हे पान प्रमाणित केलेले आहे.

थोडासुद्धा सारखेपणा नसणार; पण दूरभाव कणमात्र वाटत नव्हता. गाडीमध्ये, नंतर घरी पोचल्यावर, शेवटच्या तयारीच्या वेळी- किती वेळा शवाला स्पर्श करावा लागला, तरी एकदाही काही दूरभाव जाणवला नाही. हे काय गूढ आहे हे माझ्या अजून तरी लक्षात आलेले नाही.

 दिल्लीचे बंधू आले. वैकुंठ यात्रा सुरू झाली. माझ्यापुरते पुत्रकर्तव्य इथे संपले. आता वैकुंठातील विधी, सारे सव्यापसव्य आणि त्यानंतरचे धार्मिक कार्यक्रम यांचा माझा काही संबंध नव्हता. ती जबाबदारी मोठ्या मुलाची. पुण्याचे प्रख्यात मोघे गुरुजी विधी सांगत होते, वडील बंधू बाळासाहेब विधी पार पाडत होते. माईच्या शवाजवळ उभे असताना मला एका गोष्टीची खाडकन जाणीव झाली. जन्मापासूनच्या माझ्या आयुष्यातली पहिली आठवण जिच्याशी संबंधित आहे त्या व्यक्तीच्या संबंधाचा हा शेवटचा प्रसंग.

 माझ्या आयुष्यातली मला स्वत:ला आठवणारी पहिली घटना. त्या वेळी आम्ही साताऱ्याला राहत होतो; म्हणजे मी तीन वर्षांचा असावा; फार तर साडेतीन वर्षांचा. शनिवार पेठेतल्या दत्तमंदिरासमोरच्या गुजराच्या घरातल्या पहिल्या मजल्यावर आम्ही भाडेकरू म्हणून राहत होतो. सरळ अरुंद जिना चढून वर गेले म्हणजे उजव्या हाताला एक खोली. त्यात स्वयंपाकघर, जेवणघर, माजघर सगळे एकत्र असावे. डाव्या हाताला दुसरी जरा मोठी बैठकीची खोली. त्याच्या बाहेरच्या, रस्त्याच्या बाजूला एक छोटीशी गॅलरी.

 आठवणींचा प्रसंग तसा किरकोळ आहे. स्वयंपाकघरातून निघून जिन्याच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन, तेथून मी बैठकीच्या खोलीत आलो आणि गॅलरीकडे जाण्याचा विचार होता. खोलीच्या मध्यभागी एक लहान गोल टेबल असावे. माझ्या त्यावेळच्या उंचीच्या मानाने हे टेबल भले उंच वाटत होते. टेबलाला उजवीकडून वळसा घालून मी छोट्या पावलांनी गॅलरीच्या दिशेने जाणार, इतक्यात मला जाणीव झाली, की माझी आईही जिना ओलांडून बैठकीत आली आहे आणि मधल्या टेबलाला डाव्या बाजूने वळसा घालत आहे. टेबलाच्या दोन बाजूंनी आम्ही दोघे पुढे सरकत होतो. मी छोट्या पावलाने आणि आई खूपच जास्त जलद. माझ्या मनात विचार आला, तो हा, की आपण व आई टेबलाच्या पलीकडे एकाच वेळी पोचणार आणि समोरासमोर भेटणार. त्याबरोबर अशीही खात्री वाटली, की असे समोरासमोर भेटल्यानंतर आई आपल्याशी नक्की काहीतरी बोलेल. हा अंदाज मनात बांधल्यानंतर प्रत्यक्षात टेबल ओलांडून आम्हाला समोरासमोर यायला

अंगारमळा । ३४