पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वारीमध्ये जातो आणि वारीच्या पहिल्या दिवसापासून कुठे फुटाणे वाटताहेत, कुठे चुरमुरे वाटताहेत, कुठे केळी वाटताहेत त्याच्या आशेवर पुढे पुढे जात राहतो. देहूपासून पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या या यात्रेचा भक्तिसंप्रदायाशी काहीही संबंध नाही. कोरडवाहू भागातल्या उपाशी शेतकऱ्यांची पंढरपूरपर्यंतच्या रस्त्यावरील, पाण्याची य असलेल्या भागातून जाणारी ती भीकदिंडी असते.


(अंगारमळा, पृष्ठ १२०)


  शेतकरी संघटनेच्या अनेक शिबिरांत जोशी ही भूमिका मांडत असत व शेतकऱ्यांना ती पटतही असे. अर्थात यामागे शेतीतले दारिद्र्य अधोरेखित करणे व त्यासाठी काय उपाययोजना करायची त्याकडे लक्ष वेधणे हाच प्रमुख हेतू असायचा. पुढे जोशींनी वारीकडे अगदी वेगळ्या दृष्टीने बघितले व त्याबद्दल त्यांनी लिहिलेही आहे. पुढे सोळाव्या प्रकरणात ते येणार आहे.

 शेतकऱ्यांच्या समोरील अडचणींचे दोन भाग जोशी करतात - अस्मानी संकट आणि सुलतानी शोषण.
 पहिले अस्मानी संकट म्हणजे अनियमित पाऊस.
 एखाद्या वेळी पडला तर तो प्रचंड पडतो आणि नाही म्हणजे अजिबात पडत नाही. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. दोन्हींमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होते. भारतातील पावसाचा दुसरा तोटा म्हणजे त्याचा हंगामीपणा. पावसाळ्याच्या चार महिन्यांतच वर्षभराचा सगळा पाऊस पडून जाणार. कोरडवाहू शेतीत त्या चार महिन्यांच्या आसपासच सर्वांची पेरणी आणि कापणी होते. त्यामुळे मग सगळ्यांची पिके एकाच हंगामात विक्रीला येतात. मालाचा पुरवठा वाढला, की भाव पडणार हा अर्थशास्त्राचा नियमच आहे. त्यामुळे मग शेतकऱ्याला अत्यल्प भाव मिळतो. ह्यावर उपाय म्हणजे मालाच्या साठवणीची व प्रक्रियाउद्योगाची मोठ्या प्रमाणावर उभारणी. पण सध्यातरी ते केवळ एक स्वप्नच आहे.
 याशिवाय रोगराई, कीड, टोळधाडी, वादळे, खराब बियाणे वगैरे अनेक अडचणी निसर्ग त्याच्यापुढे निर्माण करत असतो. ह्याबाबतीत एक अगदी अनपेक्षित असे उदाहरण सांगण्यासारखे आहे - मोरांसारख्या पक्ष्यांमुळे होणारे नुकसान. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी. त्याच्या सौंदर्याचे सर्वांना कोण कौतुक! पण तेच मोर रात्रीच्या वेळी शेतात घुसतात आणि सगळे पीक फस्त करून टाकतात! त्यावर काही इलाजही शेतकरी करू शकत नाही. सश्यापासून डुकरापर्यंत इतरही अनेक प्राण्यांच्या बाबतीत हे तेवढेच खरे आहे. कायद्याने ह्या वन्य जीवांची हत्या करणे अवैध आहे; वनखात्याची परवानगी असल्याशिवाय शेतकरी तशी हत्या करूच शकत नाही. पुन्हा तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे, योग्य त्या अधिकाऱ्याला गाठायचे, त्याच्याकडे विनंती अर्ज द्यायचा आणि मग पाठपुरावा करून ती परवानगी मिळवायची हेही अतिशय वेळकाढू व किचकट काम असते. सर्वसामान्य शेतकरी ते सगळे उपदव्याप करू शकत नाही. शिवाय, तोपर्यंत हे वन्य जीव त्याच्या शेताची पुरती


शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी ◼ २३७