पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 १० डिसेंबर १९८६ला, त्यावेळी परभणी जिल्ह्यात असलेल्या, हिंगोलीजवळच्या सुरेगाव येथे गोळीबार होऊन त्यात तीन शेतकरी हुतात्मा झाले.
 सुरेगाव येथे प्रस्तुत लेखक गेला असताना त्याला शेतकरी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नऊच्या सुमारास रास्ता रोको करण्यासाठी सत्याग्रही रस्त्यावर जमा होऊ लागले होते. शासनाने कापसाला निदान गेल्या वर्षीइतका तरी भाव द्यावा ही त्यांची मुख्य मागणी होती. त्या परिसरात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते व साहजिकच हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा होता. सुरुवातीला कार्यकर्त्यांनी एकदोन गाणी म्हटली. नंतर स्थानिक शेतकरी कार्यकर्त्या अंजली पातुरकर यांनी भाषण केले. त्यानंतरचे वक्ते बळीरामजी क-हाळे बोलायला उभे राहिले, तोच पोलिसांनी त्यांच्या हातातला माइक हिसकावून घेतला व त्यांना धक्के मारत अटक केलेल्या सत्याग्रहींना तुरुंगात नेण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच उभ्या केलेल्या एका बसकडे न्यायला सुरुवात केली. प्रत्यक्ष सत्याग्रह त्यावेळी सुरूही झाला नव्हता. लोक त्यामुळे संतापले व पोलीसही ऐकेनात. त्यातून मग धक्काबुक्की सुरू झाली. त्यातूनच पुढे गोळीबार झाला.

 ह्या आंदोलनात प्रत्यक्ष सामील झालेल्या दोन महिलांची निवेदने महत्त्वाची आहेत. (पूर्वप्रसिद्धी : शेतकरी संघटक, अमरावती महिला अधिवेशन विशेषांक, १० नोव्हेंबर १९८९. पृष्ठ ५०-१, ५५-६, संपादित अंश.)
  हिंगोली तालुक्यातील माथा या गावी राहणाऱ्या गोदाबाई शंकरराव पोले म्हणतात :

सुरेगावच्या आंदोलनाला आम्ही पंचवीस बाया गेलो होतो. तिथे पातुरकरबाईंनी भाषण केलं. खूप बायका, माणसं, पोरं जमली होती. सगळी मुकाट्यानं बसली होती. आणखी माणसंही चारी बाजूंनी येत होती. पोलिसांची मात्र चुळबुळ सुरू होती. ते अटक करू लागले. काही माणसांना धक्के देऊन त्यांनी जुलमानेच गाडीत नेऊन बसवलं. आता मात्र काही सोय नव्हती. वाट फुटेल तिथे सगळे गडी अन् बाया पळू लागले. पोलीस माणसांना ढोरासारखे बडवत होते. आमच्या अंगाचं पाणी होत होतं. अंग थरथर कापत होतं. कुठे जावं कळत नव्हतं. गोळीबार सुरू झाला होता. कोणाच्या पायावर, कोणाच्या मानेत गोळ्या लागत होत्या. धडाधड माणसं भुईवर पडत होती. मोठ्या कष्टानं मी चालत होते. मागे कसलातरी आवाज व्हायला लागला म्हणून मी वळून पाहिले, तो काही पोलीस एका शेतकऱ्याला मारपीट करताना दिसले. घाबरून मी पुढे सरकले. एवढ्यात माझ्या पाठीत एका पोलिसाने झाडलेली एक गोळी लागली. मी चक्कर येऊन खाली बसले. अंधारी येत होती. पुढं काहीच दिसत नव्हतं. बसत उठत, बसत उठत मी पुढं गेले.
काही माणसं मला भेटली व म्हणाली, 'गोदाबाई, तू सरकारी दवाखान्यात जा. डॉक्टर तुझ्या पाठीतली गोळी काढतील अन् औषधपाणी देतील.' त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी सरकारी दवाखान्यात गेले. तिथे डॉक्टर नव्हता. मी तशीच

पांढरे सोने, लाल कापूस ◼ २०१