हे पान प्रमाणित केलेले आहे.

राजकीय निर्णयासंबंधी सहकाऱ्यांमधील भांडणतंटे हे सगळे सोसले. आंबेठाणला न जाता पुण्यात राहिलो, पण काही मनाला विश्रांती मिळते असे वाटेना. बिपिनभाई देसाईंच्या प्रेमाखातर गुजरातेत राहिलो. त्यांच्याबरोबरच हिमालयाच्या प्रवासाला गेलो. अट्टहासाने केदारनाथाची चढण्याची आणि उतरण्याची यात्रा एकट्याने पायी केली; नैनितालचे चीन शिखरही एकट्याने सर केले. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आणि सकाळ संध्याकाळ नियमित माफक व्यायाम करूनही जो आत्मविश्वास येत नव्हता तो एकट्याने पायी डोंगर चढण्याच्या माझ्या आग्रहामुळे फार झपाट्याने येऊ लागला.

 गुजराथेत असताना नर्मदा प्रश्नाचा अभ्यास झाला. माझ्या सवयीप्रमाणे गप्प राहवले नाही म्हणून आंदोलनाचा नकाशा बनवला आणि नेतृत्वही गळ्यात पडले. आंदोलनाचा धडाका चालू झाला आणि दर दिवशी प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. शेवटी आंदोलनच प्रकृतीला सर्वांत जास्त मानवले म्हणायचे!

 आजारपण आले तेव्हा अमरावतीची जनसंसद नुकतीच संपली होती. भारताच्या गरिबीची आणि ऱ्हासाची कारणे कोणती याची मीमांसा, स्वत:ला संतोष वाटावा इतकी स्वच्छ झालेली होती. 'माधान'च्या शिबिरात खुल्या अर्थव्यवस्थेचा आराखडा स्पष्टपणे बोलून झाला होता. वधूची आई मांडवपरतणीनंतर आजारी कोसळावी तशातला हा प्रकार!

 नर्मदा जनआंदोलनाच्या काळात गुजराथेत आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे टीकेची राळ उडाली. गुजराथ शासनाने केवळ अट्टहासापोटी आणि पक्षीय हितासाठीच कारसेवेचा सुंदर सोहळा विस्कटण्याचा घाट घातला.

 परत पुण्याला आलो. महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाचा कारभार पाहिला. दिल्लीत अर्थव्यवस्था, महिलांचे आरक्षण, राजीव गांधींवरील आरोपपत्र इत्यादीचा गदारोळ पाहिला.

 निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळलेले, कधी नव्हे ते महाराष्ट्र कापूस एकाधिकार योजनेत भा.ज.प. शिवसेना युतीच्या शासनाने 'ठोकून देतो ऐसा जे' पद्धतीने कापसाचा भाव जाहीर केल्यामुळे प्रथमच महाराष्ट्राबाहेरील कापसाचे भाव कोसळले, साखरेच्या आयातीमुळे साखर कारखाने आणि ऊसउत्पादक शेतकरी त्रस्त, तेलबियाण्यांच्या शेतकऱ्यांची अशीच दीनवाणी अवस्था हे सगळे पाहिले. शेतकऱ्यांची परिस्थिती जशी २० वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेच्या उदयाच्या वेळी होती जवळजवळ तशीच; फरक एवढाच, की १९८० मध्ये समाजवादाच्या नावाखाली शेतीमालाची लूट होत होती,

अंगारमळा । ४३