मनांत आणून, आम्हांस मानवेल असा जोडयाचा नवीन नमुना तयार करून देईल त्याला आम्ही दहापासून पंधरा रुपये बक्षीस देऊं’ असें बक्षीस जाहीर करीत असलेले दिसतात. मनमोकळा विनोद हाही आगरकर आणि गांधीजी या दोघांचा एक आकर्षक विशेष आहे. वाढदिवसाच्या निमित्तानें 'आपणांला शंभर वर्षें आयुष्य लाभो' असा संदेश पाठविणाऱ्या मालवीयांना  'तुम्ही माझ्या आयुष्यांतलीं पंचवीस वर्षे कां कमी केलींत? मी सव्वाशें वर्षे जगणार आहें' असें उत्तर पाठविणारे गांधीजी आणि ‘माझ्या पावशेर मिशांचा फिल्टर म्हणून मला चांगलाच उपयोग होतो’ असें म्हणणारे आगरकर फार मोठे असूनहि सामान्य मनुष्याला जवळचे वाटतात याचें कारण त्यांची विनोदबुद्धि हेंच आहे.

मात्र आगरकर आणि गांधीजी यांच्या अंतिम ध्येयांत आणेि व्यक्तित्वाच्या अनेक पैलूंत जरी थोडेफार साम्य असले तरी ध्येयसिद्धीचे त्यांचे मार्ग अत्यंत भिन्न आहेत. उकाड्यानें दूध नासावें त्याप्रमाणे मनुष्यस्वभावामुळें श्रद्धेचें रूपांतर हां हां म्हणतां अंधश्रद्धेंत होत जातें, आणि ती अंधश्रद्धा समाजाच्या अधःपाताला कारणीभूत होते, हा इतिहासानें पुनःपुन्हां शिकवलेला धडा आगरकर क्षणभरहि विसरूं शकत नाहीत. मानवतेच्या दृष्टीनें चांगलें आणि वाईट, मंगल आणि अमंगल, इष्ट आणि अनिष्ट यांचा निर्णय करण्याचा अधिकार बुद्वीकडेच दिला पाहिजे असें ते आग्रहानें प्रतिपादन करतात. त्यांचा मनुष्याच्या आंतल्या आवाजावर भरंवसा नाहीं. मानवजातीच्या अनुभव-दुंदुभीचा गगनभेदी निनाद एकसारखा त्यांच्या कानांत घुमत आहे. त्यामुळे भावनाप्रधान व्यक्तीच्या आत्म ピーく ూ