शरद जोशींनी ज्यांना ह्या चरित्रासाठी प्रकल्प समन्वयक म्हणून नेमले होते त्या बद्रीनाथ देवकर यांचाही उल्लेख इथे करणे अपरिहार्य आहे; त्यांच्याबरोबर इतक्या ठिकाणी फिरलो आणि इतक्या साऱ्या लोकांशी त्यांनी माझी भेट घडवून आणली, की त्या साऱ्यांचा उल्लेख करणेही अवघड आहे. आपली सगळी इतर व्यक्तिगत कामे बाजूला सारून त्यांनी यासाठी वेळ दिला. अनंतराव देशपांडे यांचेही इथे आभार मानायला हवेत; अनेक भेटींचे आयोजन त्यांनी केले होते. महाराष्ट्राबाहेरील सहकाऱ्यांबद्दल लिहायचे तर स्वित्झर्लंड येथील बर्नमधले जोशींचे एकेकाळचे शेजारी आणि कार्यालयातील सहकारी टोनी डेर होवसेपियां, पंजाबातील बटाला येथील शेतकरीनेते व जोशींचे निकटचे स्नेही भूपिंदर सिंग मान, कर्नाटकातल्या निपाणी येथील तंबाखू आंदोलनातील सहकारी प्रा. सुभाष जोशी, कर्नाटक रयत संघाचे बंगलोरस्थित हेमंत कुमार पांचाल आणि सुरतमधील बांधकाम व्यावसायिक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते परिमल देसाई यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. शरद जोशी यांच्या कॅनडास्थित कन्या सौ. श्रेया शहाणे यांचेही आभार. आमच्या दोन भेटींमध्ये त्यांनी दिलेली माहिती बरीच उपयुक्त होती. पुस्तकासाठी ज्यांनी आर्थिक सहाय्य दिले त्या प्रमोद चौधरी यांचे व त्यांच्या प्राज फाऊंडेशनचे आभार मानतो.
पुस्तकाची सर्व मुद्रिते, वयपरत्वे येणाऱ्या अडचणींवर मात करून, ज्यांनी खूप आपलकीने तपासन दिली त्या अंतर्नादच्या व्याकरण सल्लागार प्रा. यास्मिन शेख यांनाही मनापासून धन्यवाद. अक्षरजुळणीकार हरिश घाटपांडे, मुखपृष्ठकार श्याम देशपांडे, मुद्रक आनंद लाटकर आणि या साऱ्यांचे कुशल सहकारी यांचेही आभार मानायला हवेत.
ऋणनिर्देशाची ही यादी खरे तर खूपच लांब होईल. कितीही नावे घेतली तरी काही वगळली जायची शक्यता आहेच. प्रत्यक्ष नामोल्लेख केला नाही तरीही त्या साऱ्यांविषयी मनात कृतज्ञभाव आहेच. त्यांच्याविना हे चरित्र लिहूनच झाले नसते असे म्हटले, तरी त्यात अतिशयोक्ती होणार नाही.
वाचकांच्या हाती हे चरित्र देताना लेखकाची मनःस्थिती काहीशी संमिश्र आहे. हे काम व्हावे अशी ज्यांची खूप इच्छा होती, ते चरित्रनायक शरद जोशी आज आपल्यात नाहीत याची बोचरी खंत मनात आहे आणि त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांतील बहुतेक वेळ ज्या प्रकल्पासाठी दिला त्याला मूर्त रूप लाभले याचे समाधानही आहे.
शरद जोशींसारखा एक अनन्यसाधारण कृतिशील विचारवंत आपल्यात होऊन गेला. त्यांचा जीवनपट आणि त्यांचा वैचारिक वारसा ह्या चरित्रातून वाचकांपुढे अल्पस्वल्प जरी साकार झाला तरी हे श्रम सार्थकी लागले असे म्हणता येईल. आपल्या टेबलावरचे रोजचे जेवणाचे ताट ज्याच्या श्रमांतून येते त्या शेतकऱ्याचे विश्न, त्याच्या अडचणी, त्याचे संघर्ष, त्याच्या आशा, त्याच्या निराशा ह्यांची थोडीफार ओळख ह्या चरित्रलेखनातून लेखकाला झाली आणि तशीच ती या चरित्रवाचनातून वाचकालाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो.
- भानू काळे
◼