पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/६९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

येतात; अशा बाबतीत आपल्यासारखी कमालीची विषमता तिथे नाही. अगदी सामान्य शेतकऱ्यालाही या सर्व गोष्टी परवडतात.
 हे कशामुळे घडते याचा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की याचे कारण म्हणजे शेतकऱ्याला शेतीमालाच्या विक्रीतून चांगले पैसे मिळतात व त्यामुळे तो विकून औद्योगिक माल विकत घेणे त्याला परवडते. पुढे त्यांनी शेतीमाल व औद्योगिक माल यांच्या दोन्ही देशांतील किमतींचा तुलनात्मक आढावा घेतला आहे.
 उदाहरणार्थ, तिथे एक लिटर दुधाची किंमत १ फ्रँक तर एका रेफ्रिजरेटरची किंमत ५०० फ्रँक आहे; याउलट भारतात मात्र एक लिटर दुधाची किंमत २ रुपये तर एका रेफ्रिजरेटरची किंमत मात्र तब्बल ५००० रुपये आहे. ह्याचाच अर्थ, एक रेफ्रिजरेटर विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये ५०० लिटर दूध विकावे लागते, तर त्यासाठी भारतात मात्र त्यासाठी २५०० लिटर दूध विकावे लागते. याचाच अर्थ भारतात एक रेफ्रिजरेटर विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडपेक्षा पाचपट शेतमाल विकावा लागतो. अशीच तुलना पुढे लेखात टीव्ही, मोटार ह्या गोष्टी विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये व भारतात किती गहू वा तांदूळ विकावा लागेल ह्याबाबत केली आहे.
 शेतीमालाला उत्तम किंमत मिळत असल्यानेच स्विस शेतकरी भारतीय शेतकऱ्यापेक्षा खूप अधिक सहजगत्या औद्योगिक माल घेऊ शकतो हे त्यावरून स्पष्ट होत होते.
 स्वित्झर्लंडचा जास्तीत जास्त भू-प्रदेश शेतीखाली आणायचा म्हटला, तरी केवळ तीन पंचमांश लोकसंख्येला तो स्वतः अन्नधान्य पुरवू शकतो. उरलेले धान्य, तसेच मांस, मासे,अंडी त्यांना आयात करावी लागतात. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना परदेशातील स्वस्त खाद्यपदार्थांशी प्रचंड सामना करावा लागतो. त्याचवेळी डोंगरावरची शेती, लहान जमीनधारणा व छोटे गोठे यांमुळे स्वीस शेतीमालाचा उत्पादनखर्च मात्र जास्त असतो. यावर तेथे तोडगा कसा काढला याविषयी पुढे लीला जोशी यांनी लिहिले आहे,

औद्योगिक प्रसारामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी व लढाईच्या वेळेस काही अंशाने तरी खाद्यपदार्थांच्या बाबतीत स्वयंपूर्णता असावी म्हणून शेती जगवलीच पाहिजे व शेतीखालील क्षेत्र कमी होता कामा नये असे स्वीस सरकारचे धोरण आहे. त्यामुळे १९३० सालापासूनच स्वीस सरकारने शेतकऱ्यांचा माल उत्पादनखर्चावर आधारित उत्तम किमती देऊन विकत घेण्याचा निर्णय घेतला व तो माल बाजारात आयात केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्पर्धेत तोंड देईल एवढ्या कमी किमतीत ते विकू लागले. याचे पुढील २५ वर्षांत खालीलप्रमाणे फायदे झाले :

  1. मिळालेल्या नफ्यातून प्रत्येक शेतकऱ्याने शेतीचे यांत्रिकीकरण केले.
  2. भाज्या, फळे व धान्य शक्यतो प्रक्रिया करून व हवाबंद डब्यांतच विकण्यासाठी पाठवले जाऊ लागले.
  3. प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांच्या ग्रामोद्योगाचे एक प्रचंड जाळे तयार झाले.
डोंगरकुशीतल्या नंदनवनात६९