पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२०२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आम्ही आमचं काम सुरू ठेवू. मात्र व्यवस्थापनानंही तडजोड केली पाहिजे. त्यांनी स्वत:हून सूचना केली. ‘निश्चितच! केवळ कामगारांनीच तडजोड करावी असं कुणीच म्हणणार नाही. व्यवस्थापकांच्या कार्यशाळेत मी त्यांनाही हेच प्रशिक्षण दिलं आहे.’ मी म्हणालो.

 माझा हा उपक्रमही यशस्वी झाला. कामगारांना केवळ मागण्या करावयास शिकविणारे नेते आता त्यांना तडजोड करण्यासही तयार करणार होते. कोणत्याही संस्थेत अधिकारीवर्ग आणि कर्मचारी यांच्यात विवाद निर्माण होणे स्वाभाविकच नाही तर अनिवार्य आहे. मात्र,विवादात फसलेल्या दोन्ही बाजूंंना समेट घडवून आणण्याची प्रेरणा देणं हे मनुष्यबळ विकास विभागाचंं सर्वात आव्हानात्मक काम आहे. कार्यशाळेत एखादा मुद्दा मांडणं आणि त्याला सर्वांची मान्यता मिळविणं हे सोपंं आहे. मात्र तत्त्वतः मान्य झालेल्या बाबी प्रत्यक्षात साकार करून दाखविणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी विविध प्रयोग करून कामगार, त्यांचे नेते आणि व्यवस्थापन यांच्या मनाची ठेवण, कार्यपध्दती आणि एकमेकांबद्दलच्या भावना यात बदल घडवून आणणंं, त्यांना सामोपचार व वाटाघाटींच्या मार्गानंं एकत्र आणून तडजोड करावयास उद्युक्त करणं ही मनुष्यबळ विकास विभागाची कसोटी आहे. यात यश जितकं अधिक तितकं संस्थेचंं भवितव्य अधिक उज्ज्वल असं गणित आहे. ते जमलं पाहिजे. हे केवळ कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित करून साध्य होत नाही तर त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व कल्पकतेची आवश्यकता असते.

अदभुतदुनियाव्यवस्थापनाची/१९३