पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-७-

मनावरचे दोन ताण


लोकनिर्मिति
 ज्यांना आपल्या देशांत लोकसत्ता प्रस्थापित करावयाची आहे त्यांनी प्रथम देशांत लोक निर्माण करणें अवश्य असतें. लोक याचा अर्थ नागरिक असा आहे. जुन्या काळचे प्रजाजन आणि लोकसत्ताकांतले नागरिक यांत फार फरक आहे. प्रजाजनांना व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य यांपैकी कोणतेंच स्वातंत्र्य नसतें. राजा त्यांना जाबबदार नसतो. त्याच्यावर प्रजाजनांचे कसलेंहि नियंत्रण नसते. सर्वस्वी अनियंत्रित असा त्याचा कारभार असतो. कायद्याचेंहि नियंत्रण त्याच्यावर नसतें; आणि लोकांनी केलेल्या कायद्यांचें राज्य हे तर लोकशाहीचें प्रधान लक्षण होय. राजांची अनियंत्रित सत्ता ज्यांच्यावर चालते व राजसत्तेची अनेक बंधनें ज्यांच्यावर असतात त्यांना नागरिक म्हणतां येणार नाही. शिवाय असें की, अनियंत्रित राजसस्ता जेथे असते तेथे बहुधा अनियंत्रित अशी धर्मसत्ताहि असते; आणि यामुळे अशा समाजांत फार विषमता असते; आणि ही विषमता बहुधा जन्मनिष्ठ असते. सरदार, जहागीरदार, इनामदार, खोत हे आपल्याला उच्च कुळांतले मानतात व सामान्य जनांना हीन लेखतात. असली उच्च-नीचता जेथे असते तेथे लोकसत्तेला अवश्य ते लोक म्हणजे नागरिक निर्माण होऊ शकत नाहीत. विचारस्वातंत्र्य, संघटनास्वातंत्र्य, मानवत्वाची प्रतिष्ठा हें नागरिकाचें प्रधान लक्षण होय. त्यावांचून तो राजसत्तेवर नियंत्रण ठेवूं शकत नाही. कायद्याने सर्वांना समान हक्क असल्यावांचून नागरिक अन्यायाचा प्रतिकार करूं शकणार नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, कायद्याचें राज्य हीं तत्त्वें समाजांत सुप्रतिष्ठित असल्यावांचून नागरिक निर्भय होऊं शकत नाही. यामुळेच पाश्चात्त्य देशांत लोकशाहीचा लढा जेथे जेथे झाला तेथे तो प्रथम या तत्त्वांच्या प्रतिष्ठापनेसाठी झाला.