आपोआपच त्यांच्या आंदोलनात खेचले गेलो. खरं तर पूर्वी आम्हाला शेतकऱ्यांबद्दल काहीच प्रेम वगैरे नव्हतं. आमचं गि-हाईक म्हणूनच आम्ही या शेतकऱ्यांकडे बघायचो; खूपदा त्यांच्याशी भांडायचोही. पण जोशीसाहेबांमुळे आमची त्यांच्याकडे बघायची सगळी दृष्टीच बदलून गेला. त्यांच्यावर किती अन्याय होत आहे याची आम्हाला प्रथमच जाणीव झाली. मी स्वतः तीन वेळा शेतकरी आंदोलनात तुरुंगात गेलो. दोनदा येरवडा तुरुंगात व एकदा औरंगाबाद तुरुंगात."
बाबुभाई शहा यांनी जोशींची दुसऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर ओळख करून दिली. शेतीच्या काही कामासाठी जोशी शहांकडे गेले होते. त्यांच्या चाकणमधील कार्यालयात. काम झाल्यावर ते जाण्यासाठी उठले तशी, "थांबा दोन मिनिटं. तुमची एका भल्या माणसाबरोबर ओळख करून देतो," असे म्हणत शहांनी त्यांना थांबवून घेतले. तेवढ्यातच हे भले गृहस्थ त्या दुकानात आले. कदाचित जोशींबरोबर परिचय करून देण्याच्या उद्देशाने शहांनीच त्यांना तिथे बोलावून घेतले असेल. ते होते दत्तात्रेय भिकोबा ऊर्फ मामा शिंदे. त्यांनी जोशींच्या चाकणमधील सुरुवातीच्या दिवसांत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्याविषयी इथे थोडे विस्ताराने लिहायला हवे.
दुसरे सानेगुरुजी' म्हणूनच चाकण परिसरात आजही मामा ओळखले जातात. हे साम्य केवळ दिसण्यापुरते नव्हते, तर वृत्तीतही होते. राष्ट्र सेवा दलाचे ते प्रथमपासून निष्ठावान सेवक. १९४७ साली देश स्वतंत्र झाला तेव्हा सर्व पोलीस स्टेशनांनी आपापल्या आवारात झेंडावंदन करावे असे सरकारचे आदेश निघाले. पण चाकण पोलिसांना झेंडावंदन कसे करतात तेच ठाऊक नव्हते. मामा राष्ट्र सेवा दलाची शाखा गावात चालवतात हे मात्र त्यांना ठाऊक होते. त्यांनी मामांनाच पोलीस ठाण्यात पाचारण केले. खांब उभारणे, झेंड्याला दोरी लावून तो वर सरकवणे व मग तो फडकवणे या सगळ्याची रंगीत तालीम केली आणि मग १५ ऑगस्टला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांनी पहिले झेंडावंदन केले.
बाबुभाई पक्के काँग्रेसवाले असूनही मामांना इतके मानतात याचे जोशींना कौतुक वाटले. विरोधी पक्षातील लोकांनाही आपले मोठेपण मान्य असणे हे आपल्याकडे तसे दुर्मिळच. लौकरच जोशींना कळले, की चाकणमध्ये सर्वच नेत्यांना मामांचे मोठेपण मान्य आहे.
जोशींनी शेतीला सुरुवात केली त्याच महिन्यात, २३ जानेवारी १९७७ रोजी, दिल्लीत एक अगदी अनपेक्षित घटना घडली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना इंदिरा गांधींनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. ठरल्याप्रमाणे २० मार्चच्या संध्याकाळी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसचा अभूतपूर्व असा पराभव करून केंद्रात जनता पक्षाचे राज्य आले. काँग्रेसेतर सरकार केंद्रात सत्तेवर यायचा हा देशाच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग. जोशी तसे प्रत्यक्ष राजकारणापासून दूरच होते, पण भोवताली काय चालले आहे हे बारकाईने पाहत असत. आणीबाणीची दहशत असल्याने लोक तसे शांत आहेत हे