पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अशा खोट्या फसव्या विकासयोजना आखायच्या. उदाहरणार्थ, शेतीमालासाठी बाजारसमित्या स्थापन करणे. त्यातून शेतकऱ्याचे शोषण किंवा अगतिकता जराही कमी झाली नाही, कारण व्यापारी जितका त्रास द्यायचे, तितकाच त्रास ह्या बाजारसमित्यांतील अधिकारीही देऊ लागले.
३. शेतकऱ्यांमध्ये एकी होऊ द्यायची नाही. छोटे शेतकरी विरुद्ध मोठे शेतकरी, शेतकरी विरुद्ध शेतमजूर, मराठी विरुद्ध कानडी असे वाद जागते ठेवून 'फोडा-झोडा' नीतीचा अवलंब करायचा.
४. शेतकऱ्याविरुद्ध प्रचार करून त्याची बदनामी होईल असे चित्र तयार करायचे; तो आळशी, बेजबाबदार, अंधश्रद्धाळू कसा आहे व त्यामुळेच तो गरीब आहे हेच सारखे मांडत राहायचे. शेतकऱ्याचे हे अभिजनवर्गातील चित्रण अतिशय विकृत आहे. 'पागोटेवाला आला की इंजेक्शनचे पाचऐवजी दहा रुपये घ्यायचे' ही भावना परदेशातून पुण्यात आल्यावर तेथील डॉक्टरांमध्ये जोशींना दिसायची ती त्यामुळेच.
५. तरीही जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलन करत उभे राहतील, तेव्हा तेव्हा कोणत्याही परिणामांची क्षिती न बाळगता ते आंदोलन क्रूरपणे चिरडून टाकायचे – जसे पोलिसांनी नाशिकला व निपाणीला केले.
 शेतीकडे शेतकरीधर्म, भूमिपुत्राचे कर्तव्य, काळ्या आईची सेवा, बळीराजाची सेवा वगैरे भावुक दृष्टींनी न बघता, शेती हा इतर कुठल्याही व्यवसायांप्रमाणे एक व्यवसाय आहे व पूर्णतः व्यावसायिक तत्त्वांवरच तो करायला हवा, असे जोशी ठासून सांगत आणि त्या दृष्टीने त्यांनी शेतीचे अर्थशास्त्र मांडले. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अगदी नवा विचार होता; शेतीकडे ह्या भूमिकेतून त्यांनी पूर्वी कधीच पाहिले नव्हते.
 शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढायचा ही ह्या अर्थशास्त्राची पहिली पायरी होती. त्याविषयी बऱ्याच तपशिलात जाऊन जोशींनी ऊहापोह केला.
 सुरुवात जमिनीपासून व्हायची. बापजाद्यांपासून वारसाहक्काने मिळत आलेली जमीन हाही खर्चाचा एक घटक मानला गेला पाहिजे, ही गोष्ट बहुसंख्य शेतकऱ्यांच्या गावीही नसायची. जोशी सांगत, जमिनीची आजची जी किंमत असेल त्याच्या १० टक्के रक्कम आपण दरसाल खर्च म्हणून पकडली पाहिजे. कारण आपण जर ती जमीन आज विकली, व ते पैसे बँकेत ठेवले, तर त्यावर आपल्याला १० टक्के व्याज सहज मिळेल. आपण शेती करतो, म्हणजेच त्या व्याजावर पाणी सोडतो. तेव्हा ती रक्कम शेतीखर्चातच पकडली पाहिजे. कारखानदार आपल्या जागेचा विशिष्ट घसारा (डेप्रिसिएशन) खर्चात पकडतो व मगच त्याचा नफा काढला जातो. ही सवलत शेतकऱ्याला मात्र दिली जात नाही.
 आपण शेतीची नांगर-खुरपणीपासून ते पहार-विळ्यापर्यंत असंख्य अवजारे, तसेच


२३२ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा