पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/९२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

झालेली. पुरेसा पोषक आहार न मिळाल्याने मुळातच अवयवांची नीट वाढ न झालेली. (आदिवासी स्त्रिया व पुरुष यांच्या आकारमानात फारसा फरक का नसतो, हा भविष्यात जोशींच्या एका अभ्यासाचा विषय होता.) अंगारमळ्यात येण्यासाठी यांतल्या अनेकांना पाचपाच, दहा-दहा किलोमीटर चालावे लागे. रणरणत्या उन्हात. काट्याकुट्यांतून, जवळजवळ कोणाच्याही पायात चपला नसायच्या. संध्याकाळी घरी जाताना पुन्हा तोच प्रकार. जोशी लिहितात,

निसर्गाने बुडवलेल्या, चोरांनी लुटलेल्या, सावकारांनी नाडलेल्या, सुलतानांनी पिडलेल्या, धर्मजातींनी गांजलेल्या या मंडळींच्या जवळ जाण्याचा मी प्रयत्न करीत होतो; पण कुणी खुलेपणाने बोलत नव्हते. त्यांच्यात माझ्यात अंतर किती? ते उल्लंघावे कसे? पुढे पुढे मला एक युक्ती कळली - निबंधवार उत्तरे द्यावी लागतील असे प्रश्न विचारायचेच नाहीत. वस्तुनिष्ठ प्रश्न विचारायचे. उत्तरे आपण सुचवायची. उत्तर काय दिले जाते, यापेक्षा उत्तर देतानाची चेहऱ्यावरची मुद्रा बारकाईने न्याहाळायची.

 दुपारी जोशी दोन तास सुट्टी देत. ज्या गावकऱ्यांना घरी जाऊन जेवायचे असेल, इतर काही कामे उरकायची असतील त्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून. लांब राहणारे मजूर अर्थात तिथेच थांबत. पण बरेच गाववासी मजूरही शेतावरच थांबत, सावलीत बसून बरोबर आणलेला भाकरतुकडा खात. "दुपारची आपण भजनं म्हटली तर?" एक दिवस जोशींनी सुचवले. सर्वांनाच ती कल्पना आवडली. भजने म्हणणे हा तिथल्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग होता.

 ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मजूर मृदंग-झांजा घेऊन हजर झाले. जेवण उरकल्यावर भजनांना सुरुवात करायचे ठरले होते. जोशींनी भजनाचे सुचवले त्यामागे दोन कारणे होती. एक म्हणजे, मजुरांच्या अधिक जवळ जायचा हा एक मार्ग होता. दुसरे कारण अधिक व्यक्तिगत होते. काही महिने शेतीकामात काढल्यावर जोशी स्वतःही, नाही म्हटले तरी, काहीसे उदास झाले होते. 'परवापरवापर्यंत जिनिव्हा-न्यूयॉर्कमधल्या आलिशान सभागृहांत चर्चा करणारा मी, आज कुठे इथल्या वैराण, ओसाड कातळावर दगडांचे ढीग टाकण्याचे काम करत बसलोय? आपण धरलेला हा रस्ता योग्य आहे ना? आपण स्वतःचीच फसवणूक तर नाही ना करत आहोत?' अशा प्रकारचे विचार अलीकडे त्यांच्या मनात येत असत. विशेषतः दुपारची निवांत वेळ त्यांना अधिक अस्वस्थ करणारी वाटे. एकत्र भजने म्हटल्याने आपल्यालाही थोडेसे उल्हसित वाटेल, असा त्यांनी विचार केला होता.

 गावातली भजने नेहमीच 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा... ह्या भजनाने सुरू होत. पण त्या दिवशी मजुरांनी सुरुवात केली ते भजन होते, "हरिश्चंद्र राजा, तारामती राणी... डोंबाघरी भरी पाणी, डोंबाघरी पाणी..." जोशी दाम्पत्याची मनःस्थिती त्या मजुरांनी अगदी अचूक ओळखली होती, विशेषतः जोशींच्या मनातील विचार त्यांना नेमके कळले होते व

९२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा