आतां अवधारा ग्रंथकथन । कल्पादि हें पुरातन । हरिब्रह्मयांचें जुनाट ज्ञान । तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२५॥
जेणें संतोषती ज्ञानसंपन्न । सुखें सुखरुप होती मुमुक्षुजन । तें हें हरिब्रह्मयांचें ज्ञान । तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२६॥
जो जडमूढ होता तटस्थ । तो चौश्लोकीं जाण नेमस्त । ब्रह्मा केला ज्ञानसमर्थ । तो अगाध ज्ञानार्थं अवधारा ॥२७॥
पावोनि चतुः श्लोकीचें ज्ञान । ब्रह्मा झाला ज्ञानसंपन्न । करितां सृष्टीचें सर्जन । तिळभरी अभिमान बाधीना ॥२८॥
त्या ज्ञानाची रसाळ कथा । मर्हाबटीया सांगेन आतां । येथें अवधान द्यावें श्रोतां । हे विनवणी संतां सलगीची ॥२९॥
पूर्ण सलगी दिधली स्वामी । ह्नणोनि निः शंक झालों आह्मी । परी जें जें बोलेन ज्ञानांग मी । तें सादर तुह्मी परिसावें ॥३०॥
ऐसे प्रार्थुनी श्रोतेजन । प्रसन्न केले साधुसज्जन । पुढील कथेचें अनुसंधान । एका जनार्दन सांगेल ॥३१॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.