पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १८१


नीति-प्रशंसा

पत्र नंबर ६५ : २४ जून १८४९

 मी आपले पत्रात ब्राह्मण जातीवर पुष्कळ हल्ला केला आहे. याजकरिता किती एक ब्राह्मणांस वाईट वाटत असेल. त्यांस मी त्यांची क्षमा मागून अशी विनंती करतो की, ब्राह्मणांचे दोषविवेचन मी फार केले आहे. याचे कारण आमचे लोकांत मुख्य ब्राह्मण. ते जे करतील तसे इतर वर्ततात. गाव-खेड्यांत देखील जो कुळकरणी, त्याचे पाया पडतात. म्हणून ब्राह्मणांचे सुधारणुकेस्तव मी झटतो. त्यांची सुधारणा झाली, म्हणजे सर्व हिंदू लोकांची जहाली.
 त्यांचे अज्ञान पाहून मला दया येते. राग येत नाही. जे मी लिहिले आहे, ते सर्व त्यांचे हिताकरिता आहे. मला खात्री वाटते की, सांप्रत काळी माझे पत्राचा आक्षरशः अर्थ करून त्यांतील आशय जाणतील. असे ब्राह्मण कोणी नाहीत. कदाचित हजारांत एक असेल. कारण की त्याचे अज्ञान अतिशय आहे. बाळपणापासून जी सवय झाली, ती सवय मोठेपणी कितीही सांगितले तरी जात नाही; परंतु मी आशा करितो की, पुढे जे होतकरू मुलगे आहेत ते ही पत्रे पाहून अज्ञानातून सुटतील आणि माझे अभिप्रायाचा विचार करतील. मग त्यांस जे पसंत वाटेल, ते ती करोत.
 आजचे ब्राह्मण असे आहेत की, हे पत्र हाती धरताच टाकून देतील व म्हणतील हे काय ? भलतेच लिहिले आहे. असो, त्यांचे अज्ञान त्यांचे कामास दिवसेंदिवस येत आहे. परंतु मला वाटते की, म्हातारे जुने ब्राह्मण आहेत ते असोत; परंतु नवीन उमेदवार त्यांनी आपले अंतःकरण ज्ञानेकरून व विचारेकरून पवित्र करावे, म्हणजे पुष्कळ फायदा होईल. मागील पत्रांत धर्मसुधारणा लिहिली आहे. ही बहुतांस भयंकर व किती एकांस दुर्घट वाटून किती एक पंडित व शास्त्री पुराणातील वाक्ये वर्णसंकर, कली इत्यादी म्हणतील, हे मला कळत आहे; परंतु महाराज, तुम्ही विचार कराल तर हा वर्णसंकर नव्हे. आता जो आहे तो वर्णसंकर खरा. जे ब्राह्मण भडवेपणा करतात, त्यांस तुम्ही पंक्तीस घेता व नीतिमान शूद्रास नीच मानता, हा वर्णसंकर खरा. शास्त्राचा आधार माझे मतास पुष्कळ आहे व तुम्ही विचार केला असता सापडेल. वेडात शिरू नका. ही धर्मसुधारणा झाल्याशिवाय तुमचा बंद खुला होणार नाही.