<poem> ॥ श्रीगणेशाय नमः ॥

जय जय सच्चिदानंदा श्रीहरी । कृपा करावी लौकरी । तुम्ही पदनताच्या वरी । कधीं न कठोर झालांत ॥१॥

तूं करुणेचा सागर । तूं दीन जनाचें माहेर । तूं भक्तासी साचार । कल्पतरु वा चिंतामणी ॥२॥

ऐसा तुझा अगाध महिमा । संत गाती राघवा रामा । दासगणूसी पुरुषोत्तमा । पावा वेळ करुं नका ॥३॥

असो बंकटलाला घरीं । राहाते झाले साक्षात्कारी । दीन दुबळ्यांचे कैवारी । श्रीगजानन महाराज ॥४॥

लांबलांबोनी भक्त येती । समर्थांतें वंदिती । मधु तेथें माशा जमती । न लगे करणें आमंत्रण ॥५॥

एके दिनी काय झालें । तें आतां सांगतों वहिलें । महाराज होते बसलेले । निजासनीं आनंदांत ॥६॥

ती प्रभातीची होती वेळा । प्राची प्रांत ताम्र झाला । पक्षी किलकिलाटाला । करुं लागले वृक्षावर ॥७॥

कुक्कुटाचे होती स्वप्न । मंदशीत वाहे पवन । वृद्ध करिती नामस्मरण । शय्येवरी बैसोनिया ॥८॥

उदयाचलीं नारायण । येऊं पाहे हर्षें करुन । तेणें तम पलायन । करुं लागला कंदरीसी ॥९॥

परम भाविक सुवासिनी । रत सडासंमार्जनीं । वत्स धेनूस पाहोनी । तोडूं लागलीं चर्‍हाटें ॥१०॥

ऐशा त्या रम्य वेळेस । एक साधु शेगांवास । येतां झाला दर्शनास । श्रीगजानन साधूच्या ॥११॥

तो भिकार गोसावी । मानमान्यता त्याची राहावी । कोठोनिया सांगा बरवी । श्रीमंताच्या मंडळींत ? ॥१२॥

भगवी चिंधी डोक्यास । झोळी वाम बगलेस । होती एक नेसण्यास । फाटकीसी लंगोटी ॥१३॥

मृगाजिनाचा गुंडाळा । पाठीवरी होता भला । ऐसा गोसावी बैसला । कोपर्‍यांत एकीकडे ॥१४॥

दर्शनासी भीड फार । होवो लागली साचार । अशा स्थितींत मिळणार । सवड कशी त्या गोसाव्यास ? ॥१५॥

तों ठायींच बैसोन । करुं लागला चिंतन । म्हणे समर्थाचे चरण । दृष्टि पडणें कठीण मला ॥१६॥

समर्थांचा लौकिक भला । मी काशींत ऐकला । आवडीनें नवस केला । भांग स्वामीस अर्पिण्याचा ॥१७॥

तो मम हेतु मनांत । जिरुन जाया पाहे येथ । या श्रीमान मंडळींत । माझ्या नवसास कोण पुसे ? ॥१८॥

गांजाचें नांव काढितां । लोक मजला देतील लाथा । मी तो आलों फेडण्याकरितां । नवस गांजाचा शेगांवीं ॥१९॥

माझ्या नवसाची ती मात । सांगू तरी कवणाप्रत ? । येथें एकही ना दिसत । प्रेमी या शांभवीचा ॥२०॥

जी वस्तु ज्या आवडे खरी । तिचाच तो नवस करी । आणि मानी सर्वतोपरी । हीच वस्तु उत्तम ॥२१॥

ऐसे नाना विचार । गोसावी करी साचार । झाला होता परम आतुर । दर्शन घ्याया समर्थांचें ॥२२॥

तें त्याचें मनोगत । जाणते झाले समर्थ । बोलते झाले इतरांप्रत । आणा काशीचा गोसावी ॥२३॥

तो पहा त्या कोपर्‍याला । आहे बिचारा दडून बसला । हें ऐकतां आनंद झाला । गोसाव्यास परमावधी ॥२४॥

आणि बोलला मनांत । त्रिकालज्ञ हे खरेच संत । मी जें बोललों मनांत । तें सर्व यांनीं जाणलें ॥२५॥

ज्ञानेश्वरींत षष्ठाध्यायीं । जी गोष्ट कथिली पाही । कीं स्वर्गलोकीच्या कथा त्याही । समजतात योगीवरा ॥२६॥

त्याचें आलें प्रत्यंतर । मला येथें साचार । धन्य धन्य हा साधुवर । त्रिकालज्ञ महात्मा ॥२७॥

न बोलतां माझा नवस । जाणतील हे पुण्य पुरुष । त्याचें प्रत्यंतर यावयास । अवधी उरला थोडका ॥२८॥

मंडळींनीं गोसाव्याला । पुढें आणोन उभा केला । तों महाराज वदले तयाला । काढ झोळीची पोटळी ॥२९॥

जी तीन महिनेपर्यंत । रक्षण केलीस झोळींत । त्या पोटळीचें आज येथ । होवो दे गा पारणें ॥३०॥

गोसावी पदीं लागला । गहिंवर त्यासी दाटला । गडबडा लोळूं लागला । बालकापरी स्वामीपुढें ॥३१॥

महाराज म्हणती गोसाव्यास । पुरे आतां उठोन बैस । पोटोळीच्या बुटीस । काढ बाहेर झोळीच्या ॥३२॥

नवस केलास ते वेळीं । नाहीं लाज वाटली । आणि आतां कां ही लाविली । चाळवाचाळवी निरर्थक ॥३३॥

गोसावी होता महा धूर्त । तो बोलला भीत भीत । जोडुनीया दोन्ही हात । ऐसें नम्र वाणीनें ॥३४॥

मी बुटी काढितों । नवस आपुला फेडितों । परि मागणें मागतों । एक तें द्या दीनाला ॥३५॥

आठवण माझ्या बुटीची । नित्य राहावी आपणा साची । हीच इच्छा मानसींची । आहे ती पूर्ण करा ॥३६॥

तुम्हां बुटीचें प्रयोजन । नाहीं हें मी जाणतों पूर्ण । परी बालकाची आठवण । राहाया बुटी स्वीकारा ॥३७॥

भक्त जी जी इच्छा करीत । ती ती ज्ञाता पुरवीत । अंजनीचा वृत्तान्त । आणा मनीं आपुल्या ॥३८॥

अंजनी होती वानरी । तिनें प्रार्थिला त्रिपुरारी । कीं तुम्हीं यावें माझ्या उदरीं । वानर होऊन शंकरा ! ॥३९॥

तें हरानें मानिलें । महारुद्र पोटीं आले । अंजनीचे पुरविले । मनोरथ चंद्रमौळींनीं ॥४०॥

तेथें शंकराकारण । आड ना आलें वानरपण । तेवीं माझ्या बुटीची आठवण । राहाया तीतें स्वीकारा ॥४१॥

त्यांतून तुम्ही कर्पूरगौर । साक्षात् आहां शंकर । म्हणून बुटीचा अव्हेर । करुं नको दयाळा ! ॥४२॥

ज्ञानवल्ली शंकरानें । म्हटलें आहे इजकारणें । ही इतरा आणील उणें । परि भूषण तुम्हांला ॥४३॥

महाराज किंचित्‌ घोटाळले । परि अखेर होय म्हणाले । माय पुरवी बालक-लळे । वेडेवांकुडे असले जरी ॥४४॥

गोसाव्यानें बुटी काढिली । हातावरी घेवोन धुतली । चिलमींत घालून पाजिली । पुण्यपुरुष गजानना ॥४५॥

ऐसा बुटीचा वृत्तान्त । काथलीसे कारणासहित । तो आणून ध्यानांत । विचार करणें प्रत्येकीं ॥४६॥

कांहीं दिवस राहोन । गेला गोसावी निघोन । आपणां धन्य मानोन । रामेश्वराकारणें ॥४७॥

ऐसी गांजाची पडली प्रथा । ते ठायीं तत्त्वतां । परी व्यसनाधीनता । नच आली समर्थांतें ॥४८॥

पद्मपत्राचियेपरी । ते अलिप्त होते निर्धारी । नये कोणास त्याची सरी । खरेंच अती थोर ते ॥४९॥

वेदऋचा अस्खलित । उदात्त-अनुदात्त स्वरांसहित । कधीं म्हणाव्या मुखीं सत्य । कधीं त्यांचें नांव नसे ॥५०॥

वेदाक्षरें पडतां श्रवणीं । साशंक व्हावें वैदिकांनीं । याच एका अनुमानीं । गजानन होते ब्राह्मण ॥५१॥

कधीं गवयासमान । अन्य अन्य रागांतून । एकच पदातें गाऊन । दाखवावें निजलीलें ॥५२॥

चंदन चावल बेलकी पतीया । प्रेम भारी या पदा ठाया । ते आनंदांत येवोनिया । वरच्यावरी म्हणावें ॥५३॥

कधीं गणगणाचें भजन । कधीं धरावें नुसतें मौन । कधीं राहावें पडून । शय्येवरी निचेष्टित ॥५४॥

कधीं वागावें पिशापरी । कधीं भटकावें कांतारीं । कधीं शिरावें जाऊन घरीं । एखाद्याच्या अवचीत ॥५५॥

असो त्या शेगांवांत । जानराव देशमुख विख्यात । होता त्याचा प्राणान्त । व्हावयाचा समय आला ॥५६॥

व्याधी शरीरीं वळावली । शक्ति पार निघून गेली । प्रयत्‍नांची कमाल केली । वैद्यांनीं ती आपुल्या ॥५७॥

नाडी पाहोन अखेर । आप्ता कळविला समाचार । प्रसंग आहे कठीण फार । नसे आशा वांचण्याची ॥५८॥

आम्हीं प्रयत्‍न केले अती । परी यश ना आलें तिळरती । यांना आतां घोंगडयावरती । काढोन ठेवा हेंच बरें ॥५९॥

तें ऐकतां अवघे आप्त । दुःख करती अत्यंत । जानरावा आम्हां प्रत । सोडून तूं जाऊं नको ॥६०॥

तुझ्याप्रीत्यर्थ नवस केले । नाना दैवतांलागीं भले । परी न कोणी पावले । हाय हाय रे दुर्दैवा ॥६१॥

वैद्यानें टेकिले हात । प्रयत्‍न झाले कुंठित । आतां अखेरच्या यत्‍नाप्रत । करोन पाहूं एक वेळा ॥६२॥

बंकटलालाचिये घरीं । आहेत एक साक्षात्कारी । यांच्या योगें शेगांव नगरी । झाली प्रती पंढरपूर ॥६३॥

साधूनें आणिल्या मनांत । काय एक नाहीं होत । सच्चिदानंदबाबाप्रत । ज्ञानेश्वरानें उठविलें ॥६४॥

त्याचें पाहूं प्रत्यंतर । जा जा कोणी जोडा कर । नका करुं रे उगा उशीर । वेळ अंतसमायाची ॥६५॥

तें ऐकोनी एक आप्त । आला बंकटसदनाप्रत । जानरावाची हकीकत । बंकटलाला कथन केली ॥६६॥

जानराव देशमुखाचा । समय अंतकाळाचा । आला आहे जवळी साचा । म्हणून आलों तुम्हांकडे ॥६७॥

महाराजांचें चरणतीर्थ । द्या कृपा करोनी मजप्रत । तें तीर्थ नोहे अमृत । होईल वाटे जानरावा ॥६८॥

बंकटलाल म्हणे त्यावरी । ही गोष्ट न माझ्या करीं । तुम्ही करावी अत्यादरीं । विनवणी आमुच्या वडिलाला ॥६९॥

जसें त्यानें सुचविलें । तैसें आप्तें तात्काळ केलें । भवानीरामा विनविलें । द्याया तीर्थ समर्थांचें ॥७०॥

भवानीराम सज्जन । होता मनाचा दयाळु पूर्ण । दुसर्‍याचें दुःख ऐकून । सज्जन तेच विव्हळ होती ॥७१॥

प्याल्यामध्यें भरुन पाणी । समर्थांच्या लाविलें चरणीं । आणि केली विनवणी । तीर्थ देतो जानरावा ॥७२॥

समर्थें तुकाविली मान । तीर्थ पाजिलें नेऊन । जानरावाकारण । घरघर घशाची बंद झाली ॥७३॥

हात हालवूं लागला । किंचित् डोळा उघडीला । उतार पडूं लागला । तीर्थप्रभावें देशमुखासी ॥७४॥

तो पाहतां प्रकार । आनंदले नारीनर । सत्पुरुषाचा अधिकार । आला कळून सर्वांसी ॥७५॥

मग औषधी बंद केली । तीर्थीं भिस्त ठेविली । ज्या-योगीं लाभती झाली । आरोग्यता जानरावा ॥७६॥

आठ दिवसांमाझारीं । जानराव झाला पहिल्यापरी । भवानीरामाचीये घरीं । आला दर्शना समर्थांच्या ॥७७॥

पहा संतांचें चरणतीर्थ । साधनांत झालें अमृत । संत न ते साक्षात्‌ । देव कलीयुगीचे ॥७८॥

येथें एक ऐसी शंका । उत्थान पावे सहज देखा । श्रीगजाननासारिखा संत होता शेगांवीं ॥७९॥

मग तो तेथें असतांना । गेलें न पाहिजे कोणी जाणा । यमाजी पंताचीया सदना । परि हाच आहे कुतर्क ॥८०॥

संत मृत्यु ना टाळिती । निसर्गाप्रमाणें वागती । परि संकटांतें वारिती । अगांतुक असल्यास ते ॥८१॥

सच्चिदानंदबाबासी । ज्ञानेशें उठविलें नेवाशासी । परि ते अखेर आळंदीसी । देह ठेविते झाले हो ॥८२॥

याचें रहस्य इतुकेंचि आहे । हें गंडांतर टाळिती पाहे । तें टाळणें कांहींच नोव्हे । अशक्य संत पुरुषाला ॥८३॥

मृत्यूचे तीन प्रकार । आहेत जगीं साचार । त्यांचीं नांवें क्रमवार । देतों तुम्हांकारणें ॥८४॥

आध्यात्मिक आधिभौतिक । आणि तिसरा तो आधिदैविक । त्या तिघांमाजीं बलिष्ठ देख । आध्यात्मिक मृत्यु असे ॥८५॥

आधिभौतिकाची तयारी । कुपथ्यानें होते खरी । नाना प्रकारच्या शरीरीं । व्याधि निर्माण होतात ॥८६॥

त्यांचा जोर झाल्यावर । मृत्यु येतो अखेर । त्या मृत्यूचा परिहार । करितां येतो औषधीनें ॥८७॥

मात्र औषधी देणारा । शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा । औषधीचा पसारा । आहे अवगत जयासी ॥८८॥

एसा वैद्य भेटल्यास । आधिभौतिकाचा होय नाश । तैसे आधिदैविकास । नवस सायास घालविती ॥८९॥

हें गंडांतर रुपाचें । मृत्यु दोन प्रकारचे । भौतिक आणि दैविक साचे । हे आहेत ख्यात जगीं ॥९०॥

मृत्यु जो कां आध्यात्मिक । तो कवणाच्यानें न टळे देख। पाहा अर्जुनाचा बालक । कृष्णासमक्ष पडला रणीं ॥९१॥

तैसा जानरावाचा । मृत्यु गंडांतर स्वरुपाचा । होता तो टाळिला साचा । समर्थतीर्थ देवोनिया ॥९२॥

म्हणजे गंडांतरा कारण । निवारिती साधुचरण । तेंच आलें घडोन । शेगांवामाझारीं ॥९३॥

कांहीं मृत्यु नवसांनीं । टाळिता येती या जनीं । परी तो नवस श्रद्धेनीं । केला पाहिजे विबुध हो ! ॥९४॥

श्रद्धा पूर्ण असल्यावरी । तीच मृत्यु टाळी खरी । श्रद्धाच अवघ्या माझारीं । सर्व बाजूंनीं श्रेष्ठ असे ॥९५॥

चरणतीर्थ साधूचें । तेंही टाळी मृत्यु साचे । वरील दोन प्रकारचे । परी तो साधु पाहिजे ॥९६॥

साधू असल्या वेषधारी । ऐसी न होय गोष्ट खरी । माती न होय कस्तूरी । हें ध्यानीं असूं द्या ॥९७॥

षड्‌विकार धुतल्याविना । अंगीं साधुत्व येईना । आणि साधूविण होईना । अघटित कृत्य केव्हांही ॥९८॥

म्हणून बहुरुप्याकारण । जपणें आहे अवश्य जाण । उगीच पाहून पिवळेपण । सोनें पितळेस मानूं नका ॥९९॥

गजानन नव्हते वेषधारी । ते पूर्ण साक्षात्कारी । म्हणून तीर्थानें झाली बरी । व्याधि जानरावाची ॥१००॥

देशमुख बरा झाल्यावर । भंडारा घातिला थोर । साधुप्रीत्यर्थ साचार । बंकटलालाचिये घरीं ॥१॥

तीर्थें देशमुख बरा झाला । परी स्वामीशीं पेंच पडला । त्यांनीं मनासी विचार केला । तो ऐका येणेंरितीं ॥२॥

कडकपणा धरल्याविना । ही उपाधी टळेना । स्वार्थसाधु प्रापंचिकांना । साधुत्वाची चाड नसे ॥३॥

त्या दिवसापासून । आणूं लागलें अवसान । स्वामी महाराज दयाघन । वरपांगी कडक झाले ॥४॥

हा त्यांचा कडकपणा । असह्य झाला इतरांना । परी त्यांच्या भक्तांना । कांहीं न त्याचें वाटलें ॥५॥

जेवीं नरसिंह अवतार । इतरांसी वाटला क्रूर । परी कयाधूचा कुमार । मुळीं न भ्याला त्या रुपा ॥६॥

वाघीण इतरा भयंकर । परी तिचें जें का असेल पोर । तें तिच्याच अंगावर । निर्भयपणें क्रीडा करी ॥७॥

असो आतां गोष्ट दुसरी । सांगतों मी तुम्हां खरी । कस्तुरीच्या शेजारीं । बसल्या माती मोल पावे ॥८॥

चंदनाचा शेजार । असला थोडा बहुत हिवर । वासित होतो साचार । हा न्याय निसर्गाचा ॥९॥

वासित हिवर झालेला । चंदन मानील आपणाला । तरी त्याच्या फजितीला । पारावार न राही पुढें ॥११०॥

जेथें ऊंस निपजतो । तेथेंच निवडुंग उगवतो । जेथें मोगरा वाढतो । तेथेंच येतो पिंगूळ ॥११॥

जेथें साधु सज्जन । तेथेंच मैंद निर्माण । हिरे गारा एकवटून । खाणीमाजी राहाती ॥१२॥

स्थान एक म्हणून । किंमत नाहीं समान । तेज हिर्‍याचें हिर्‍यालागून । भूषवी न गारेला ॥१३॥

गार ती गारची राही । पायाखालीं तुडविली जाई । ऐसी स्थिति कधीं न येई । अमोलिक हिर्‍याला ॥१४॥

श्रीगजाननाचे सन्निध । ऐसाच होता एक मैंद । संतसेवा हाच मद । अंगीं ज्याच्या भरला असे ॥१५॥

तो सेवा करी वरी वरी । भाव निराळा अंतरीं । मिठाई पेढे सावरी । समर्थांच्या नांवावर ॥१६॥

भक्तगणांस ऐसे म्हणे । मी समर्थकृपेचें पोसणें । प्रत्येक काम माझ्याविणें । होत नाहीं ये ठायां ॥१७॥

मी कल्याण समर्थांचा । अत्यंत आहे आवडीचा । कधीं न खालीं जावयाचा । शब्द माझा त्यांच्यापुढें ॥१८॥

चिलीम त्यांची मीच भरी । खाण्यापिण्याची तयारी । निजांगें मीच करी । अत्यंत मी आवडीचा ॥१९॥

ऐसें लोकांस सांगतसे । आपला सवरात करीतसे । त्या अधमाचें नांव असें । माळी विठोबा घाटोळ ॥१२०॥

महाराज स्वयमेव शंकर । हा बनला नंदिकेश्वर । हमेशा करी गुरगुर । आल्या गेल्या भक्तांवरी ॥२१॥

तें अंतर्ज्ञानांनीं । जाणिलें सर्व समर्थांनीं । कौतुक केलें एके दिनीं । तें ऐका विबुध हो ॥२२॥

परस्थ कांहीं मंडळी । शेगांवीं दर्शना आली । तों मूर्ति होती निजलेली । समर्थांची शय्येवर ॥२३॥

हिय्या कुणाचा होईना । जागे करण्या समर्थांना । मंडळीस होती जाणा । त्वरा पुढें जाण्याची ॥२४॥

ते कुजबुज करुं लागले । विठोबाला विनविते झाले । विठोबा आम्हां पाहिजे गेलें । येथून आतांच परगांवा ॥२५॥

काम निकडीचें आहे फार । कैसा करावा विचार । महाराज तों शय्येवर । असती निद्रिस्त जाहले ॥२६॥

त्यांचें दर्शन घेतल्याविना । आमचा पाय निघेना । हें अवघड काम होईना । तुझ्यावांचून ये ठायीं ॥२७॥

तूं समर्थांच्या शिष्यांत । मुख्य धोरणी महा धूर्त । तुला आम्ही जोडितों हात । एवढें काम करावें ॥२८॥

ऐशा त्या स्तुतींनीं । विठोबा फुगून गेला मनीं । त्यानें जाऊन तत्‌क्षणीं । महाराजांस उठविलें ॥२९॥

मंळळींचें काम झालें । परी संकट ओढवलें । घाटोळ विठोबावरी भले । कर्म जैसें तैसें फल ॥१३०॥

समर्थांच्या हातीं काठी । एक होती भली मोठी । तीच त्यांनीं घातली पाठीं । त्या विठोबा माळ्याच्या ॥३१॥

म्हणती बेटा माजून गेला । आपुली स्थिति विसरला । या लुच्च्यानें आरंभीला । उघड उघड व्यापार कीं ॥३२॥

मला लावितो उपाधी । घंटे आणून बांधितो मठीं । घुमारे घाली कधीं कधीं । ऐसा अती नीच हा ॥३३॥

त्या घुमर्‍याचें बक्षीस । घे मी देतों तुला खास । तुजवरी केल्या कृपेस । होईन प्रभूचा अपराधी ॥३४॥

सोमला साखर मानूं नये । विषा जवळ करुं नये । तस्करासी लेखूं नये । निजकंठींचा ताईत ॥३५॥

ऐशा रीतीं ठोकला । छडयाखालीं घाटोळाला । विठोबा तो पळाला । पुनः न आला मागुती ॥३६॥

खरे जे कां असती संत । ते ते ऐसेंच करितात । ढोंगी मात्र जातात । अशाचिया करांमध्यें ॥३७॥

म्हणजे अधिकारावांचून । ढोंगी बैसती होऊन । संत नादीं लावण्या जन । ऐसे प्रकार किती तरी ॥३८॥

मतलबी त्यांना साथ देती । उदो उदो त्यांचा करिती । भलभलते सांगताती । साक्षात्कार ढोंग्यांचे ॥३९॥

तेणें दोघांचें काम होई । अपार पैसा मिळविला जाई । परी ही प्रथा बरी नाहीं । समाज जाईल रसातळा ॥१४०॥

खरे जे कां असती संत । ईश्वराचे निःसीम भक्त । त्यांना न मुळीं आवडत । सान्निध्य त्या षंढाचें ॥४१॥

पतिव्रतेसी शेजार । कसबिणीचा कां पटणार ? । सोन्याप्रती अलंकार । काय शोभती कथलाचे ? ॥४२॥

संत शठातें राखिती । परी न त्याला महत्त्व देती । ती जगांतील एक व्यक्ति । कृतकर्म भोगण्या आली असे ॥४३॥

ऐसें मानसीं समजून । त्याविषयीं धरिती मौन । जेवीं निवडुंगालागून । स्थान भूमी देते हो ॥४४॥

मोगरा निवडुंग आणि शेर । हीं जमीनीचीं लेंकरं । परि किंमतीचा प्रकार । निरनिराळा तो तिघांचा ॥४५॥

मोगर्‍याचें संरक्षण । करिती निवडुंगाचें दहन । चिलटांसाठीं बांधून । शेर ठेविती दारावरी ॥४६॥

तेवीं संत भूमिपरी । रक्षण अवघ्यांचें करिती जरी । किंमतीमाजीं ठेविती परी । गुणांप्रमाणें भेद पाहा ॥४७॥

नशीब विठोबा घाटोळाचें । अति खडतर होतें साचें । पाय लाभून साधूचें । दैवें दूर झालें कीं ॥४८॥

जरी तो ना ढोंग करिता । तरी योग्यतेप्रती चढता । संतांची ती योग्यता । त्यानें मुळीं ना जाणिली ॥४९॥

कल्पवृक्षाच्या तळवटीं । बसून इच्छिली गारगोटी । वा मागितली करवंती । कामधेनूपासून ॥१५०॥

ऐसें न कोणी करावें । संतापासीं राहून बरवें । तेथें विचारा ठेवावें । अहर्निशीं जागृत ॥५१॥

हा दासगणूविरचित । श्रीगजाननविजय ग्रंथ । तारक होवो भवाब्धींत । अवघ्या भाविकांकारणें ॥१५२॥

श्रीहरिहरापर्णमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]