पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/34

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्यात अनोळखी होत चालले आहेत. ते चळवळीत अत्यंत घातक असते. ही परिस्थिती, रागरंग ओळखलेला भीमा बायजाच्या मुलाला म्हणतो, “धर्मा, आपली जात एकदम कंडम आहे. त्यांना कोणी जगलं-मेलं याची काही सुद्धा पर्वा नाही. साऱ्यांना आपलीच पडली आहे." इथे कथा संपते. हे होत चाललेलं अध:पतन जातीय मानसिकतेला खतपाणी घालणारे आहे. याउलट, गावकऱ्यांत कणवेची भावना तेव्हाही आणि अजूनही आहे हे दिसते.
 जातीय प्रश्नाला थेटपणाने भिडणाऱ्या या कथा आहेत. जनकल्याण समितीचे भिडे गुरुजी संघाचे प्रचारक, म्हणून त्यांच्याकडे वाईट नजरेतूनच पाहिले जाते. समाज संघटनेत व आपत्तीच्या काळात अनेक संघटना माणुसकीच्या व भूतदयेच्या भूमिकेतून कार्य करतात. दुष्काळात गुरा-ढोरांना स्वयंसेवी संस्थेमार्फत उघडलेल्या छावणीत आश्रय मिळतो. जनकल्याण समिती छावणी उघडते. या तरदाळच्या छावणीत आजाराने बैल दगावतो. बीफ कंपनीत जनावरे विकण्यापेक्षा शेतकरी छावणीत जनावरे सोडण्याने कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागते. हा वचपा काढण्यासाठी जनकल्याण समितीचे भिडे गुरुजी संघिष्ट म्हणून, कलेक्टर भावेही संघिष्ट म्हणून - अपप्रचार व पेपरबाजी केली जाते. सेवाभावी वृत्तीने रचनात्मक कार्य करणाऱ्यांना असे हकनाक बळी दिले जातात.
 'अमिना' असेच धार्मिक कट्टरतेचे, अज्ञान, अशिक्षिततेचे भगभगीत दर्शन आहे. अमिनाला नऊ मुले झाली. नवरा कादर मद्यपान, बाई ठेवणं या व्यसनामध्ये गुरफटलेला, पण कट्टर धर्मवादी आहे. सामान्य लोकांना धर्मामधील तत्त्वांचे काहीच माहीत नसते. काझी सांगेल तेवढे. मुले ही अल्लाहाची देणगी लक्षात राहते. दारिद्र्य आहे. दररोज कामावर गेल्याशिवाय चूल पेटत नाही, अंगावर ठिगळ लावलेले कपडे आहेत. परंतु अशाही स्थितीत बायकोने बरखा घातला पाहिजे, ही दारुड्या नवऱ्याची बायकोला ताकीद आहे. बुरख्यालाच सतराशेसाठ गाठी आहेच, मध्यकाळात स्त्रियांची पळवापळवी करत आपल्या स्त्रियांवर ही वेळ येऊ नये भीतीपोटी बुरखा पद्धत रूढ झाली आणि आजही कमरेला खुरपे खोवून जाणाऱ्या स्त्रीलाही बुरखा घालूनच जावे लागते. निराधार स्त्री हे सर्व दावणीच्या बैलाप्रमाणे सहन करते. हे 'अमिना' कथेत अशा स्त्रीचे हृदयद्रावक चित्रण केले आहे. परंतु कथेचा थीमॅटिक पार्ट हा नाही. तो आहे कुटुंबनियोजन. रोजगार हमीच्या कामावर कुटुंबनियोजनाचे महत्त्व सांगणे व केसेस मिळविणे सोपे आहे. १९७२ नंतरच्या काळात कुटुंबनियोजन हा 'राष्ट्रीय प्रकल्प' होता. तो कलेक्टर, डे. क., तहसीलदार, इतर वैद्यकीय अधिकारी मोठ्या प्रमाणात राबवीत. तो राबविताना संवेदनशील अधिकाऱ्यालाच कोणत्या यातना भोगाव्या लागतात हे 'पाणी! पाणी!' मधून संवेद्य

अन्वयार्थ । ३५