पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/९५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

व त्याला अधिक चांगला भाव मिळत असे. हाती चार पैसे शिल्लक राहू लागले की माणसाला आपोआपच टापटीपीने राहावं असं वाटू लागतं. आर्थिक प्रगती झाल्यानंतरच इतर प्रगती शक्य होती.”

 गावातील स्थिती सुधारावी म्हणून जोशींनी अगदी सुरुवातीच्या काळात केलेल्या एका गंभीर प्रयत्नाविषयी थोडे विस्ताराने लिहिले पाहिजे. स्वतः जोशींनीही त्याविषयी लिहिले आहे.

 सर्व भूमिहीनांना प्रत्येकी दोन-अडीच एकर जमीन मिळावी अशी एक सरकारी योजना होती. आंबेठाणच्या आजूबाजूलादेखील काही जणांना तशा जमिनी मिळाल्या होत्या. पण त्या नुसत्याच पडून होत्या. म्हाळुगे गावातील शिवळे पाटील यांच्या जमिनीचा बराच भागही कित्येक आदिवासींना वाटला गेला होता. पण त्या जमिनीही तशाच पडून होत्या. कॉलेजात शिकलेल्या पुस्तकांत आणि अनेक पुरोगामी विचारवंतांच्या लेखनात बड्या जमीनदारांकडून अतिरिक्त जमिनी सरकारने ताब्यात घ्यायला हव्यात, भूमिहीनांना त्यांचे वाटप व्हायला हवे, तसे झाले, की मग ते ती जमीन कसायला लागतील, स्वतःचे पोट भरू शकतील आणि त्यातूनच ग्रामीण दारिद्र्याचा प्रश्न मिटेल अशी मांडणी केल्याचे जोशींनी वाचले होते; त्यांचेही मत पूर्वी साधारण तसेच होते.

 पण इथे त्यांच्या डोळ्यांसमोर मात्र वेगळेच काहीतरी घडत होते. जमीन हातात येऊनसुद्धा त्यांच्यापैकी कोणीही हातपाय हलवत नव्हते. प्रत्येकाची काही ना काही अडचण होती; नुसती जमीन मिळून त्यांचे भागणार नव्हते. कोणाला अवजारे हवी होती, कोणाला बैल हवे होते, कोणाला बियाणे हवे होते, खते हवी होती. त्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते, किंवा करायला तयार नव्हते.

 खेडमधील प्रांत अधिकाऱ्यांशी एक दिवस जोशींनी विस्तृत चर्चा केली. सामूहिक शेती करण्याबद्दल. तो एक उत्तम तोडगा असल्याचे जाणवत होते. सुदैवाने अधिकारी सज्जन होते, त्यांनी दावडी गावातील काही नवभूधारकांशी गाठ घालून दिली. जमिनीचा जुना मालक थोडा कटकट करत होता. पण सरकारपुढे त्याचे काहीच चालणार नव्हते. शिवाय, आणीबाणीच्या त्या दिवसांत सरकारी अधिकाऱ्यांची खेड्यापाड्यांतून बरीच भीतीदेखील होती. मामलेदार स्वतः दावडीला आले व त्यांनी जमिनीच्या सीमा आखून दिल्या. एकूण अकरा भूमिहीनांना तिथे सलग अशा जमिनी मिळाल्या. शेती सामूहिक करायचे ठरले. नाहीतर ज्याच्या जमिनीच्या तुकड्यात विहीर लागेल तो इतरांना पाणी देणारच नाही! सगळ्यांना ती अट मान्य होती. त्या सामूहिक शेतीला 'अकरा भूमिपुत्र' असे नाव दिले गेले.

 जसजसे दिवस जात गेले तसतशा एकेक गोष्टी जोशींच्या लक्षात यायला लागल्या. एकतर त्यांपैकी खरे भूमिहीन असे फक्त तिघे होते. त्यांच्या घरची माणसे पुण्या-मुंबईत नोकरीला होती व त्यावर त्यांचे घर चालत होते. आपल्या नावावर शेती व्हावी ह्याच्यात त्यांना खचितच आनंद होता, त्यासाठी वेगवेगळ्या पुढाऱ्यांना भेटून त्यांनी थोडाफार पैसाही खर्च केला होता; पण प्रत्यक्ष जमीन कसण्यात मात्र त्यांना जराही उत्साह नव्हता. जोशींसमोर आणि

मातीत पाय रोवताना९५