हे पान प्रमाणित केलेले आहे.

तसेच पुढे आगगाडीने दिल्लीला जावे असा विचार होता.

 एस.टी. गाडी कधी नव्हे ते अगदी वेळेवर म्हणजे पहाटे साडेतीनलाच मुंबई सेंट्रलला पोचली. तिकीट खिडकीपाशी खासगीत तिकीट विकणारे अनेक टोळभैरव फिरत होते. तत्व म्हणून त्यांच्याकडून तिकीट घेतले नाही आणि नंतर खिडकी उघडली तेव्हा तिकीट मिळू शकत नाही असे समजले. स्टेशनमास्तरांपर्यंत जाऊन तक्रार केली. त्यांनीही काही दाद दिली नाही. मग सत्याग्रह म्हणून विनातिकिटाचा आगगाडीत जाऊन बसलो. त्याच गाडीतून बिपिनभाई देसाई आणि गुणवंतभाई चालले होते. त्यांनी तिकीट तपासनिसाशी काहीतरी जमवले असावे. मला काही त्रास झाला नाही.

 अंमलसाडच्या कोट्यावधी रुपयांचा व्यवहार असणाऱ्या विविध सेवा सहकारी सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री हजर होते. महाराष्ट्रातून माझ्याखेरीज मणिभाई देसाई यांनाही बोलावले होते. कार्यक्रम साडेतीनच्या सुमारास आटोपला. आता मला बडोद्यास पोचून राजधानीने दिल्लीची वाट धरायची होती. मोटारगाडी मला बडोद्यापर्यंत सोडायला येणार होती. सुरतला पोचल्यावर माझ्याच मनात विचार आला. 'इथून बडोद्यापर्यंत एकशे पंचवीस कि.मी. गाडीने जायचे आणि ती गाडी रिकामी परत यायची त्यापेक्षा सुरतहून आगगाडीने बडोद्यास गेलो, तर बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांचा कितीतरी त्रास वाचेल.' कर्णावती एक्स्प्रेसमध्येही गर्दी होती. सकाळीच रेल्वे व्यवस्थेशी भांडण केले होते, आता पुन्हा झंझट नको म्हणून मी निमूट दुसऱ्या वर्गाच्या डब्यात दोन तास उभे राहून प्रवास केला. बडोद्याला पोहोचेपर्यंत पायाचे पार तुकडे पडले. राजधानी यायला अजून दोन तास अवकाश होता. फलाटावरूनच दिल्लीला फोन केला, मी येत असल्याचे कळवले आणि टेलिफोनच्या खोक्यातून बाहेर पडलो.

 तेवढ्यात बिपिनभाईंचे बडोद्याचे एक मित्र समोर आले. त्यांनी एका वाक्यात निरोप दिला: "माईंची तब्येत गंभीर आहे. रक्ताच्या उलट्या होताहेत." तेथूनच पुन्हा पुण्यात इस्पितळाशी संपर्क साधला. मोठी बहीण जबलपूरला परत जाता जाता मुंबईहून पुण्याला परत आली होती. मीही यावे असे सगळ्यांचे मत दिसले. परत तर यायला पाहिजे, पण जायचे कसे? बडोद्याहून रात्री एक खासगी बस पुण्याला जायला निघते. चौदा तासांत पोचते. दररोज दोन गाड्या निघतात; पण आज एकच निघणार होती. कारण दुसऱ्या गाडीला आदल्या दिवशी अपघात झाला होता. त्यामुळे गाडीत जागा मिळणे अशक्यच होते. बसमालकांवर सामदाम प्रयोग करून झाले. गुजरातेतील सहकाऱ्याने मी 'शेतकऱ्यांचा

अंगारमळा । ३१