शोधले. मग तीनएकशे पोलिसांच्या नव्या तुकडीने पुन्हा एकदा जोरदार लाठीमार करायला सुरुवात केली. जमावातील काही जणांनी चिडून त्यांच्यावर दगडफेक केली. काही पोलिसांना ते दगड लागले. त्याबरोबर पोलिसांची ती तुकडी मागे हटली व बंदूकधारी पोलिसांची एक तुकडी पुढे झाली. त्यांनी सरळ गोळीबारच सुरू केला. फटाफट अनेक शेतकरी घायाळ होऊन जमिनीवर कोसळू लागले.
आता मात्र शेतकऱ्यांचा धीर सुटला. जीव वाचवण्यासाठी ते दुतर्फा असलेल्या शेतांमधून पळू लागले. लाठीधारी पोलिसांनी त्या निःशस्त्र शेतकऱ्यांचा पाठलाग सुरू केला व एकेक करत शेतकऱ्याला पकडून झोडपायला सुरुवात केली! आंदोलन नगरीच्या परिसरात चार-पाच मैलांपर्यंत असा पाठलाग व लाठीमार सुरू होता.
बाहेरून आलेल्या काही सत्याग्रहींनी चिडून गावाबाहेर असलेली एक वखार पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे कोणाकडेच आग लावायची काही साधने नव्हती; हे काही धंदेवाईक आंदोलक नव्हतेच. बहुतेकांच्या आयुष्यातील अशा प्रकारच्या आंदोलनाचा हा पहिलाच प्रसंग होता. साध्या काडीपेटीचा वापर करून त्यांनी जमा केलेला थोडासा कडबा पेटवला आणि तो त्या वखारीवर टाकला. झाले! पोलिसांना जणू आणखी एक निमित्तच मिळाले! खरेतर वखारीचे नुकसान काहीच झाले नव्हते, कारण घमेलेभर कडबा घेऊन फारशी आग भडकणे शक्यही नव्हते. पण त्याचा फायदा घेऊन पोलिसांनी जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या शेतकऱ्यांवरही सरळ गोळीबार सुरू केला व त्यात दोन शेतकऱ्यांचा जीव गेला. अनेक जण गोळ्या लागून जखमीही झाले. आंदोलकांपैकी स्त्रियांनाही जबरदस्त लाठीमार झेलावा लागला.
थोड्याच वेळात संपूर्ण आंदोलन नगरी उद्ध्वस्त झाली. सोमवार, सहा एप्रिलच्या त्या गोळीबारात एकूण बारा शेतकरी हुतात्मा झाले होते. जखमींची संख्या तर खूपच जास्त होती.
निपाणीत ह्या सगळ्या बातम्या पोचत होत्या व गावामध्ये एकच हलकल्लोळ माजला होता. निपाणीतील सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती उघडउघड आंदोलकांना होती; कारण आंदोलकांच्या मागण्या अगदी न्याय्य आहेत आणि सरकारने केवळ दुष्टपणे त्यांच्याकडे दर्लक्ष केले आहे. सरकार त्यांचा अगदी अंतच पाहत आहे आणि गरीब शेतकऱ्यांना असे क्रूरपणे वागवणे कुठल्याच लोकशाही शासनाला शोभणारे नाही असेच नागरिकांचे मत होते. स्वतः व्यापारीदेखील पोलीस कारवाईने स्तंभित झाले होते; ती इतकी कठोर असेल अशी त्यांना कल्पना नव्हती.
अटक केलेल्या सत्याग्रहींना पुढचे बारा दिवस तुरुंगात डांबून ठेवले गेले. स्वतः शरद जोशी बेल्लारी येथील तुरुंगात होते. तिथे डांबलेल्या इतर शेतकऱ्यांपुढे रोज जोशी प्रबोधनपर भाषणे करत. एका अर्थाने त्यांना मिळणारी ही सक्तीची विश्रांतीच होती व तिचा त्यांनी आंदोलनाच्या दृष्टीने पूर्ण उपयोग करून घेतला. आधी त्यांचे भाषण व मग त्यावर उपस्थितांमध्ये चर्चा असे काहीसे प्रशिक्षणात्मक स्वरूप ह्या सभांना लाभले. इथल्याच एका सभेत 'भीक नको, हवे घामाचे दाम' ह्या शेतकरी संघटनेच्या सुप्रसिद्ध घोषणेचा जन्म झाला.
बारा दिवसांच्या कारावासानंतर शेतकऱ्यांना सोडून देण्यात आले, पण सर्व नेत्यांना मात्र
१८६ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा