हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणाला तरी आपली सर्व संवेदना संपलेली नाही हे सांगायला पाहिजे. ही स्वप्नवत अवस्थाही बराच काळ टिकली. प्राण जात नाही आणि तो गेला तर या सगळ्या त्रासांतून मुक्तता होईल अशी प्रचंड उत्कंठा होती. एखाद्या भांड्यातून पाणी ओतायला सुरवात करावी आणि पाणी भांड्याच्या काठाला ओथंबून चिकटून रहावे असे काहीसे वाटत होते. पडू पाहणाऱ्या पाण्याला थोडा कोणी स्पर्श करून वाट करून दिली तर खळखळा पाणी वाहून जाईल आणि मोकळे मोकळे होईल असे वाटत होते; पण हे काही घडत नव्हते.

 मग कानाशी बऱ्यापैकी स्पष्ट आवाज आला.

 "जोशी, मी काय बोलतोय ऐकू येतंय? मी डॉक्टर भट्टाचार्य बोलतोय. काही त्रास वाटतोय?" मी तोंडातील नळीकडे हात करून बोलता येत नसल्याची खूण केली आणि मला लिहायला कागद-पेन्सिल हवी आहे असे खुणेने सांगितले. डॉक्टरांनी हातात पेन्सिल दिली आणि मी कसेबसे मोजून चार शब्द लिहिले, 'कृपया, मला मरू द्या.' 'पेशंट म्हणतोय मला मरू द्या.' कोणा बाईचा आवाज; बहुधा डॉक्टरीणबाई असावी. भट्टाचार्यांनी खांद्यावर थोपटले आणि ते म्हणाले ऑपरेशन अगदी उत्तम झाले. आता विश्रांती घ्या आणि ते निघून गेले. माझी प्रतिक्रिया, 'काय खोटं बोलतायत? ऑपरेशन सगळं फसलंय, यांना हे चांगलं माहिती आहे. एक लहानसा स्पर्श आणि सारा जीवनौघ जायला उत्सुक झाला आहे. किती खोटं बोलताहेत?'

 त्यानंतर मग अर्धवट जागृत अवस्थेतील दोन दिवस गेले. इतर पेशंट एकदोन दिवसांत विशेष दक्षता विभागातून बाहेर जातात. माझ्याबाबतीत जास्त वेळ लागणार आहे असे कानावर आले. माझी मुलगी श्रेया भेटून गेली. तेथे कोणाला येऊ देत नसतानाही महिला आघाडीची सरला कदम एकदा डोकावून गेली: शेवटी, एकदम एक दिवस माझ्या खोलीत जायला डॉक्टरांनी सांगितले. आपण पुन्हा या जगात प्रवेश करणार आहोत, हे खरेच वाटेना. अतिदक्षता विभागातून बाहेर पडलो. एकदोन दिवस चालण्याचे, चढण्याचे, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम झाले आणि डॉक्टरांनी मला चक्क घरी जायला सांगितले; टाकेसुद्धा आठ दिवसांनी काढू म्हणाले !

 आजारपण अकस्मात आले आणि आपल्या देशात जितके काही चांगले उपचार शक्य आहेत या सगळ्यामुळे आणि अनेक मित्रांनी मदतीचा हात दिल्यामुळे आजारपणाचे गंडांतर संपले. त्यानंतर, श्रेयाला बरोबर घेऊन अमेरिकेत जागतिक शेतकरी परिषदेला जाऊन आलो. १९९९ च्या निवडणुकांमधील वेगवेगळ्या पक्षांशी बोलणी चालली आणि

अंगारमळा । ४२