पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



शिखांकडून किंवा मराठ्यांकडून लुटून घ्यायचे का अब्दालीकडून, एवढाच पर्याय पंजाबी शेतकऱ्यांसमोर असे आणि त्यांना त्यातल्यात्यात मुसलमानांकडून लुटले जाणे हा सौम्य पर्याय वाटे.

(शेतकरी संघटक, १५ सप्टेंबर १९८५)

 सोळाव्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. प्रथमतः इंग्लंडमध्ये कारखाने निघाले. त्यावेळीसुद्धा शेतीच्या वरकड उत्पादनातूनच त्या कारखानदारीसाठी अत्यावश्यक असे 'प्राथमिक भांडवल' (primitive capital accumulation) तयार झाले.
 कच्च्या मालाचे हे शोषण कशा प्रकारे होत आले? प्रथमतः त्या देशात जो कच्चा माल उपलब्ध होता, तो वापरायचा प्रयत्न झाला. पण तो देश एवढासा आहे, त्यातल्या मालावर असे कितीसे कारखाने चालणार? तेव्हा बाहेरून माल मिळवण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यासाठी इंग्लंडने वेगवेगळ्या दूरदूरच्या देशांत जाऊन तेथून कच्चा माल मिळवायला सुरुवात केली. (अर्थात हे सारे इतरही अनेक युरोपियन देशांच्या बाबतीत खरे आहे.) पण तिथेही अडचणी येऊ लागल्या. शिवाय ह्या देशांत स्थानिक प्रशासन खूप दुबळे आहे, दुहीने पोखरलेले आहे हेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मग तिथे जाऊन आपलेच राज्य प्रस्थापित करायचे, आणि राजकीय सत्तेच्या आधाराने मक्तेदारी पद्धतीने तिथला कच्चा माल स्वस्तात स्वस्त घेऊन, मायदेशातील आपल्या कारखान्यांना आणून द्यायचा, अशा प्रकारची वसाहतवादी पद्धत सुरू झाली. त्याच्याच जोडीने विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा विकासही होतच होता व ही सारी परिस्थिती परस्परपूरकच होती. त्यातून इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर कारखाने सुरू झाले. त्यातून जो पक्का माल तयार होऊ लागला, तो एकट्या इंग्लंडमध्ये खपणे शक्य नसल्यामुळे तो त्याच गुलाम देशांत खपवला जाऊ लागला - अर्थातच भरमसाट नफा घेऊन. म्हणजे हिंदुस्तानसारख्या देशाचा उपयोग दोन पद्धतींनी झाला - कच्चा माल स्वस्त मिळू लागला आणि पक्का माल जास्त भावाने विकण्यासाठी नवीन बाजारपेठ मिळाली. मुख्यतः अशा त-हेच्या वसाहतवादी व्यवस्थेतून तेथील कारखानदारीची भरभराट झाली.
 गांधीजींसारख्या द्रष्ट्या नेत्याने सामान्य माणसाला समजेल अशा शब्दांत हे सांगताना म्हटले होते,
 "इंग्रज आपल्या देशातील कापूस स्वस्तात त्यांच्या देशात घेऊन जातात, त्याचे कापड बनवतात आणि त्याच्याच धोतरजोड्या आमच्याच देशात आणून आमच्याच शेतकऱ्यांना खूप नफा घेऊन विकतात. ह्या शोषणामुळे आपण गरीब होत जातो व ते श्रीमंत होत जातात."
 जोशी म्हणतात,
 "म्हणूनच त्यांनी आपल्या चळवळीसाठी चरखा हे प्रतीक निवडलं. नाहीतर अशोकचक्र, कमळ अशा सुंदर गोष्टी त्यांना दिसल्या नसतील असं नाही! पारतंत्र्यात होणारं शोषण दूर करण्यासाठी प्रतीकात्मक साधन म्हणून ते चरख्याकडे बघत होते."
 परंतु पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर भारत स्वतंत्र झाला. 'चले जाव' आंदोलनामुळे, काँग्रेस


२२६ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा