पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर व डॉक्टर नरेन्द्र दाभोलकर यांचे मोठे बंधू चारुदत्त दाभोळकर ह्यांचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. भारतात शेतीविषयात पदवी घेतल्यावर ते पशुसंवर्धन ह्या विषयाच्या उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तिथे शिकत असताना १९५४ साली, म्हणजे वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी, त्यांनी 'महाराष्ट्रातील दुष्काळ व त्यावरील उपाययोजना' हे पुस्तक लिहिले व वाईच्या प्राज्ञ पाठशाळेने ते सात वर्षांनंतर, म्हणजे १९६१ मध्ये प्रकाशित केले. महाराष्ट्राचे तत्कालीन अन्नमंत्री पी. के. सावंत यांची त्याला प्रस्तावना आहे. 'महाराष्ट्रातील शेतीत उतरत्या नफ्याचा नियम (Law of diminishing returns) थैमान घालतोय, इथला शेतकरी फक्त जिवंत राहाण्यापुरतीच शेती (survival farming) करतो, जास्त पीक काढले तर आपलाच तोटा अधिक वाढतो हे त्याच्या लक्षात आले आहे, पूर्वापार हेच चालत आल्याने ते त्याच्या अंगवळणी पडले आहे, शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव दिला तर तो नक्कीच अधिक धान्य पिकवेल आणि तसे झाले तर महाराष्ट्रातील दुष्काळ लगेच संपेल; मुळात दुष्काळाचा प्रश्न हा तांत्रिक नसून आर्थिक आहे,' हे त्यांनी पुस्तकात साधार दाखवून दिले आहे. जोशींनी हे पुस्तक पूर्वी वाचले नव्हते; दत्तप्रसाद दाभोळकरांनी ते त्यांच्याकडे पाठवले. ते वाचल्यावर भरलेल्या वर्ध्याच्या शिबिरात जोशींनी ह्या पुस्तकाचे कौतुकही केले होते. खूप नंतर, २००५ साली, जोशींनी दत्तप्रसाद दाभोळकरांना पत्र लिहून कळवले,

शेतीमालाला रास्त भाव मिळायला हवा व तेच आपल्या दारिद्र्यावर एकमेव उत्तर आहे असे शेतकरी संघटना मानते. पण माझ्या आधी पंचवीस वर्षे तुमच्या भावाने हाच मुद्दा ह्या पुस्तकात अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडलेला आहे.

 आपले कांदा आणि उसाचे आंदोलन यशस्वी झाले ह्यामागे आपल्या संघटनेच्या कर्तृत्वाप्रमाणेच आंदोलनाची सध्याची वेळ हेही एक महत्वाचे कारण आहे, ह्याची स्पष्ट जाणीव जोशींना आहे. ते म्हणतात,
  "आपण १९८० साली आपलं आंदोलन चालू केलं हे भाग्य! कारण ८०ऐवजी ७५ साली आपण आंदोलन सुरू केलं असतं, तर इतकं यश मिळालं नसतं. ऐंशी साल दोन प्रमुख दृष्टींनी महत्त्वाचं आहे. एक म्हणजे १९७७ सालापर्यंत देशात सर्व धान्यं, कडधान्यं आणि इतर शेतीमाल यांचा तुटवडा होता. त्यावेळी जास्त पीक आलं, की जास्त पैसा हाती लागत असे. पण ७७ सालापर्यंत हरित क्रांतीची फळं लोकांपर्यंत पोचली होती. शेतकरी अधिक उत्पादन काढू लागले होते. त्यामुळे शेतीमालाची मुबलकता निर्माण झाली. मालाचा उठाव होईना. विकण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली. भाव गडगडले. जास्त पीक आलं, तर पदरी तोटा अशी परिस्थिती ८० साली प्रथमच निर्माण झाली.

 "आंदोलन इतकं यशस्वी व्हायचं दुसरं कारण म्हणजे राजकीय परिस्थिती. ७५ सालातील आणीबाणी, ७७ सालात निवडणुका, त्यानंतर पुन्हा निवडणुका, यामुळे एक पक्ष सत्तेवरून जाऊन दुसरा येणं आणि अल्पावधीत पुन्हा पहिलाच पक्ष सत्तेवर येणं, त्याचबरोबर

शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी ◼ २२१