श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीकृष्णाय नमः ।

आदीं वंदू गणनायका । नरकुंजरा अलोलिका । नरगजस्वरुपें तूं एका । नमन श्रीविनायका सदगुरु ॥१॥
तुज सदभावें करितां नमन । विघ्नचि होय निर्विघ्न । यापरी तुझी कृपा पूर्ण । चैतन्यघन गणराजा ॥२॥
सालंकृतशुक्लांबरी । हंसारुढी परमेश्वरी । सदगुरुरुपें वागेश्वरी । म्यां मजमाझारीं वंदिली ॥३॥
वाच्यवाचक वदता । तिहींसी आली एकात्मता । यापरी येथें वाग्देवता । गुरुत्वें तत्त्वतां वंदिली ॥४॥
पूर्वपरंपरा पूज्यता । एकरुप एकनाथा । आह्मां सदगुरुचि कुळदेवता । एकात्मता एकवीरा ॥५॥
तिचेनी नांवें माझेंही नांव । ह्नणोनि मिरवी कवि - वैभव । तंव नामरुपा नुरेचि ठाव । हा निजानुभव कुळदेव्या ॥६॥
आतां वंदूं संतसज्जन । जे सर्वांगी चैतन्य घन । ज्यां सगुण निर्गुण समसमान । जे निजजीवन सदभावा ॥७॥
ज्यांची सदभावें ऐकतां गोष्टी । चैतन्यघन होय सृष्टी । लागे परमानंदी दृष्टी । ऐसी कृपादृष्टी साधूंची ॥८॥
आतां वंदूं श्रीजनार्दन । ज्याचें ऐकतां एक वचन । त्रैलोक्य होय आनंदघन । जें निजजीवन सच्छिष्या ॥९॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.