पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



जोशी म्हणाले होते,
  "तुमची शेतकरी संघटनेवरील भक्ती, मी तुम्हाला सांगेन ती युक्ती आणि मागच्या आंदोलनात प्रत्ययाला आलेली शेतकऱ्यांची शक्ती यांचा समन्वय येत्या तीन वर्षांत होऊ द्या आणि मग चमत्कार पाहा - भक्ती-युक्ती-शक्ती आणि तीन वर्षांत मुक्ती!"
 या मेळाव्याचा पाठपुरावा म्हणून १० नोव्हेंबर १९८१ रोजी एक महाराष्ट्रव्यापी आंदोलन आयोजित केले गेले. त्याच सुमारास कृषी योगक्षेम संशोधन न्यास' स्थापन केला गेला. शरद जोशी, माधवराव खंडेराव मोरे व प्रल्हाद कराड पाटील ही नाशिक आंदोलनातील त्रिमूर्तीच ह्या न्यासाची विश्वस्त होती. त्यातून आपल्या कार्यकर्त्यांना दरमहा निदान ३०० रुपये मानधन द्यायचे ठरले. (प्रत्यक्षात ते अगदी थोड्या कार्यकर्त्यांना व तेही थोडेच महिने देता आले.)
 १, २ व ३ जानेवारी १९८२ रोजी सटाणा इथे शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन भरले होते. पिंपळगाव मेळाव्यातच अशा अधिवेशनाची घोषणा झाली होती व ते बागलाण तालुक्यातील मांगी तुंगी येथे २१-२२-२३ ऑक्टोबर १९८१ रोजी भरणार होते; पण नोव्हेंबरमधील आंदोलनाला वेळ मिळावा म्हणून अधिवेशन थोडे पुढे ढकलले गेले व जागाही मांगी तुंगीऐवजी अधिक सोयीची अशी सटाणा ही ठरली. या अधिवेशनाला प्रत्येकी पंधरा रुपये प्रतिनिधिशुल्क भरून साऱ्या महाराष्ट्रातून ३०,००० शेतकरी स्वतःच्या खर्चाने व आपापली शिदोरी बांधून आणून सामील झाले होते. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरयाणा व पंजाब येथूनही काही वेगवेगळ्या शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. १ जानेवारीला सकाळी दहा वाजता सुरू झालेले हे अधिवेशन तीन तारखेला दुपारी एक वाजता संपले. शेवटच्या सत्रानंतर त्याच जागी खुले अधिवेशन झाले व त्याला तीन लाख शेतकरी स्त्री-पुरुष हजर होते.
 ऊस आंदोलनातील यशामुळे ऊस शेतकऱ्यांना एका टनाला ३०० रुपये हा वाढीव भाव मिळाला होता. इतकी वर्षे मिळत असलेल्या भावाच्या हा दुप्पट होता. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल एकदम खूप वाढली होती. बँकांची-सोसायट्यांची कर्जे फिटायला लागली होती, व्यापाऱ्यांनीही बुडीत खाती टाकलेली देणी शेतकऱ्यांनी आपणहून जाऊन फेडली. शेतमजुरांचे वेतनही जवळपास दुप्पट झाले होते. साहजिकच सगळे खूप आनंदात होते. एकजुटीचे महत्त्व त्यांना पटले होते. आपले भाग्य आपण आंदोलनातून पालटू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या ठायी प्रथमच निर्माण झाला होता. आंदोलनाला थोडेफार संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून द्यायची गरज ह्या सटाणा अधिवेशनात प्रकर्षाने जाणवली.

 वर्धा येथील प्रशिक्षण शिबिरात जोशी म्हणाले होते, "आपलं आंदोलन नवीन आहे, नव्या पिढीने ते समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी नवं आंदोलन सुरू झालं, की जुने सरदार, मनसबदार हे बाजूला पडतात. त्यांचा उपयोग राहत नाही. पहिल्या बाजीरावाच्या वेळी त्याला शिंदे-होळकर नवीन तयार करावे लागले. शिवाजीलाही जुन्या मनसबदार-देशमुखांनी मदत केली नाही; नवे सरदारच त्याला तयार करावे लागले. हे प्रत्येक वेळी घडतं आणि आज

शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी ◼ २१९