<poem> श्री गजानन विजय - अध्याय १

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती । जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥ कार्यारंभीं तुझें स्मरण । करित आले जन । मोठमोठाले विद्वान । साधुसंत सत्पुरुष ॥२॥ तुझ्या कृपेची अगाध शक्ति । विघ्नें अवघीं भस्म होतीं । कापुसाचा पाड किती । अग्नीपुढें दयाघना ! ॥३॥ म्हणून आदरें वंदना । करीतसे मी तुझ्या चरणां । सुरस करवी पद्मरचना । दासगणूच्या मुखानें ॥४॥ मी अज्ञान मंदमती । नाहीं काव्यव्युत्पत्ति । परी तूं वास केल्या चित्तीं । कार्य माझें होईल हें ॥५॥ आतां आदि माया सरस्वती । जी ब्रह्माची होय प्रकृती । जी कविवरांची ध्येयमूर्ती । ब्रह्मकुमारी शारदा ॥६॥ त्या जगदंबेकारण । असो माझें साष्टांग नमन । मी लेंकरुं आहें अजाण । अभिमान माझा धरावा ॥७॥ तुझ्या कृपेची अगाध थोरी । पांगळाही चढे गिरी । मुका सभेमाझारीं । देई व्याख्यान अस्खलित ॥८॥ त्या तुझ्या कीर्तीला । कमीपणा न आणी भला । साह्य दासगणूला । ग्रंथरचनेस करी या ॥९॥ आतां हे पुराणपुरुषा । पांडुरंगा पंढरीशा । सच्चिदानंदा रमेशा । "पाहि माम्" दिनबंधो ॥१०॥ तूं सर्वसाक्षी जगदाधार । तूं व्यापक चराचर । कर्ता करविता सर्वेश्वर । अवघे कांहीं तूंच तूं ॥११॥ जग, जन आणि जनार्दन । तूंच एक परिपूर्ण । सगुण आणि निर्गुण । तूंच कीं रे मायबापा ॥१२॥ ऐसा तुझा अगाध महिमा । जो न कळे निगमागमा । तेथें काय पुरुषोत्तमा । या गणूचा पाड असे ॥१३॥ रामकृपा जेव्हां झाली । तेव्हां माकडां शक्ति आली । गोप तेही बनले बली । यमुनातीरीं गोकुळांत ॥१४॥ तुझी कृपा व्हाया जाण । नाहीं धनाचें प्रयोजन । चरणीं होतां अनन्य । तूं त्यातें साह्य करिशी ॥१५॥ ऐसा संतांनीं डांगोरा । तुझा पिटला रमावरा । म्हणून आलों तुझ्या द्वारां । आतां विन्मुख लावूं नको ॥१६॥ हें संतचरित्र रचावया । साह्य करी पंढरीराया । माझ्या चित्तीं बसोनिया । ग्रंथ कळसा नेई हा ॥१७॥ हे भवभवान्तक भवानीवरा । हे नीलकंठा गंगाधरा । ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा । वरदपाणी ठेवा शिरीं ॥१८॥ तुझें साह्य असल्यावर । काळाचाही नाहीं दर । लोखंडासी भांगार । परीस करुन ठेवीतसे ॥१९॥ तुझी कृपा हाच परीस । लोखंड मी गणूदास । साह्य करी लेंकरास । परतें मजला लोटूं नको ॥२०॥ तुला अशक्य कांहीं नाहीं । अवघेंच आहे तुझ्या ठाईं । लेंकरासाठीं धांव घेई । ग्रंथ सुगम वदवावया ॥२१॥ माझ्या कुळीची कुलदेवता । कोल्हापुरवासिनी जगन्माता । तिच्या पदीं ठेवितों माथा । मंगल व्हाया कारणें ॥२२॥ हे दुर्गे तुळजे भवानी । हे अपर्णे अंबे मृडानी । ठेवी तुझा वरदपाणी । दासगणूच्या शिरावर ॥२३॥ आतां वंदन दत्तात्रया । पाव वेगीं मसीं सदया । गजाननचरित्र गाया । प्रसादासह स्फूर्ति दे ॥२४॥ आतां शांडिल्यादि ऋषीश्वर । वसिष्ठ गौतम पाराशर । ज्ञाननभीं जो दिनकर । त्या शंकराचार्या नमन असो ॥२५॥ आतां अवघ्या संतमहंता । नमन माझें सर्वथा । दासगणूच्या धरुन हाता । ग्रंथ करवा लेखन ॥२६॥ गहिनी निवृत्ति ज्ञानेश्वर । श्रीतुकाराम देहूकर । हे भवाब्धीचें तारुं थोर । त्या श्रीरामदासा नमन असो ॥२७॥ हे शिर्डिकर सांई समर्था । वामनशास्त्री पुण्यवंता । दासगणूसी अभय आतां । तुमचें असो द्या संत हो ॥२८॥ तुम्हां अवघ्यांच्या कृपेनें । मी हें करीन बोलणें । दासगणू मी तुमचें तान्हें । कठोर मजविषयीं होऊं नका ॥२९॥ जी कां खरी माया असते । तीच बोलाया शिकविते । तुमचें माझें असें नातें । मायलेंकापरी हो ॥३०॥ लेखणी काढी अक्षर । परी तो तिच्यांत नाहीं जोर । ती निमित्तकारण साचार । लेखनरुपी कार्याला ॥३१॥ दासगणू लेखणी येथ । तुम्ही धारण करा ती अवघे संत । ग्रंथरचना रसभरित । हीच आहे प्रार्थना ॥३२॥ आतां श्रोते सावधान । संतकथेचें करा श्रवण । करोनिया एकाग्र मन । निजकल्याण व्हावया ॥३३॥ संत हेच भूमिवर । चालते बोलते परमेश्वर । वैराग्याचे सागर । दाते मोक्षपदाचे ॥३४॥ संत हेच सन्नीतीची । मूर्ति होय प्रत्यक्ष साची । संत भव्य कल्याणाची । पेठ आहे विबुध हो ॥३५॥ त्या संतचरित्रास । श्रवण करा सावकाश । आजवरी ना कवणास । संतांनीं या दगा दिला ॥३६॥ ईश्वरी तत्त्वांचे वाटाडे । संत हेची रोकडे । हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे । भरले असती प्रत्यक्ष ॥३७॥ संतचरणीं ज्याचा हेत । त्याचा ऋणी रुक्मिणीकांत । आतां मलरहित करा चित्त । गजाननचरित्र ऐकावया ॥३८॥ भरतखंडामाझारीं । संत झाले बहुतापरी । ही न पर्वणी आली खरी । अवांतर देशाकारणें ॥३९॥ जंबुद्वीप हें धन्य धन्य । आहे पहिल्यापासोन । कोणत्या सुखाची ही वाण । येथें न पडली आजवरी ॥४०॥ याचें हेंच कारण । या भूमीस संतचरण । अनादि कालापासोन । लागत आले आहेत कीं ॥४१॥ नारद, ध्रुव, कयाधूकुमर । उद्धव, सुदामा, सुभद्रावर । महाबली अंजनीकुमर । अजातशत्रू धर्मराजा ॥४२॥ शंकराचार्य जगद्गुरु । जे पदनताचे कल्पतरु । जे अध्यात्मविद्येचे मेरु । याच देशीं झाले हो ॥४३॥ मध्व-वल्लभ-रामानुज । याचा ऋणी अधोक्षज । ज्यानें धर्माची राखिली लाज । निज सामर्थ्य दावोनिया ॥४४॥ नरसीमेहता तुलसीदास । कबीर कमाल सुरदास । गौरंग-प्रभूच्या लीलेस । वर्णन करावें कोठवरी ? ॥४५॥ राजकन्या मिराबाई । तिच्या भक्तीस पार नाहीं । जिच्यासाठीं शेषशायी । प्राशिता झाला विषातें ॥४६॥ गोरख-मच्छेंद्र जालंदर । जे का योगयोगेश्वर । ज्यांचा नवनाथ भक्तिसार । ग्रंथ असे लीलेचा ॥४७॥ ज्यांनीं नुसतीच हरिभक्ति । करुन साधिला श्रीपती । ते नामा नरहरी सन्मति । जनी कान्हो संतसखू ॥४८॥ चोखा-सावता-कूर्मदास । दामाजीपंत पुण्यपुरुष । ज्यांच्या कारणें वेदरास । गेला महार होऊन हरी ॥४९॥ मुकुंदराज जनार्दन । बोधला निपट निरंजन । ज्यांचीं चरित्रें-गायन । केलीं मागें महिपतींनीं ॥५०॥ म्हणून त्यांचीं नांवें येथ । मी न साकल्यें आतां देत । नुसते सांगतों वाचा ग्रंथ । भक्तिविजय भक्तमाला ॥५१॥ त्यानंतर जे जे झाले । त्या त्या संतां मी गाइले । ग्रंथ असती तीन केले । ते पहा म्हणजे कळेल कीं ॥५२॥ त्या संतांच्या तोडीचा । संत श्रीगजानन साचा । या अवतारी पुरुषाचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥५३॥ मीं जीं मागें गाईलीं । संतचरित्रें असतीं भलीं । तीं सारांशरुपें सांगितलीं । त्रय ग्रंथातून विबुध हो ॥५४॥ आतां हें सांगोपांग । चरित्र कथितों ऐका चांग । मम सुदैवें आला योग । हें चरित्र रचण्याचा ॥५५॥ जो प्रथमतांच मी पाहिला । आकोटासन्निध संत भला । तोच मागें राहिला । त्याचें ऐका कारण ॥५६॥ माळा आधीं ओविती । मग मेरुमणी जोडिती । तीच आजी झाली स्थिति । ह्या चरित्र रचण्याची ॥५७॥ शेगांव नामें वर्हाडांत । ग्राम आहे प्रख्यात । खामगांव नामें तालुक्यांत । व्यापार चाले जेथ मोठा ॥५८॥ ग्राम लहान साचार । परि वैभव त्याचें महाथोर । ज्याचें नांव अजरामर । झालें साधूमुळें जगत्रयीं ॥५९॥ त्या शेगांव सरोवरीं भलें । गजानन कमल उदया आलें । जें सौरभें वेधितें झालें । या अखिल ब्रह्मांडा ॥६०॥ हा शेगांव खाणीचा । हिरा गजानन होय साचा । प्रभाव त्या अवलियाचा । अल्पमतीनें वाणितों मी ॥६१॥ तें आतां अवधारा । गजाननचरणीं प्रेम धरा । येणें तुमचा उद्धार खरा । होईल हें विसरुं नका ॥६२॥ गजाननचरित्र मेघ थोर । तुम्ही श्रोते अवघे मोर । चरित्ररुपीं वर्षतां नीर । नाचाल वाटे निःसंशय ॥६३॥ शेगांवचे पौरवासी । परम भाग्याचे निश्चयेंसी । म्हणून लाधले तयांसी । गजानन हें संतरत्न ॥६४॥ जेव्हां करावें लागे पुण्य । तेव्हांच लाभती संतचरण । संतश्रेष्ठ देवाहून । येविषयीं शंका नसे ॥६५॥ रामचंद्र पाटलांनीं । केली माझी विनवणी । पंढरी क्षेत्रीं येऊनी । कार्तिकीच्या वारीला ॥६६॥ माझा मनीं हेत होता । गावें गजानन-चरित्रा । परी त्याची तत्त्वतां । संगत नाहीं लागली ॥६७॥ त्या माझ्या वासनेची । पूर्तता करण्यासाठीं । केली रामचंद्राची । योजना या समर्थें ॥६८॥ खर्या संताचें धोरण । न कळे कोणालागोन । महापुरुष गजानन । आधुनिक संत चूडामणी ॥६९॥ या महापुरुषाचा । ठावठिकाण कोणचा । वा पत्ता त्यांच्या जातीचा । इतिहासदृष्टया न लागे कीं ॥७०॥ जेवीं ब्रह्माचा ठावठिकाण । न कळे कोणालागून । ते ब्रह्मास पाहून । निश्चय त्याचा करणें असे ॥७१॥ जो कां हिरा तेजमान । पूर्णपणें असे जाण । तेज त्याचें पाहोन । ज्ञाते तल्लीन होती कीं ॥७२॥ तेथ त्या हिर्याची । खाण आहे कोणाचि । हे विचारीं आणण्याची । गरज मुळीं राहात नसे ॥७३॥ ऐन तारुण्याभीतरीं । गजानन आले शेगांवनगरीं । शके अठराशाभीतरीं । माघ वद्य सप्तमीला ॥७४॥ कोणी कोणी म्हणती जन । श्रीसमर्थांचें जें कां स्थान । त्या सज्जनगडाहून । या देशीं आले हे ॥७५॥ परियाला पुरावा । सबळ ऐसा नाहीं बरवा । परी कांहीं तरी असावा । अर्थ त्याच्या म्हणण्यांत ॥७६॥ लोक अवघे भ्रष्ट झाले । नाना यातनें गांजले । त्यांच्यासाठीं वाटतें केलें । कौतुक ऐसें समर्थांनीं ॥७७॥ जगाचा करण्या उद्धार । गजाननरुपें अवतार । धरुन आले महीवर । पुन्हां समर्थ सिद्धयोगी ॥७८॥ कोणत्याही कलेवरी । योगीपुरुष प्रवेश करी । ऐसा प्रकार भूमीवरी । जगद्गुरुंनीं केला असे ॥७९॥ गोरख जन्मला उकिरड्यांत । कानीफा गजकर्णांत । चांगदेव नारायण डोहांत । योनीवांचून प्रगटले ॥८०॥ तैसेंच येथें कांहींतरी । झालें असावें निर्धारी । गजाननासी अंगें सारीं । होतीं योगाचीं अवगत ॥८१॥ हें त्यांच्या लीलेवरुन । पुढें कळेल तुम्हां लागून । योगाचें अगाध महिमान । त्याची सरी न ये कोणा ॥८२॥ शेगांवीं माघमासीं । वद्य सप्तमी ज्या दिवशीं । हा उदय पावला ज्ञानराशी । पदनतातें तारावया ॥८३॥ त्या वेळची तुम्हां कथा । सांगतों मी ऐका आतां । एक भाविक गृहस्थ होता । नाम ज्याचें देविदास ॥८४॥ हा देविदास सज्जन । पातूरकरांचा वंशज जाण । शाखा ज्यांची माध्यंदिन । मठाधिपती होता तो ॥८५॥ त्याच्या एका मुलाची । ऋतुशांति होती साची । त्यानिमित्त भोजनाची । तयारी होती त्याचे घरा ॥८६॥ उष्टया पत्रावळी रस्त्यावर । टाकिल्या होत्या साचार । घराचिया समोर । त्या देविदास विप्राच्या ॥८७॥ तो गजानन समर्थसिद्धयोगी । बसले होते तया जागीं । एक बंडी होती अंगीं । जुन्या पुराण्या कापडाची ॥८८॥ कोणत्याहि उपाधीचें । नांव नव्हतें जवळीं साचें । पात्र पाणी प्यावयाचें । होता एक भोपळा ॥८९॥ कच्ची चिलीम हातांत । जी होती तयांची स्वकृत । कुंभाराच्या भट्टीप्रत । जिनें नव्हतें पाहिलें ॥९०॥ नासाग्र दृष्टि मुद्रा शांत । तपोबल अंगीं झळकत । प्राचीच्या वालरवीवत् । वर्णन किती करावें ॥९१॥ मूर्ति अवघी दिगंबर । भाव मावळला आपपर । आवडनिवड साचार । राहिली न जवळी जयाच्या ॥९२॥ ती समर्थांची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी । शोधन पत्रावळीचे करी । केवळ निजलीलेनें ॥९३॥ शीत पडल्या दृष्टीप्रत । तें मुखीं उचलुनी घालीत । हें करण्याचा हाच हेत । ’अन्नपरब्रह्म’ कळवावया ॥९४॥ कां कीं गर्जोन सांगे श्रुती । अन्न हेंच ब्रह्म निगुती । "अन्नम् ब्रह्मेति" ऐसी उक्ती । उपनिषदांठायीं असे ॥९५॥ त्याची पटवावया खण । शितें वेंचती दयाघन । त्याचा सामान्य जनांलागून । भावार्थ तो कळला नसे ॥९६॥ बंकटलाल आगरवाला । होता रस्त्यानें चालला । त्यानें हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह ॥९७॥ दामोदरपंत कुलकर्णी । त्यांच्या स्नेह्याचें नांव जाणी । दोघे तो प्रकार पाहोनी । आश्चर्यचकित जाहले ॥९८॥ आणि एकमेकांप्रत । बोलूं लागले ऐसें सत्य । कीं याची करणी विपरीत । वेडयापरी दिसतसे ॥९९॥ हा अन्नार्थी जरी असतां । तरी पात्र मागून घेता । देवीदासही यातें देता । कां कीं तोही सज्जन ॥१००॥ द्वारीं आलेला याचक । लावी ना सुज्ञ परत देख । कांहीं न चाले तर्क । कृतीवरुनी याच्या ह्या ॥१॥ बंकटलाल म्हणे पंतासी । ऐसेच उभें रस्त्यासी । आपण राहूं यत्कृतीसी । अजमावयाकारणें ॥२॥ खरे साधु पिशापरी । जगीं वागती वरवरी । ऐसी व्यासाची वैखरी । बोलली आहे भागवतांत ॥३॥ कृतीनें हा दिसे वेडा । परी वाटे ज्ञानगाडा । वा विमल ज्ञानाचा हुडा । असावा कीं प्रत्यक्ष ॥४॥ ऐसा विचार परस्पर । करुं लागले साचार । रत्न असतां समोर । पारखी तोच जाणे त्या ॥५॥ पंथें हजारों लोक गेले । परी न कोणी पाहिले । या दोघांवांचून भले । याचा विचार कर हो ! ॥६॥ हिरे गारा एक्या ठायीं । मिसळल्या असती जगा ठायीं । पारखी तो निवडून घेई । गार टाकून हिर्यातें ॥७॥ प्रथमता तो पुढें झाला । बंकटलाल आगरवाला । गजाननासी विचारण्याला । विनयानें येणें रीतीं ॥८॥ ह्या पत्रावळीच्या शोधना । कां हो करितां कळेना । क्षुधा असेल आपणां । तरी तरतूद करुं अन्नाची ॥९॥ त्यानें ऐसें विचारिलें । परि न उत्तर मिळालें । नुसतें वरी पाहिलें । उभयतांच्या मुखाकडे ॥११०॥ तो सतेज कांती मनोहर । दंड गर्दन पिळदार । भव्य छाती दृष्टि स्थिर । भृकुटी ठायीं झाली असे ॥११॥ निजानंदीं रंगलेला । ऐसा योगी पाहिला । मौनेंच नमस्कार केला । चित्तीं संतोष पावोनिया ॥१२॥ देविदासबुवासी । सांगूं लागले प्रेमेंसी । तुम्ही पात्र वाढून वेगेंसी । आणा एक बाहेर ॥१३॥ देविदासें तैसें केलें । पक्वान्नांनीं भरलेलें । पात्र आणून ठेविलें । द्वारासमोर स्वामीपुढें ॥१४॥ ठेविलेल्या पात्रावरी । भोजना बैसली समर्थस्वारी । चवी न कशाची अंतरीं । अणुमात्र उरली असे ॥१५॥ अनुपम ब्रह्मरसाला । जो पिऊन तृप्त झाला । तो कां मागतो गुळवण्याला । मिटक्या मारीत बैसेल ? ॥१६॥ जो सार्वभौम नृपवर । झाला असे साचार । अशा नरासी जहागीर । मिळाल्यासी प्रेम नुपजे ॥१७॥ अवघीं पक्वान्नें एक केलीं । आवडनिवड नाहीं उरली । जठराग्नीची तृप्ति केली । दोन प्रहरच्या समयाला ॥१८॥ बंकटलाल तें पाहून । पंतासी करी भाषण । ह्या वेडा म्हणालों आपण । ती निःसंशय झाली चुकी ॥१९॥ सुभद्रेसाठीं द्वारकेला । अर्जुन ऐसाच वेडा झाला । व्यवहाराचा विसर पडला । करुं लागला भलभलतें ॥१२०॥ तैसाच हा ज्ञानजेठी । मुक्तिरुप सुभद्रेसाठीं । वेडा झाला कसवटी । याची आतां घेणें नको ॥२१॥ धन्य आपुलें शेगांव । दृष्टी पाहिला योगीराव । "निरिच्छा" हा जहागीरगांव । दिला हरीनें जयाला ॥२२॥ सूर्य माध्यान्हीं आला । भाग भूमीचा तप्त झाला । पांखरें हीं आश्रयाला । जाऊन बैसलीं वृक्षावरी ॥२३॥ ऐशा भर उन्हांत । हा बैसला आनंदांत । हा ब्रह्मची होय साक्षात् । भय ना कशाचें उरलें या ॥२४॥ हा जेवळा यथेच्छपणीं । तुंब्यामध्यें नाहीं पाणी । तें पंता या लागुनी । आपण देऊं आणून ॥२५॥ पुसूं लागले दामोदर । तुंब्यामध्यें नाहीं नीर । मर्जी असल्या हा चाकर । पाणी द्याया तयार असे ॥२६॥ ऐसे शब्द ऐकिले । समर्थांनीं हास्य केलें । उभयतांसी पाहून वदले । तें ऐका सांगतों ॥२७॥ तुम्हां गरज असेल जरी । तरी आणून घाला वारी । एक ब्रह्म जगदांतरीं । ओतप्रोत भरलें असें ॥२८॥ तुम्ही आम्ही भेद तेथ । नाहीं उरला यत्किंचित । परी जगव्यवहार सत्य । आचरिला पाहिजे ॥२९॥ अन्न भक्षिलें देहानीं । म्हणून त्या पाहिजे पाणी । हा व्यवहार चतुरांनीं । अवश्य पाहिजे जाणिला ॥१३०॥ म्हणून तुमच्या चातुर्यासी । गरज असल्या तुम्हां साची । तरतूद करा पाण्याची । म्हणजे अवघें संपलें ॥३१॥ हें भाषण ऐकतां । दोघे हर्षले तत्त्वतां । बंकटलाल म्हणे पंता । आपुलें आहे भाग्य धन्य ॥३२॥ पाणी आणण्या दामोदर । घरांत गेले साचार । तों इकडे प्रकार । काय घडला तो ऐका ॥३३॥ कूपाचिया शेजारीं । हाळ होता निर्धारीं । जेथें जनावरें सारीं । पीत होतीं पाण्याला ॥३४॥ तेथें जाऊन पाणी प्याले । तृप्ततेचे ढेकर दिले । तों इतक्यांत घेऊन आले । पंत पाणी गडव्यांत ॥३५॥ हां हां तें गढूळ पाणी । समर्था न लावा वदनीं । तें जनावरालागुनी । योग्य आहे प्यावया ॥३६॥ मीं हें पहा आणिलें नीर । गोड निर्मळ थंडगार । वासित केलें साचार । वाळा घालून यामध्यें ॥३७॥ ऐसें भाषण ऐकतां । महाराज वदले तत्त्वतां । व्यावहारिक अवघ्या कथा । ह्या न सांगा आम्हां तुम्ही ॥३८॥ हें अवघें चरचर । ब्रह्में व्याप्त साचार । तेथें गढुळ,निर्मळ वासित नीर । हे न भेद राहिले ॥३९॥ पाणी तरी तोच आहे । निर्मळ गढुळ तोच पाहे । सुवास कुवास दोन्ही हें । रुप त्याचें निःसंशय ॥१४०॥ पिणाराही वेगळा । त्यापासून ना निराळा । ईश्वराची अगाध लीला । ती कळे या नरजन्मीं ॥४१॥ तें दिलें टाकून । व्यवहारीं गोविलें मन । यांचेंच करा सदा मनन । कशापासून जग झालें ॥४२॥ ऐसी ऐकतां समर्थवाणी । दोघे गेले गहिंवरोनी । अनन्यभावें समर्थचरणीं । लोळावया तयार झाले ॥४३॥ तो त्यांचा जाणोन हेत । महाराज निघाले पळत पळत । वायूच्या त्या गतिप्रत । अडथळा जगीं कोण करी ? ॥४४॥ यापुढील कथा पाही । निवेदन होईल द्वितीयाध्यायीं । अवधान द्यावें लवलाही । त्या श्रवण करावया ॥४५॥ हा गजाननविजय ग्रंथ । आल्हादवो भाविकांप्रत । हेंच विनवी जोडोन हात । ईश्वरासी दासगणू ॥१४६॥ श्रीहरिहरार्पणमस्तु॥ शुभं भवतु ॥ ॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]