पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ग्लोबलायझेशनचा पुरस्कार करताना बघतो, तेव्हा मी जे काही त्या काळात आग्रहाने शिकवलं, त्याचं फळ मिळाल्याचं समाधान मला मिळतं.
 "जास्त काय लिहू? पुन्हा काही लिहायची वेळ येणार नाही. आता माझे डोळे पैलतीरी लागले आहेत. वैतरणा नदीत घोट्याइतक्या पाण्यात उभा आहे, नदी केव्हा पार होते आहे याची मला उत्कंठा लागलेली आहे, घाई लागली आहे."
 असा या आठ-पानी हस्तलिखित पत्राचा शेवट आहे. दीक्षित यांचे हे जणू अखेरचे पत्र असावे असे वाटते व म्हणूनच त्याचे मोल अधिक वाटते.

 १९५२-५३ या वर्षात जोशी कॉलेजातल्या मराठी वाङ्मय मंडळाचे सदस्य होते; १९५३-५४ या वर्षात विकास या कॉलेजात निघणाऱ्या भित्तिपत्रकाचे संपादक होते. १९५४-५५ सालात कॉलेजातील जनरल बँकिंग असोसिएशनचे ते सरचिटणीस होते. मात्र त्या सहा वर्षांत कॉलेजबाहेरच्या जीवनात त्यांनी काय काय केले, कुठल्या उपक्रमांत भाग घेतला, कुठले सिनेमे बघितले, कुठले छंद जोपासले, कोणाशी त्यांची मैत्री झाली वगैरेबद्दलच्या काही आठवणी उपलब्ध नाहीत. ना त्यांनी स्वतः त्याबद्दल काही लिहिले आहे. ना संभाषणात कधी त्यांनी त्याचा उल्लेख केला. अपवाद म्हणजे आपल्या कॉलेजात एकदा त्यांनी दुर्गाबाई भागवत यांना कसे आमंत्रित केले होते याविषयी त्यांनी लिहिले आहे. दुर्गाबाईंविषयी ते बरेच ऐकून होते. फोर्टमधील प्रसिद्ध एशियाटिक लायब्ररीत कधी जाणे झाले तर तिथे आपल्या व्यासंगात कायम गढलेल्या दुर्गाबाई दिसत; पण त्यांच्या समाधीचा भंग करून त्यांच्याशी काही बोलायचा जोशींना धीर होत नसे. एकदा मात्र त्यांनी दुर्गाबाईंना आपल्या कॉलेजात व्याख्यानासाठी बोलावले होते. मध्यप्रदेशच्या एका जिल्ह्यातील आदिवासींचे जीवन, इतिहास, संस्कृती, राहणीमान यांविषयी त्या बोलल्या. बहुसंख्य विद्यार्थ्यांना आदिवासी जीवनाचा काहीच परिचय नव्हता व दुर्गाबाईंच्या भाषणाने एक नवेच जग त्यांना दिसले. सारे सभागृह भारावून गेले होते.
 बऱ्याच वर्षांनी आणीबाणीविरुद्ध ज्या धाडसाने दुर्गाबाईंनी आवाज उठवला त्याचे जोशींनी कौतुक केले होते. पण त्यांना त्याहूनही अधिक कौतुक होते ते आणीबाणीच्या काळात मिळालेल्या तेजोवलयाचा आणि लोकप्रियतेचा हव्यास दुर्गाबाईंनी जराही ठेवला नाही; निवडणुका संपताच त्या साऱ्यातुन निःसंगपणे मोकळ्या झाल्या, आपल्या व्यासंगाच्या विषयाकडे वळल्या आणि अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यातच रमल्या; या गोष्टीचे.
 मे १९५५ मध्ये जोशी बीकॉम झाले. १००० पैकी ५२८ गुण मिळवून; म्हणजे द्वितीय वर्गात. कॉमर्समधील गुणांची टक्केवारी त्याकाळी कमीच असे. पुढील दोन वर्षे त्यांना विद्यापीठातर्फे दिली जाणारी महिना रुपये तीसची मेरिट स्कॉलरशिप मिळाली. अॅडव्हॉन्स्ड बँकिंग या विषयात कॉलेजात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला सी. ई. रँडल (Randle) सुवर्णपदक कॉलेजतर्फे दिले जाई. त्यावर्षी ते जोशींना मिळाले.

 त्या सुवर्णपदकाचीही एक गंमत आहे. हे सुवर्णपदक मिळाल्याचे कळवणाऱ्या

शिक्षणयात्रा३५