ग्रामजोश्यासंबंधी जाहीर खबर

(ग्रामजोश्यांच्या हक्काबद्दलच्या मोकदमा नंबर ८३१ सन १८८४ यांतील हंशील.)
जाहीर खबर

सर्व हिंदु धर्मानुयायी त्यांतून मुख्यत्वेंकरून मराठे, माळी, कुणबी, कोळी, धनगर वगैरे जातीचे लोकांस ह्या पत्राद्वारे जाहीर करण्यांत येते की, ब्राह्मण लोक आमचे लोकांकडून लग्नकार्यास किंवा देवदेवतांच्या पूजाअर्च्या करण्यासमयीं आणि इतर शुभाशुभ कार्याचे वेळीं मनास वाटेल त्याप्रमाणे यजमानाकडून अडवून पैसे घेतात. ह्या सर्व कारणांकरिता व प्रत्येक मनुष्यास आपापले धर्मसंबंधी कार्य करण्यास हिंदु शास्त्राची पूर्ण सत्ता असल्यामुळें आज कित्येक दिवसांपासून वर दर्शविले जातींचे लोक ह्या मुंबई इलाख्याचे कित्येक भागावर ब्राह्मणांचे (भटांचे) साह्याशिवाय वर दर्शविलेलीं धर्मसंबंधी कार्यें करीत आहेत; परंतु हें करणें भट लोकांस न आवडून व त्यांचे रक्ताचें पाणी झाल्याशिवाय फुकट मिळत असलेलीं उत्पन्नें बुडूं पहात आहेत, हें जाणून जुन्नर प्रांतातील भटांनी ओतूर येथील कांही जोशांस पुढें करून रा॰ बाळाजी उर्फ काशीबा कुशाजी पाटील डुमरे, ओतुरकर यांनीं आपल्या दोन मुलींची लग्नें स्वतः लाविलीं म्हणून भटांची ६॥ रुपये नुकसान झाली, यास्तव ती नुकसान सदरचे बाळाजी यांजकडून भरून घेण्याकरितां वामन जगन्नाथ, शंकर बापुजी, बळवंत सखाराम, रामचंद्र सदाशिव जोशी, उदास या सर्वांनी जुन्नर कोर्टांत फिर्याद केली. सांप्रतचे काळास अनुसरून पहातां भटांचा कोणत्याही प्रकारचा हक्क इतर लोकांवर पोंचत नाहीं, हे न्यायदृष्टीने उघड असून न्यायाधीश महादेव श्रीधर, सबार्डिनेट जज्ज, जात ब्राह्मण यांनी आपले ब्राह्मण फिर्यादीचे स्वरूपाकडे पाहून ता॰ २९ मार्च सन १८८६ इसवी. रोजीं असा ठराव केला की, प्रत्येक लग्नाबद्दल प्रतिवादी बाळाजी पाटील डुमरे यांनी ४ आणे म्हणजे दोनी लग्नांबद्दल ८ आणे द्यावेत असा ठराव केला. ह्या ठरावाबद्दल वरिष्ठ कोर्टांत प्रतिवादी यांजकडून अपील होणें आहे व अपीलाचा निकाल लागेपर्यंत आमचे लोकांनी म्हणजे ज्यांचे येथें लग्नकार्यें होतील व जेथें भटजी किंवा ग्रामजोशी लग्न लाविण्याबद्दल हक्काने पैसा मागतील, तेथें प्रत्येक लग्नाबद्दल मशारनिल्हे रा॰ सा॰ सबजज्ज यांच्या ठरावान्वये तूर्त चारच आणे लग्न साडे वगैरे विधि करून घेतल्यानंतर द्यावे लागतील व हे सबजज्ज साहेबांच्या फैसल्यावरून सर्वांस कळविण्यात येत आहे.


फिर्यादाचा क्रमांक ८३१, सन १८८४ चा

जुन्नर कोर्टाचा शिक्का
JUDGE JUNAR SUBORDINATE COURT

जोतीराव गोविंदराव फुले.
नारायण मेघाजी लोखंडे.
भाऊ कोंडाजी पा. डुंबरे.
रामचंद्र तुकाराम हेजीब.
लक्ष्मण गणुजी शेटे.
विश्राम कुशाजी पा. पवार.
रावजी मल्हारजी बोकड.
संतु रामजी लाड.
चिमणाजी मथाजी पा. डुंबरे
गणु बापुजी पा. डुंबरे.

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.