माझ्याकडे नाही, तशी ताकद नाही आणि तुम्हा साहित्यिकांच्या सहजतेने व्यक्त करण्याची ताकद नाही. मग, आम्ही काय करतो? आकडेवारीच्या आणि अर्थशास्त्राच्या आलेखांमागे लपतो. शेतकऱ्यांचं दु:ख आमच्या तब्येतीला काव्यात सांगणे झेपत नाही. मग, रडू येऊ नये म्हणून आम्ही आकडेवारी मांडतो अन् रडू येऊ म्हणून सिद्धांत मांडतो. स्वत:च्या घामाने मिळणे शक्य असलेल्या 'न मिळणाऱ्या सदऱ्या' बद्दल बोलू शकत नाही म्हणून आम्ही 'उणे सबसिडी'ची गोष्ट करतो. म्हणून, मी साहित्यिक नाही, असं मी म्हणतो.
तसं, मी काही थोड्या काठीण प्रसंगांना तोंड दिलं नाही; तरीसुद्धा लहान मुलाचं दु:ख मला सहन होत नाही. मोठ्या माणसांच्या, विशेषत: वयात आलेल्या पुरुषाच्या दु:खाचं मला काही फारसं वाटत नाही. वाटतं, त्यांनी तोंड दिलंच पाहिजे; पण, स्त्रिया व लहान मुलं यांचं दु:ख खरंच सहन होत नाही. म्हणून आम्ही आकडेवारी मांडतो.
साहित्यिकाचीही स्वत:ची एक ताकद असते. मगाशी मोरेसाहेबांनी सावरकरांवर चांगल भाषण केलं. त्यांनी म्हटलं ते खरं आहे. तुम्ही सावरकरांचं कवित्व विसराल तर सावरकरांचं विज्ञान समजणं अशक्य आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. साहित्यिक ताकद कशी काय उपयोगी पडते? मी एक उदाहरण सांगतो. मी संयुक्त राष्ट्रसंघाची नोकरी सोडून इकडे आलो आणि तिकडे जिनेव्हामधल्या संरमरवरी महालामध्ये भाषण करणारा मी, इकडे चार वर्षांच्या आत मला येरवड्यामध्ये फाशीच्या कोठडीत ठेवण्यात आलं. पहिल्याच आंदोलनात शासनानं मला तुरुंगात टाकलं आणि पोलिसांना भीती अशी, की तुरुंगात आजूबाजूला चारपाच हजार शेतकरी आहेत, त्यांच्यात या माणसाला ठेवलं तर तो भडकवून टाकील त्यांना. त्यामुळे त्यांनी मला वेगळ्या खोलीत ठेवायचं ठरवलं; पण येरवडा ही 'बरॅक जेल' आहे; तिथे वेगळ्या कोठीची सोय नाही. त्या जेलमध्ये एकाच ठिकाणी चारेक वेगळ्या खोल्या आहेत; दुसऱ्या दिवशी ज्यांना फाशी द्यायचं असतं त्यांना या खोल्यांत ठेवतात. मला ठाऊक नव्हतं. पोलिसांनी मला त्यातल्याच एका खोलीत ठेवलं होतं. मी आपला झोपून गेलो. दिवसभरच्या आंदोलनामुळे दमून गेलो होतो, झोप लागली. रात्री शेजारच्या खोलीतला सिंधी व्यापारी ओरडायला लागला. त्यामुळे झोपमोड झाली. शिपायांनी मला सांगितलं, की या खोल्या अशासाठी आहेत आणि त्या सिंधी व्यापाऱ्याला त्याच्या उद्याची भीती वाटायला लागली म्हणून तो ओरडायला लागला. संगमरवरी महाल ते फाशीची कोठी, किती मोठा बदल केला, किती त्याग केला हे लोकांना सांगणं सोपं असतं; पण प्रसंग आला म्हणजे काय बेततं, कशा टोचण्या लागतात ते प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीज कळणार नाही. त्या वातावरणामुळे झालेल्या