चतुःश्लोकी भागवत/वैकुंठ स्थिति

ज्या लोकाची निजस्थिती । शुद्धसत्वजन वर्तती । रजतममिश्रित गती । ज्या लोकाप्रती असेना ॥६९॥
नवल ते लोकींचा ठसा । बाल्यतारुण्यवृद्धदशा । नाहीं तेथें तिन्ही वयसा । क्षय आहे कैसा हें नेणिजे ॥७०॥
तेथें समूळ माया नाहीं । मा कलिविक्रम कैंचा ते ठायी । मोहलोभादिद्वेष पाही । मायेच्याठाई वर्तती ॥७१॥
उगमीं वाकडी लागे नेटें । तेणें नदनदीपूर लोटे । तेवीं माया विषयसंघट्टें । चढणी नेटेपाटें मोहादिदशा ॥७२॥
जेथें उगम नाही मायेचा । तेथें रागदशे ठाव कैंचा । परमानंदें पूर्ण साचा । हरिप्रियांचा समूह नांदे ॥७३॥
भक्तिप्रतापें जे आथिले । यालागी ते देवदैत्यी पूजिले । मायामोहातीत जाहले । अढळ बैसले वैकुंठी ॥७४॥
देवाची माया ऋद्धिसिद्धी । दैत्यांची माया विघ्नें ब्राधीं । भक्त नढळतीच दृढबुद्धी । जिणोनी उपाधि पूज्य झाले ॥७५॥
शोधिती सत्त्व अतिसात्विकें । जे हरिभक्त हरिप्रेमाधिकें । जे झाले श्रीहरिसारिखे । त्यांचें स्वरुप सुखें शुक सांगे ॥७६॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.