<poem> ॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे कौसल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया । सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥१॥

ताटिका त्वां उध्दरली । अहिल्या शिळा सजीव केली । शबरीची पुरवली । इच्छा तूं दशरथे ॥२॥

भक्तरक्षणा कारण । सोडिलें नृपसिंहासन । वानर केलेसे बलवान् । केवळ आपल्या कृपेनें ॥३॥

शिळा तरल्या सागरीम । तुझ्या नामें रावणारी । बसविलास गादीवरी । भक्त आपला बिभीषण ॥४॥

जो जो आला शरण पदा । तुझ्या कीं हे आनंदकंदा । दैन्य, दुःख, आपदा । त्याच्या त्वां वारिल्यास ॥५॥

हें मनीं आणावें । दासगणूस सांभाळावें । बालकानें धांवावें । जननिविण कोणाकडे ? ॥६॥

तूं जननी जनिता सद्गुरु । तूं भक्तांना कल्पतरु । भवनदीचें भव्य तारूं । तूंच कीं रे रामराया ! ॥७॥

एक खेडेगांवचा । रहिवासी मेहकर तालुक्याचा । बंडूतात्या नांवाचा । ब्राह्मण होता विबुध हो ॥८॥

हा बंडूतात्या ब्राह्मण । सदाचारसंपन्न उदार होतें ज्याचें मन । गृहस्थाश्रम चालवी ॥९॥

श्रोते या प्रपंचांत । संकटें येती अतोनात । परी नाहीं पहा सुटत । लोभ त्याचा मानवा ॥१०॥

या बंडूतात्या घरीं । पाहुणे येती वरच्यावरी । तो अवघ्यांची साच करी । सरबराई निजांगें ॥११॥

ऐसा क्रम चालला । संचय अवघा संपला । आली पाळी बिचार्‍याला । कर्ज काढणें साहूचें ॥१२॥

घरदार पडलें गहाण । अगणित झालें तया ऋण । लोकांप्रती दावण्या वदन । लाज वाटूं लागली ॥१३॥

विकावया न कांहीं उरलें । सदन अवघें साफ झालें । भांडेंकुंडें तेंही गेलें । काय विपत्ती वर्णावी ? ॥१४॥

तगादे करिती सावकार । शिपाई धाडून वरच्यावर । भागवण्यासी दोन प्रहर । अडचण पडूं लागली ॥१५॥

कांता बोले टाकून । मुलें करिती अपमान । पत गेली उडून । उसनें न कोणी देती हो ॥१६॥

ऐशा तापें तापला । जीव द्याया तयार झाला । पैसा संपतां प्रपंचाला । कांहीं नसे किंमत ॥१७॥

जें सुखाचें वाटे स्थान । तेंच दुःखाचें निकेतन । संपून गेल्यावरी धन । सहज होतें न्याय हा ॥१८॥

बंडूतात्या विचार करी । जीव कोठें देऊं तरी । अफू खाऊन मरूं जरी । तरी ती घ्याया पैसा नसे ॥१९॥

जरी जाऊन विहिरीवरी । जीव हा मी देऊं तरी । तितुक्यांत कोणी येऊन वरी । जरी मला काढल्यास ॥२०॥

जीवही ना जाईल । उलटी फजीती होईल । सरकार शिक्षा देईल । आत्महत्यारा म्हणून मला ॥२१॥

यापेक्षां हिमालया । जावे वाटे जीव द्याया । आत्महत्येचा ते ठायां । दोषही ना लागेल ॥२२॥

ऐसा करूनि विचार । पडला घराच्या बाहेर । अखेरचा तो नमस्कार । केला त्यानें प्रपंचाला ॥२३॥

एक लंगोटी घातली । राख अंगा लाविली । तयानें ही युक्ति केली । ओळख आपुली बुजवावया ॥२४॥

श्रोते अब्रुदारासी । जननिंदेचें मानसीं । भय वाटे अहर्निशीं । हें सकळांसी ठाऊक ॥२५॥

बंडूतात्या म्हणे मनीं । हे दीनदयाळा चक्रपाणी । अवकृपा मजलागोनी । कां रे ऐसी केलीस ? ॥२६॥

तुझ्यावरी विश्वास माझा । पूर्ण होता अधोक्षजा । तूं रंकाचा करिसी राजा । ऐसें ऐकिलें पुराणीं ॥२७॥

तें सर्व खोटें झालें । प्रत्ययासी माझ्या आलें । व्यर्थ कवींनी रंगविलें । चरित्र तुझें नारायणा ॥२८॥

आतां जीव देतों परी । तुझ्यावरी मी श्रीहरी । याचा विचार कांहीं करी । हत्या नको घेऊं मम ॥२९॥

ऐसें मनीं बोलला । तिकिट घ्याया लागला । तों एक भेटला । विप्र त्यासी स्टेशनांत ॥३०॥

आतांच हरिद्वाराचें । तिकीट नको घेऊं साचें । घेऊन दर्शन संतांचें । मग जावें हरिद्वारा ॥३१॥

आपल्या वर्‍हाड प्रातांत । श्रीगजानन महासंत । आहेत अवतरले सांप्रत । त्यांच्या दर्शना जाय तूं ॥३२॥

संतदर्शन आजवरी । वायां न गेलें भूमीवरी । उगीच त्रासून अंतरीं । भलतें कांहीं करूं नको ॥३३॥

ऐसें बोलतां ब्राह्मण । तात्या गेला गोंधळून । म्हणे हा मनुष्य कोण ? । अवचित मसी भेटला ॥३४॥

किंवा यानें ओळखिलें । मी बंडूतात्या म्हणून भलें । कांहीं न माझा तर्क चाले । पुसुं तरी याते कसा ? ॥३५॥

कांहीं असो शेगांवासी । जाऊन वंदूं समर्थांसी । ऐसें बोलून मानसीं । शेगांवासी पातला ॥३६॥

दर्शना गेला ब्राह्मण । तों महाराज वदले हांसून । कां रे देशी जाऊन प्राण । हिमालयासी बंडूतात्या ॥३७॥

अरे आत्महत्या करूं नये । हताश कदापि होऊं नये । प्रयत्न करण्या चुकूं नये । साध्य वस्तु साधण्यास ॥३८॥

आतां जरी दिलास प्राण । प्रपंचाशीं त्रासून । तरी येशील घेऊन । जन्म पुन्हां ते भोगावया ॥३९॥

नको जाऊं हिमालया । गंगेमाजी प्राण द्याया । परत आपुल्या घरीं जाया । वेळ वेड्या करूं नको ॥४०॥

तिकीट घेतां जो भेटला । स्टेशनावरी ब्राह्मण तुला । ओळखिलें का सांग त्याला ? । तो कोण होता हें कांहीं ॥४१॥

जा आतां घरीं परत । राहूं नको लवही येथ । बापा तुझ्या मळ्यांत । आहे एक म्हसोबा ॥४२॥

त्या म्हसोबाच्या पूर्वेसी । बाभुळीच्या झाडापासी । खोदून पहा मेदिनीसी । दोन प्रहर रात्रीला ॥४३॥

काम जमीन खोदण्याचें । तूंच एकटा करी साचें । खालीं तीन फुटांचें । द्रव्य तुजला सांपडेल ॥४४॥

त्यांतून थोडें कर्जदारां । देऊनी ऋणमुक्त होई खरा । नको सोडूंस बायकापोरां । उसनें वैराग्य वाहूं नको ॥४५॥

ऐसे बोलतां गजानन । आनंदला तो ब्राह्मण । आला खर्ड्यास परतून । राख पुसून अंगाची ॥४६॥

रात्रीचिया वेळेला । मळ्यांत म्हसोबापासी आला । बाभूळीखालीं लागला । जमीन खोदाया कारण ॥४७॥

तों तीन फुटांवर । लागली श्रोते घागर । एक तांब्याची साचार । वेळणी होती जिच्या मुखा ॥४८॥

त्या तांब्याच्या घागरींत । मोहरा सोन्याच्या चार शत । पडल्या त्याच्या दृष्टीप्रत । मग काय विचारितां ? ॥४९॥

करीं घागर घेऊनिया । लागला तेथेंच नाचावया । जय जय गजानन गुरुराया । ऐसें मुखें बोलून ॥५०॥

त्याच द्रव्यें करून । फेडिलें त्यानें अवघें ऋण । मळा होता पडला गहाण । तोही आणिला सोडवोनी ॥५१॥

घडी बसली प्रपंचाची । ही गजाननकृपेनें साची । वृत्ति बंडूतात्याची । गेली अती आनंदून ॥५२॥

जेवीं मृत्यूची घटकां भरतां । अमृतकलश यावा हातां । वा सागरामाजीं बुडतां । तारूं दृष्टीस पडावें ॥५३॥

बंडूतात्यास तैसें झालें । दुःखाचे ते दिवस सरले । मग त्यानें पुढें केलें । येणें पहा शेगांवा ॥५४॥

दानधर्म तेथें केला । मोठ्या प्रमाणामाजीं भला । गजाननाच्या पदीं झाला । लीन अनन्यभावानें ॥५५॥

तई महाराज वदले त्यासी । आम्हांस कां रे वंदिसी ? । ज्यानें दिला आहे तुसी । द्रव्यघट तो वंदी तया ॥५६॥

आतां तरी येथून । खर्च करावा सांभाळून । उगे न करी उधळेंपण । त्यांत नसे सार कांहीं ॥५७॥

जन सुखाचे सोबती । निर्वाणीचा श्रीपती । त्याची सदैव करी भक्ती । तो न उपेक्षी कदा तुला ॥५८॥

ऐसा उपदेश ऐकिला । समर्थांसी वंदून भला । बंडूतात्या गांवास गेला । आपुल्या अती आनंदें ॥५९॥

एकेकालीं सोमवती । पर्व आले निश्चिती । जी कां अमावस्या येती । सोमवारीं ती सोमवती हो ॥६०॥

या सोमवतीचें महिमान । पुराणांत केलें कथन । या दिवशीं नर्मदास्नान । अवश्य म्हणती करावें ॥६१॥

म्हणून शेगांवची मंडळी । नर्मदेस जाया तयार झाली । तयारी त्यांनीं अवघी केली । पडशा वगैरे भरून ॥६२॥

मार्तंड पाटील बंकटलाल । मारुती चंद्रभान बजरंगलाल । यांनीं केला एक मेळ । ओंकारेश्वरीं जाण्याचा ॥६३॥

बंकटलाल म्हणे अवघ्यांसी । आपण जातों नर्मदेसी । घेऊं सांगातें महाराजांसी । स्नान कराया नर्मदेचें ॥६४॥

चौघे मठामाजीं आले । समर्थां विनवूं लागले । ओंकारेश्वरीं गुरुमाऊले । चला आमुच्या समवेत ॥६५॥

तुम्ही असल्याबरोबर । काळाचाही नाहीं दर । घाला आम्हांस पायांवर । त्या ओंकारेश्वराच्या ॥६६॥

हा अधिकार मातेविना । नाहीं पाहा इतरांना । आमुची विनंती हीच चरणा । न्यावें आम्हा नर्मदेसी ॥६७॥

तुम्ही आल्यांवांचून । आम्ही न हालूं येथून । बालहट्टालागून । जननी तीच पुरवीतसे ॥६८॥

महाराज म्हणाले तयासी । आहे नर्मदा माझ्यापाशीं । उगीच त्रास द्यायासी । जाऊं कशाला तिला मग ? ॥६९॥

मी या मठांत बैसुन । करीन नर्मदेचें स्नान । तुम्ही या सारे जाऊन । श्रीओंकारेश्वराला ॥७०॥

तेथें राजा पूर्वकालीं । मान्धाता भाग्यशाली । होऊन गेला महाबली । दिगंत ज्याची कीर्ति असे ॥७१॥

श्रीशंकराचार्य गुरुवर । यांनीं कराया जगदोध्दार । तेथेंच दीक्षा साचार । परमहंसाची घेतली ॥७२॥

जा जा तुम्ही तया स्थला । भेटा माझ्या नर्मदेला । मात्र नेऊं नका मला । उगाच आग्रह करून ॥७३॥

आतां पर्वाचें प्रयोजन । नाहीं राहिलें मजलागून । ऐसें ऐकतां चवघेजण । घट्ट धरिती पायांला ॥७४॥

कांही असो तेथवरी । चला आमुच्या बरोबरी । लगेच येऊं माघारी । स्नान करूनी नर्मदेचें ॥७५॥

महाराज म्हणाले ठिक ठिक । तुम्हीं दिसतां दांभिक । नर्मदेचें आहे उदक । या आपुल्या विहिरीमध्यें ॥७६॥

तिला टाकून आपण । तेथें कराया गेलों स्नान । तरी राग येईल दारुण । माझ्या त्या नर्मदेला ॥७७॥

म्हणून सांगतों तुम्हींच जावें । मला न आग्रहा करावें । माझें वचन मानावें । यांत तुमचें कल्याण ॥७८॥

मग मारुती चंद्रभान । करूं लागला भाषण । आम्ही घेतल्यावांचुन । आपणां न जाऊं कीं ॥७९॥

समर्थ म्हणाले मी तेथ । आल्य होईल विपरीत । मग तुम्ही दोष मात्र । देऊं नये आम्हांला ॥८०॥

ऐसें मठांत बोलणें झालें । अवघें ओंकारेश्वरा आले । पर्वासाठीं मिळाले । लोक तेथें अपार ॥८१॥

नर्मदेचे अवघे घाट । स्त्रीपुरुषांनी भरले दाट । मुंगीलाही नसे वाट । जाया हराच्या मंदिरीं ॥८२॥

कोणी स्नानास उतरले । कोणी संकल्प ऐकूं लागले । कोणी घेऊन बेलफुलें । जाऊं लागले मंदिरांत ॥८३॥

कोणी बर्फी पेढे खवा । बसून खाऊं लागले मेवा । थव्यामागें लागला थवा । तेथें भजनकर्‍यांचा ॥८४॥

पर्व संपेपर्यंत । अभिषेकाची मंदिरांत । गर्दी झाली अत्यंत । शब्द कोणाचा कोणा न कळे ॥८५॥

रम्यशा त्या ओंकारीं । समर्थाची बैसली स्वारी । पद्मासन घालूनी कांठावरी । त्या महानदीच्या नर्मदेच्या ॥८६॥

चौघे दर्शन घेऊन आले । समर्था विनवूं लागले । आतां पाहिजे सोडिलें । जाणें सडकेनें आपणा ॥८७॥

कां कीं भीड झाली फार । गाड्या मोडती वरचेवर । बैल गाडीचे बुजार । आहेत आपुल्या त्यांतूनी ॥८८॥

खेडीघाट स्टेशनाला । जाण्यायेण्याचा करार केला । गाडीवाल्यानें तो भला । न सांगतां गुण बैलांचे ॥८९॥

ते बसतां आले कळून । आपण होतां म्हणून । पोंचलों येथे येऊन । बैल द्वाड गाडीचे ॥९०॥

परत बसून गाडींत । जाणें न निर्भय वाटत । म्हणून या नावेंत । बसून जाऊं स्टेशनाला ॥९१॥

गर्दी झाली रस्त्यांनी । नदींतून जाऊ शांतपणीं । ऐसेंच केलें कित्येंकांनीं । त्या पाहा नावा चालल्यात ॥९२॥

तुम्हांस वाटेल तेंच करा । आम्हां न कांहीं विचारा । मी वचनांत गुंतलों खरा । तुम्ही बसाल तेथें येऊं ॥९३॥

ऐसें समर्थ बोलले । त्यांच्यासवें नावेंत बैसलें । गर्दीतून जाऊं लागले । खेडीघाट स्टेशनाला ॥९४॥

तों नदींत मध्यंतरीं । नाव आदळली खडकावरी । फळी फुटून गेली सारी । तिच्या बुडाची एक हो ॥९५॥

छिद्र पडलें आरपार । येऊं लागलें आंत नीर । नावाड्यानें सत्वर । नदींत उड्या टाकिल्या ॥९६॥

परी महाराज निर्धास्त होते । ' गिनगिन गणांत बोते ' । ऐसें भजन मुखातें । चाललें होतें अखंड ॥९७॥

मार्तंड बजरंग मारुती । घाबरून गेले अती । उडूं लागली धडधडा छाती । बंकटलालाची विबुध हो ॥९८॥

चवघे समर्थां बोलले । आम्ही अपराधी आहों भले । आम्हीं न तुमचें ऐकिलें । शेगांवांत दयाळा ॥९९॥

त्याचें दिलें आम्हां फळ । तुम्ही आज तात्काळ । नर्मदाच झाली काळ । आम्हांलागीं बुडवावया ॥१००॥

गुरुराया आपुली वाणी । वेदतुल्य मानूं येथूनी । वांचवा या संकटातूनीं । शेगांव दृष्टी पडूं द्या ॥१॥

ऐसें जों ते बोलतात । तों निंम्यावरी पाण्यांत । नाव बुडाली लोटत लोटत । एक फर्लांग गेली हो ॥२॥

कांहीं लोक बोलती ऐसें । मेली हीं पांच माणसें । आतां यांचा भरवंसा नसे । अथांग पाणी नर्मदेला ॥३॥

तई म्हणाले गजानन । नका होऊं हैराण । तुमच्या जीवालागून । धक्का न लावी नर्मदा ॥४॥

ऐसें म्हणून स्तवन केलें । नर्मदेचें त्यांनी भलें । हे चवघे बैसले । हात जोडून नावेंत ॥५॥

श्लोक ( अनुष्टुप छंद )

नर्मदे मंगले देवी । रेवे अशुभनाशिनी । मंतु क्षमा करी यांचा । दयाळू होऊनी मनीं ॥ ऐसें स्तवन चाललें । तों आंतील पाणी निघून गेलें । नर्मदेनें लाविलें । आपुल्या करास त्या छिद्रा ॥६॥

नाव श्रोते पहिल्यापरी । आली जलाचिया वरी ।

नावेच्या बरोबरी । होती प्रत्यक्ष नर्मदा ॥७॥

कोळणीचा धरला वेष । मस्तकावरी कुरळ केश । भिजविलें जियेच्या वस्त्रास । कंबरेपर्यंत जलानें ॥८॥

नौका कांठास लागली । अवघ्यांनी ती पाहिली । आश्चर्यचकित मुद्रा केली । पाहून तळीच्या छिद्राला ॥९॥

ही बाई होती म्हणून । आमुचे हे वांचले प्राण । बाई आपण कोठील कोण ? । हें कांहीं सांगा हो ॥११०॥

सोडा वस्त्र बिजलेलें । आम्ही नवें देतों भलें । तईं नर्मदेनें पहा केलें । ऐशा रीतीनें भाषण ॥११॥

मी ओंकार कोळ्याची कन्यका । माझें नांव नर्मदा ऐका । आम्हां परिपाठ आहे देखा । ओलें वस्त्र नेसण्याचा ॥१२॥

मी ओलीच राहतें निरंतर । माझेंच रूप आहे नीर । ऐसें बोलून नमस्कार । करून गेली गजानना ॥१३॥

क्षणामाजीं नाहींसी । झाली ती नर्मदेसी । वीज चमकून आकाशीं । घनीं जैसी लीन होते ॥१४॥

तों पहातां प्रकार । चवघे आनंदले फार । कळला स्वामींचा अधिकार । नर्मदा आली दर्शना ॥१५॥

बंकट विचारी खोदून । समर्था ही स्त्री कोण ? । तें सांगावें फोडून । गुप्त कांहीं ठेवूं नका ॥१६॥

तईं महाराज वदले तत्त्वतां । तुम्हीं जे कां विचारितां । तो कथिला आहे गाथा । नर्मदेनें तुम्हांस ॥१७॥

कोळी जो का ओंकार । तोच हा ओंकारेश्वर । माझेंच रूप आहे नीर । ऐसें नर्मदा वदलीना ? ॥१८॥

अरे ती प्रत्यक्ष नर्मदा । संशय तेथें न घ्यावा कदा । संकटामाजीं देतें सदा । हात ती आपुल्या भक्तातें ॥१९॥

म्हणून तिचा जयजयकार । करा मोठ्यानें एक वार । जय जय नर्मदे निरंतर । ऐसेंच रक्षण अंबे करी ॥१२०॥

ऐसें ऐकतां वचन । बंकटलालादि चवघे जण । समर्थांचे दिव्य चरण । वंदूं लागलें क्षणक्षणां ॥२१॥

परत आले शेगांवांत । ज्यांना त्यांना हीच मात । होऊनिया हर्षभरित । सांगूं लागले विबुध हो ॥२२॥

सदाशिव रंगनाथ वानवळे । एक्या गृहस्थासमवेत भले । शेगांवांत येते झाले । महाराजांच्या दर्शना ॥२३॥

या सदाशिवाकारण । टोपण नांव तात्या जाण । हे माधवनाथाचे छात्रगण । चित्रकूटच्या होते हो ॥२४॥

या माधवनाथाप्रत । योगांगे होतीं अवगत । ज्यांचा शिष्यगण माळव्यांत । आहे मोठ्या प्रमाणीं ॥२५॥

सदाशिव आले शेगांवाला । जेव्हां श्रीच्या दर्शनाला । तेव्हां महाराज भोजनाला । बसले होते मठांत ॥२६॥

सदाशिवासी पाहून । माधवाची झाली आठवण । गजाननाकारण । संत संता जाणती ॥२७॥

वानवळे येतांक्षणीं । महाराज बोलले मोठ्यांनीं । अरे नाथाच्या शिष्यालागुनी । बसवा आणून माझ्यापुढें ॥२८॥

त्यांचे गुरु माधवनाथ । गेले जेवून इतक्यांत । मठीं माझ्या समवेत । तों हे दोघे पातले ॥२९॥

थोडा वेळ आधीं जरी । हे आले असते तरी । भेट त्यांच्या गुरूची खरी । यांना येथें मठांत ॥१३०॥

आतां हे मागून आले । गुरु त्यांचे निघून गेले । विडा न घेतां भले । त्याची करूं पुर्तता ॥३१॥

वानवळ्यासी आलिंगन । देते झाले दयाघन । पोरें बंधूंचीं म्हणून । ऐसा तो संतप्रेमा ॥३२॥

रीतिप्रमाणें सत्कार केला । वानवळ्याचा शेगांवाला । जातांना त्या निरोप दिला । समर्थांनीं येणे रीतिं ॥३३॥

तुम्ही माधवनाथाला । असेच जा भेटण्याला । त्यांचा येथें राहिला । विडा तो त्या द्यायास ॥३४॥

मी म्हणतों तेंच सांगा । पदरचें न घाला बघा । आमच्या वाक्यामाजीं उगा । फरक तुम्ही करूं नये ॥३५॥

म्हणा " साथे भोजन हुवा । विडा तुम्हारा याही रहा । तो आम्ही आणिला पाहा । नाथां तुम्हां द्यावयास " ॥३६॥

हें सारें बोलणें । ऐकलें त्या वानवळ्यानें । घेऊन विड्याचीं दोन पानें । गमन करितां जाहला ॥३७॥

माधवनाथा हकीकत । त्यानें कथिली इत्थंभूत । महाराज आपण शेगांवांत । आला होता कां ते दिनीं ? ॥३८॥

गजानन जें बोललें । तैसेंच आहे जाहलें । भोजनसमयीं त्यांनीं केलें । स्मरण माझें तीच भेट ॥३९॥

ऐशा रीतिं एकमेकां । आम्हीं भेटतों सदैव देखा । येथें शंका घेऊं नका । स्मरण तीच भेट होय ॥१४०॥

त्यांचा माझा एक प्राण । शरीरे हीं मात्र भिन्न भिन्न । हें आहे खोल ज्ञान । तें न इतक्यांत कळे तुम्हां ॥४१॥

बरें झालें आणिला । आमुचा विडा तुम्हीं भला । जो होता राहिला । शेगांवीं शिष्य हो ॥४२॥

पानें देतां वानवळ्यांनीं । तीं भक्षिलीं नाथांनीं । खलबत्त्यांत कुटुनीं । थोडा प्रसाद दिला त्याला ॥४३॥

संतभेटी होती कैसी । हें चांगदेवपासष्टीसी । सांगते झाले ज्ञानराशीं । श्रीज्ञानेश्वर महाराज ॥४४॥

ती पासष्टी मनीं आणा । म्हणजे ह्या कळतील खुणा । स्वानुभवाच्या ठायीं जाणा । वाव न तर्काकारणें ॥४५॥

योगी वाटेल तेथोनी । भेटे एकमेकांलागूनी । भेट ठायीच बैसोनी । होतें त्याचें कौतुक हें ॥४६॥

शेख महंमद श्रीगोंद्यांत । तुकाराम होते देहूंत । आग लागतां मंडपाप्रत । देहूमाजीं कीर्तनाच्या ॥४७॥

ती श्रीशेख महंमदांनीं । विझविली श्रीगोंद्यांत बैसुनी । हें महिपतीनें लिहूनी । ठेविलें भक्तिविजयांत ॥४८॥

जाऊन हळी खेड्यांत । विहिरींत बुडतां पाटीलसुत । वांचविलें देऊन हात । महाराज माणिकप्रभूंनीं ॥४९॥

खरा योगी असल्याविना । ऐसें कौतुक होईना । हें न साधे दांभिकांना । त्यांनीं गप्पाच माराव्या ॥१५०॥

योग अवघ्यांत बलवत्तर । त्याची न ये कोणां सर । करणें असल्या राष्ट्रोध्दार । त्याचा अवलंब करा हो ॥५१॥

श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । ऐकोत सदा प्रेमळ भक्त । निष्ठा ठेवून ग्रंथावरी ॥१५२॥

शुभं भवतु ॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति चतुर्दशोध्यायः समाप्तः ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]