पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/41

हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्यासाठी एक विचाराचा आणि तत्त्वज्ञानाचा डोलारा पंडित नेहरूंनी उभा केला. या डोलायचे तीन खांब समाजवाद, नियोजन आणि शास्त्रविज्ञान.

 नेहरूवादाची त्रिसूत्री

 * समाजवाद

 पंडित नेहरू काही मोठे निष्ठावंत समाजवादी होते असे नाही. किंबहुना, काँग्रेसमधील समाजवादी गटाचा त्यांनी नेहमी रागराग केला; पण, रशियातील क्रांतीनंतर तेथे समाजवादाचा जो प्रयोग झाला त्याची त्यांनी एकदा धावती पाहणी केली तेव्हा त्या प्रयोगाच्या भव्यतेने ते दिपून गेले आणि त्यातील काव्याने ते मोहरून गेले. समाजवादाची भाषा नेहरूंनी वापरली ती एक आर्थिक-सामाजिक दर्शन म्हणून नव्हे. कामगारवर्गाचे आणि नेहरूंचे फार काही कळकळीचे संबंध होते असेही नाही. नेहरू हे सर्वार्थाने गुलाबी राजबिंड्या शहरवासियांचे प्रतिनिधी होते. समाजवादाचा उद्घोष करायचा, कामगारांच्या क्रांतीची भाषा वापरायची, पण प्रत्यक्षात, पांढरपेशांच्या आणि नोकरशहांच्या हाती सत्ता काबीज करायची या प्रवृत्तीचे ते अग्रेसर नेते होते. नेहरूंचा समाजवाद म्हणजे काव्य आणि नोकरशाही यांचे अजब मिश्रण होते.

 * नियोजन
 नियोजनाची नेहरूप्रणित संकल्पना ही अशीच भद्र लोकांच्या सोयीसोयीची होती. नियोजन म्हणजे शेतकऱ्यांची लूट, कारखानदारीची बरकत. आणि हे सर्व चक्र चालविण्याची सर्वंकष सत्ता नोकरशहांच्या हाती अशा तहेने की लायसेन्सपरमिट. राज्यांत आपल्या मर्जीतल्या लाडक्या कारखानदारांच्या सोयीने सर्व चालावे. नेहरू-नियोजनाचा खरा अर्थ असा होता. निदान त्या नियोजनाचे पर्यवसान तरी भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि देशाची दिवाळखोरी यातच झाले.

 * शास्त्रविज्ञान

 औद्योगीकरणावर भर देण्यासाठी नेहरूंनी शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा खूप बोलबाला केला. आजही त्यांना इंडियातील आधुनिक युगाचे प्रणेते मानले जाते. शेती, विशेषतः पारंपरिक शेती म्हणजे सगळा जुनाट गबाळग्रंथी कारभार आहे, त्यातून बाहेर पडून शास्त्र आणि विज्ञान यांच्या आधाराने उद्योगधंदे तातडीने उभे राहिले पाहिजेत असे आपले मत पंडितजी आग्रहाने मांडत असत.

 चैत्रगौरी औद्योगीकरण

 औद्योगीकरण झपाट्याने करण्याचा आग्रह अनेकांनी पूर्वीही धरला होता. जर्मन राष्ट्र बळकट करून जगावर प्रभुसत्ता मिळविण्यासाठी हिटलरने

भारतासाठी । ४१