पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/१९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 अकोळ युवक संघाचे नेते आय. एन. बेग म्हणाले :
 "सगळ्या तंबाखू शेतकऱ्यांच्या वतीने आमच्या ह्या वाघिणींना, ह्या कामगारभगिनींना मी सर्वांत प्रथम लवून मानाचा मुजरा करतो. शेतकऱ्यांना त्यांनी जो अभूतपूर्व पाठिंबा दिला आहे, त्याला इतिहासात तोड नाही.... काल संध्याकाळपासून निपाणांमध्ये जाणूनबुजून दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात येत आहे. तंबाखू व्यापाऱ्यांनी व त्यांच्या पैशावर निवडून आलेल्या आमच्या आमदार मंडळींनी इथून पुढं सत्याग्रही शेतकऱ्यांना निपाणीत पाय ठेवू द्यायचा नाही असा चंग बांधला होता. पण त्यांचा हा प्रयत्न कामगार स्त्रियांनी उधळून लावला... आमच्या निपाणीमध्ये मुसलमानांचे पाच मोहल्ले आहेत; त्यांतील बागवानांचा मोहल्ला व्यापाऱ्यांच्या बाजूला आणि इतर चार मोहल्ले सर्वसामान्य जनतेच्या बाजुला, असं चित्र आहे. ह्या बागवान मुसलमानांच्यातील काही व्यापारी आहेत, काहींचा ट्रकचा व्यवसाय आहे. माझ्या ह्या बागवान बांधवांना मी एक इशारा देऊ इच्छितो- त्यांनी वेळीच सावध होऊन व्यापाऱ्यांचा नाद सोडावा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं. ... आज सकाळपासून निपाणीत 'शरद जोशी ब्राह्मण आहेत, सुभाष जोशी ब्राह्मण आहेत, ह्या ब्राह्मणांच्या नेतत्वाखाली जनसंघाचे एजंट घसले आहेत' वगैरे अतिशय खालच्या पातळीवरचा प्रचार व्यापाऱ्यांच्या चमच्यांनी सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या वतीने मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, की हा लढा कणा ब्राह्मणासाठी, हरिजनासाठी, मराठ्यासाठी, लिंगायतासाठी किंवा मुसलमानासाठी चाललेला नाही. इथं जातीचा, धर्माचा, भाषेचा कुठलाच प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. मी स्वतः मुसलमान आहे. ह्या भागातील मुसलमान शेतकऱ्यांच्या वतीनं मी सांगतो, की शरद जोशी हे आम्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने किसानांच्या क्रांतीचे पैगंबर आहेत!"
 ह्यानंतर सुभाष जोशी ह्यांचेही भाषण झाले. आंदोलन काळातील त्यांचे हे एकमेव भाषण. स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आंदोलनाचे सूत्रसंचालन करणारे हे हाडाचे कार्यकर्ते भाषणबाजीसाठी कधीच प्रसिद्ध नव्हते. पण त्यांची कळकळ त्यांच्या देहबोलीतूनच व्यक्त व्हायची. आज सगळ्यांनी खुपच आग्रह धरला म्हणून केवळ ते भाषणासाठी उभे राहिले. ते उभे राहताच सर्व शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले:
 "शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, तेव्हा निपाणीतील घराघरातील भगिनींनी बाहेर येऊन शरद जोशींच्या पायावर घागरीने पाणी घातलं. याउलट आज व्यापाऱ्यांचा मोर्चा घरावरून जाताना ह्याच भगिनींनी दारंखिडक्या बंद करून घेतल्या! शेतकऱ्यांचा मोर्चा आणि व्यापाऱ्यांचा मोर्चा ह्याला निपाणीच्या नागरिकांनी दिलेला हा वेगवेगळा प्रतिसाद फार अर्थपूर्ण आहे. आज ह्या व्यापाऱ्यांनी एक डाव रचला होता. त्यांना वाटलं होतं, की धारियांच्या आणि माझ्या घरावर दगडफेक केली, की आंदोलन नगरीतले शेतकरी चिडून गावात घुसतील; त्यांची आणि भाडोत्री गुंडांची मारामारी सुरू होईल. तसं झालं की पोलीस त्याचं निमित्त करून बळाचा वापर करतील व आंदोलन नगरी उधळून रस्ता खुला करतील. पण सत्याग्रही शेतकऱ्यांनी संयम पाळला. व्यापाऱ्यांच्या ह्या कारस्थानाला ते बळी पडले नाहीत... इथं आलेला प्रत्येक शेतकरी घरातून
१८२ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा