पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जो भाव आज कांदा, ऊस, तंबाखू, भुईमूग, कपाशी अशा पिकांना मागितला आहे व आपल्या आंदोलनामुळे जो सध्या तरी मिळालेला आहे, तोही खरेतर वाजवी भाव नाही, तो खूप अपुराच आहे; पण आपल्या आंदोलनापूर्वी मिळणारा भाव हा इतका कमी होता, की त्यात थोडीफार तरी सुधारणा आता पदरात पडून घेऊ व नंतर पुढच्या वेळी अधिक उचित दाम मागू, हेही जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितले होते.
 शेतकऱ्याचा उत्पादनखर्च कसा भरून निघेल याची चर्चा करण्यासाठी संघटनेने पुढे १६ नोव्हेंबर १९८३ रोजी पंढरपूर येथे एक विशेष मेळावा भरवला होता. शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी 'विठोबाला साकडे घातले होते. या अभिनव उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. लाखाहून अधिक शेतकरी पंढरपुरात जमा झाले. नेहमी इथे वारीसाठी जमणाऱ्या समुदायापेक्षा हा मेळावा अगदी वेगळा होता. त्याचे स्वरूप जराही धार्मिक असे नव्हते. 'भीक नको, हवे घामाचे दाम' या घोषणेने अवघे पंढरपूर दुमदुमून गेले. याच मेळाव्यात 'कृषिमूल्य आयोग बरखास्त करा' ही मागणी केली केली. पुढे राजीव गांधी यांनी त्याची थोडीफार दखल घेतली असे म्हणता येईल; 'कृषिउत्पादनखर्च व मूल्य आयोग' (Commission for Agricultural Costs & Prices) असे त्यांनी ह्या आयोगाचे नामकरण केले.
 या पंढरपुर मेळाव्याच्या संदर्भात एक लक्षणीय बाब नोंदवायला हवी. शेतकरी संघटनेच्या कामाला जिथे सुरुवात झाली व जिथे शरद जोशींची शेती होती तो चाकण परिसर हे वारकऱ्यांचे सर्वांत मोठे प्रभावक्षेत्र होते. असे असूनही जोशींनी त्या सुरुवातीच्या काळात वारकऱ्यांवर बरीच टीका केली होती. त्यामागे अर्थातच त्यांचा स्वतःचा अनुभव होता. ते लिहितात,

मी शेती चालू केली, तेव्हा पहिल्यांदा बटाटे लावले. खूप तण झालं होतं; डोंगराच्या उताराचा भाग असल्यामुळे. तण काढायला माणसं लावायला पाहिजेत, नाहीतर बटाट्याचं पीक जाणार अशी परिस्थिती उभी राहिली. माणसं शोधायला गेलो तर गावातल्या लोकांनी सांगितलं, की आता तण काढायला कुणी मजूर मिळणार नाहीत; बाया नाहीत आणि पुरुषही नाहीत. का? तर म्हणे, आषाढी एकादशी जवळ आली होती आणि लोक मोठ्या संख्येने पंढरपूरच्या वारीला चालले आहेत. मला मोठं आश्चर्य वाटलं. ज्या काळात शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रचंड कामं असतात, अशा वेळेला लाखो लोकांना उठवून पंढरपूरला घेऊन जाणारी ही भक्तिमार्गाची परंपरा टिकलीच कशी? केवळ विठोबाच्या दर्शनाकरिता ही मंडळी जातात, हे काही मला पटेना. मग मी सरळ देहूला गेलो, यात्रेमध्ये सामील झालो आणि एक भयानक विदारक सत्य माझ्यासमोर आलं. आमच्या कोरडवाहू भागातील शेतकरी, बियाण्यासाठी कशीबशी बाजूला ठेवलेली ज्वारी शेतामध्ये कुंकून टाकली, की घरी खायलासुद्धा काही राहत नाही म्हणून


२३६ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा