पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 "दोन लाख माणसं रस्त्यातून काढणं पोलिसांना अजिबात कठीण नाही. त्यांना त्याचं शिक्षण मिळालेलं असतं. ११ नोव्हेंबरच्या रात्री पोलिसांनी आग्रा रोडवरची दोन लाख माणसं अत्यंत कार्यक्षमतेनं रस्त्यातून बाजूला केली. त्यांनी दहा गाड्या हमालांच्या आणि दहा एसआरपींच्या रस्त्यातून फिरवल्या. दहा गाड्यांतून अडीचशे हमाल उतरायचे आणि रस्त्यावरचे दगड, झाडं जे काय असेल ते भराभर बाजूला करायचे. दुसऱ्या दहा गाड्यांतून तितकीच एसआरपींची माणसं खाली उतरायची आणि सत्याग्रहींच्यामधून फिरत, त्यांच्या डोक्यात काठी घालून त्यांना बाजूला करत. त्यांनी झोपलेल्या सत्याग्रहींनाही झोडपलं. सायकलींची, मोटारसायकलींची त्यांच्यावर मोठमोठे दगड घालून मोडतोड केली. अशा पद्धतीने ते सबंध रस्त्यात झोडपत झोडपत गेले. तेव्हा आपण रस्ता कायमचा अडवून ठेवू शकू ही कल्पना चुकीची आहे."
  म्हणूनच कुठल्याही प्रकारच्या हिंसेच्याविरुद्ध ते आपल्या कार्यकर्त्यांना सतत सावध करतात. ते म्हणतात,
 "चौरीचौराचं आंदोलन महात्मा गांधींनी मागे घेतलं होतं ते ह्याच भूमिकेतून. आपल्याला रजपूत राजांसारखं 'जय एकलिंगजी' म्हणत सगळं सैन्य खलास करायचं नाही, तर आपली ताकद सांभाळत गनिमी काव्याने लढायचं आहे. लोकांना उगाच भडकवून द्यायचं, दगड फेकायचे आणि त्याला आंदोलन म्हणायचं यावर माझा विश्वास नाही. सतत कुठल्या ना कुठल्या मुद्दयावर आंदोलन चालूच ठेवायचे, यालाही काही अर्थ नाही. आमचं आंदोलन म्हणजे काही सर्कस नाही, की दररोज चार वाजता तिचा खेळ झालाच पाहिजे!
 "आंदोलनात प्रत्येक वेळी अगदी जीव ओवाळून टाकायची आवश्यकता नसते. आंदोलन हे आपलं उद्दिष्ट नाही, ते आपलं साधन आहे. त्यामुळे आंदोलन चालू करण्यापूर्वी वाटाघाटी करण्याच्या सर्व शक्यता अजमावून पाहिल्या पाहिजेत. आपल्या आंदोलनतंत्राबद्दल स्वतः शेतकऱ्याची काहीच तक्रार नाही; पण त्या आंदोलनाचा फायदा घेऊन आग भडकवायला व तिच्यावर स्वतःची पोळी भाजून घ्यायला जे टपलेले असतात, त्यांचाच थयथयाट चालू असतो! आपलं आंदोलन हे आर्थिक आंदोलन आहे. ते पोटाच्या खळीतून निर्माण झालेलं आंदोलन आहे. आंदोलनात बळी पडलेल्या माणसांच्या घरी जाण्याचा ज्यांच्यावर प्रसंग आला आहे, त्यांच्यापैकी कुणीही कधीच म्हणणं शक्य नाही, की काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण आंदोलन चालूच राहिलं पाहिजे. असं म्हणणं बेजबाबदारपणाचं होईल."
  म्हणूनच योग्य वेळी आंदोलन स्थगित करायला जोशींनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. उदाहरणार्थ, २८ जून १९८२ रोजी सुरू झालेले दूध आंदोलन. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, धुळे, जळगाव या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. निदान पन्नास टक्के शेतकऱ्यांनी सोसायट्यांना दूध घातले नाही. गावातच लोकांनी दुधाचा वापर केला; खवा, तूप वगैरे पदार्थ बनवले. मुंबईत जेव्हा दूध पुरवठा कमी पडू लागला, तेव्हा शासनाने परदेशातून मागवलेली दूध भुकटी आणि फॅट वापरून ती तूट भरून काढली.


२४२ = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा